Friday, October 30, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग २९,३०,३१ : डॉ. कल्पना कुलकर्णी

 


भाग २९:ती तेव्हा तशी!

 

श्रावणसरी संपून जातात. भाद्व्यातला पाऊसही कमी होतो आणि आश्‍विन येतो. शरदाची चाहूल लागते. झुंजुमुंजु होताना दवानं ओलेती झालेली धरती हिरवी शाल लपेटून बसल्यागत दिसते. दिवस हळूहळू तापायला लागतो. सांजवेळी अंधारून येताच हवेत हळूच गारवा शिरतो. ही थंडी नाजूक किणकिणणारी, जणू झिरझिरीत वस्त्रातून शरीराला स्पर्श करणारी! या अशा भारलेल्या आसमंतात टिपूर चांदणं ओसंडणारी शरदाची पौर्णिमा येते, कोजागिरी येते.

एखाद्या कोजागिरीला मागे घुटमळलेले काही चुकार पावसाळी ढग त्या नभीच्या चंद्रम्याशी लपंडाव खेळतात, तर कधी दुसर्‍या एखाद्या कोजागिरीला लख्ख चांदणं नभात हसू सांडत राहतं आणि पाहता पाहता या भुईवर शिंपडलं जातं. आकाशीच्या पौर्णिमेला जमिनीवर पोहचवतं. इथे जमिनीवर ही कोजागिरी, रात्र जागवणारी, कधी अशी तर कधी तशी!

एखादी अल्लड नवयौवना लगबगीनं तयारी करणार असते. अखंड चिवचिवणारा मित्र-मैत्रिणींचा मोठा थवा जमणार असतो. गप्पागोष्टी, गाणं खाणं...पाहता पाहता रात्र सरणार असते.

याच रात्री दुसरीकडे कुठेतरी मात्र नि:शब्दतेचं बेट सजणार असतं. पहिल्या प्रीतीला पंख लाभणार असतात. नवथर गारव्यानं आणि निसटत्या स्पर्शानं अंगांगावर शिरशिरी उमटणार असते. पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीनं तनू झंकारणार असते.

तोच चंद्र अजून कुठेतरी मुलाबाळांत रमलेल्या वत्सल गृहिणींवर, त्यांच्या कुटुंबांवर स्निग्धतेचा वर्षाव करणारा असतो. त्याची ती स्निग्धता घरादारांमधून आजूबाजूला पाझरणार असते.

कुठे कुठे हा लख्ख चंदेरी प्रकाश हृदयात आरपार घुसणार असतो. घट्ट बंद केलेला आठवणींचा कप्पा किलकिला होणार असतो. गालांवरून ओघळणारे चमचमते अश्रू स्वत:च्याच बंद ओठांशी संवाद साधणार असतात.

आणखी कुठे निवांत विसावलेल्या आयुष्यात, श्रांत तन आणि शांत मनानं कोजागिरी साजरी होणार असते. त्या सोहळ्यात वर्षानुवर्षांच्या सवयीची तयारी असते. आजच्या घोटभर दुधाच्या प्याल्यात, आजवरच्या जगलेल्या, काठोकाठ भरलेल्या, प्याल्याची तृप्ती जाणवणार असते. आजपर्यंत एकमेकांसमवेत घालवलेला पौर्णिमेच्या रात्रीचा प्रवास आणि प्रकाश आजची कोजागिरी उजळवणार असतो.

अशी ही कोजागिरी, वेगवेगळी साजरी होणारी. तरी एक समान सूत्र असलेली, रात्र जागवणारी! जागणार्‍या रात्रीबरोबर मनही जागवणारी! मनाला हुरहुर लावणारी तशीच मनाला दिलासाही देणारी! मनाला साद घालणारी, मनाचा प्रतिसाद घेणारी! मनात बहरणारी, तर कधी कधी मनातच थबकणारी! आठवणींचा गहिवर दाटणारी आणि आठवणींनी विश्‍वासही पेरणारी!

ती कोजागिरी? केव्हा कशी?

ती तेव्हा तशी!!

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग ३०: हुरहुर

 

नजर टाकावी तिथपर्यंत धुकंच पसरलेलं दिसावं. सवयींच्या वाटाही त्या धुक्यात हरवून दिसेनाशा व्हाव्यात. वाटा शोधण्यासाठी त्या धुक्यात पाऊल टाकावं तर धुक्यानं स्वत:ही पुरतं वेढलं जावं. “धुके  दाटलेले उदास उदास...” अशी मनाची अस्वस्थ बेचैनी वाढावी. त्या दाट धुक्यातून गडद एकटेपण सोबतीला यावं. हरवलेल्या वाटा सापडण्याऐवजी स्वत:लाच हरवलेपण यावं. या हुरहुरीला अंत नाही, असं वाटत असतानाच कुठल्या तरी दवबिंदूवर पाय पडावा. आपले अश्रू तर सांडले नाहीत ना, या भावनेनं दचकायला व्हावं. विखुरलेले दवबिंदू आणि ओघळणारे अश्रू वेचण्याइतके आपण हळुवार राहिलोच नाहीत, या विषादानं स्वत:भोवतीचे धुक्याचे, एकांताचे पदर टराटर फाडले जावेत. विरलेल्या धुक्यात स्वत:ला नेहमीच्याच वाटेवर उभं ठाकलेलं पाहून, “हीच तर शोधत होतो आपण” असा आनंद होण्याऐवजी “नेहमीच्याच वाटेवर पोहोचलो की आपण...” असं कळेल न कळेलसं दु:ख व्हावं आणि त्या दु:खाच्या किनारीनं मग सूर्यप्रकाशातल्या दिवसात भाजत राहावं.

मनातला हिवाळा असा सामोरा येतो. आपल्याला काय हवं होतं? त्या धुक्यात लपलेल्या वेगळ्या वाटेवर हरवून जाणं की रोजच्या मळलेल्या वाटेवरचं स्वत:ला सापडवणं? हे विचित्र अधांतरीपण पेलेनासं होतं आणि हिवाळ्यातली पानगळ सुरू होते. मनाला अगदी ओकंबोकं करते. एकीकडून वाटत असतं, मनाला कुठूनतरी ऊब मिळवून द्यावी. निष्पर्णतेपासून वाचवावं. दुसरीकडे थंडीच्या थिजलेपणाचे थर साचताना दिसतात. सार्‍या हालचालींनाच हतबल करतात.

गोठलेलं मन दिवसभराच्या सूर्यप्रकाशानं वितळेल की काय, असं वाटत असतानाच लहानलेला दिवस संपून जातो. सैलावू बघणारा बर्फाचा थर वेढणार्‍या काळोखात पुन्हा घट्ट जमू लागतो.

एरवी स्वच्छंदी फिरणारा वारा या रात्रीच्या अंधारबेटात जणू अडकलाय, असं वाटू लागतं. पालापाचोळा उडत तो गोलगोल घुमू लागतो. आजूबाजूच्या सगळ्या नाजूक स्वरलयींना स्वत:च्या रौद्र तालात ओढून घेतो. थंडी अंगात भिनते. हीव भरल्यामुळे तनमन थरथरू लागतात.

थरथर थांबवून शांत होण्याची गरज जाणवत असते. फडफड थांबवून पंख मिटल्या देही घरट्यात घुसण्याची सक्ती त्यासाठी अपरिहार्य असते. घरट्याची ऊब आश्‍वासक वाटते. मिटल्या पंखांचं दु:ख विसरायला लावते. सकाळच्या कोवळ्या किरणांचे स्वप्न दाखवायला लावते.

काळोखगर्भ भेदून, पहाटस्वप्न लेवून हळदपिवळी सकाळ येते. ऊबदार घरट्यातून बाहेरच्या धुक्यात झेपावताना आता हरवण्या-गवसण्याचा लपंडाव नसतो, तर धुकं भेदून नवीन वाटा शोधण्याचा उन्मेष असतो.

मनातला हिवाळा ऊबदार घरट्यात आता विसावलेला असतो. वसंताच्या चाहुलीसाठी आसुसलेला असतो.

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )



भाग ३०: हिवाळ्यातला दिवस

 

पहाटे-पहाटे अंगावर रजई ओढताना तिला थंडीची चाहूल लागली. अर्धवट जागी झालेली ती रजईत घुसून अजूनच पेंगुळली. गुलाबी पहाटे ती गुलाबी थंडीची स्वप्नं पाहू लागली. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना स्वप्नात राजकुमार आला नाही तर नवल! तिची स्वप्नातली थंडी स्वप्नातल्या राजकुमाराच्या ऊबदार मिठीत कुठल्याकुठे पळून गेली. त्या पहाटेच्या दवबिंदूंच्या वर्षावाने ती सुस्नात झाली. धुक्याची जाडसर शाल लपेटून, राजकुमाराच्या हातात हात गुंफून ती सज्ज झाली. उगवत्या सूर्याच्या कोवळ्या किरणांचा मखमली गालिचा आता लवकरच अंथरला जाणार होता. त्याचा मुलायम पदस्पर्श होण्यासाठी तिची जीवनोत्सुक पावलं आसुसली होती.

सूर्योदयाबरोबरच तिला मोठी प्रसन्न जाग आली. पहाटेची स्वप्नं खरी होतात म्हणे. इतकं हळुवार स्वप्न घेऊन येणारा हिवाळा तिला खूप हवाहवासा वाटला. वाफाळत्या चहाच्या कपानं शरीराला ऊब देऊन ती लगबगीनं स्वत:च आवरायला लागली. आनंदानं गिरकी घेणार्‍या मनाला आता नळाचं थंडगार पाणीसुद्धा थुईथुई कारंज्यांचे तुषार वाटू लागले. हिवाळ्याला साजेसे, पण आपलं रूप खुलवणारे विविध पेहराव, त्यानुसार साजशृंगार या सगळ्यांच्या धांदलीत हिवाळ्यातला छोटा दिवस तिच्यासाठी अजूनच लहानला. हिवाळ्याच्या खरेदीसाठी ती उत्साहात घराबाहेर पडली.

स स

पहाटे पहाटे होणारा घड्याळाचा गजर बंद करण्यासाठी तिला पांघरुणातून हात बाहेर काढवेना तेव्हा बाहेरच्या थंडीची तिला चांगलीच जाणीव झाली. डोळे उघडवत नव्हते, तरी पुढचा कामाचा पूर्ण दिवस आठवून ती त्या गारठ्यात उठलीच. थंडीनं गार पडलेल्या फरशीवर पाऊल ठेवताना, घरात घालण्यासाठी आता चपला वापराव्यात, असं तिच्या मनात आलं. सवयीनं तिनं शेजारीच झोपलेल्या मुलीच्या बिना पांघरुणाच्या पायांकडे बघितलं. आपल्या थंडीचं काय, मुलीच्या पायांना थंडी वाजतीय. रुळलेल्या वात्सल्याची नेहमीची कर्तव्यदक्ष जाणीव तिच्या मनाला झाली आणि थंडीनं गारठलेलं तिचं शरीर चटचट हालचाली करू लागलं. मुलीच्या अंगावर स्वत:चेही पांघरूण घालून ती सकाळच्या कामाच्या धबडग्याला सामोरी गेली.

एक कप चहाचं इंधन शरीराला पुरवल्यावर तिच्या नकळत तेही जरा सुखावलं. हात सरसर काम उरकू लागले. मनही हिवाळ्यासाठीच्या वेगवेगळ्या कामांची आखणी करू लागलं. मुलीला मागच्या वर्षीचा स्वेटर होणार नाही. यंदा नवा घ्यावा लागेल. नवर्‍यालाही सकाळीच स्कूटरवर बाहेर पडावं लागतं. त्याने निदान कानटोपी, हातमोजे तरी घालावेत. हिवाळ्याची भूक खूप लागते. मुलांचं वाढीचं वय आहे. त्यांच्यासाठी भरपूर सुकामेवा आणायला हवा. येता जाता खाऊ म्हणून खातील.

एकीकडे घरकाम होताहोताच तिच्या मध्यमवर्गीय मनातला हिवाळ्यातला जास्तीच्या खर्चाचा हिशेब पूर्ण झाला. “गार फरशीवर फक्त पहिल्या पावलालाच शहारतं. त्यानंतर कामाच्या गर्दीत तर थंडीतसुद्धा अक्षरश: घाम येतो. काय करायच्यात मला घरात घालायला चपला?” ऑफिसात जाण्यासाठी पायात चपला सरकवताना घरातल्या चपलांचा विचार तिनं सवयीच्या सोईस्करपणे मनाआड केला आणि ती उरलेल्या दिवसांची कामं उरकण्यासाठी घराबाहेर पडली.

स स

पावसाळा संपता-संपता या नव्या इमारतीच्या कामावर ती पोहोचली होती. उंच उंच मजल्यांच्या त्या भव्य इमारतीसमोर तिचं ते चार पत्र्यांचं खोपटं खूपच बापुडवाणं दिसत होतं. या अशा टोलेजंग इमारतींवर काम करायला तिला नेहमी आवडायचं, पण येऊन ठाकलेल्या हिवाळ्याच्या काळजीनं ती यंदा हिरमुसली होती. रात्रीचे खोपटाचे पत्रे गार पडत होते. त्यांच्या फटींमधून थंडी घुसत होती. थेट हाडांपर्यंत भिनत होती. खरं तर तिच्या हाडांना या थंडीची सवय होती, पण या वर्षी झोळीतल्या तान्ह्या लेकरासाठी तिचा जीव खाली-वर होत होता. थंडी सहन न होऊन ते रात्ररात्र किरकिरत होतं.

आजूबाजूला अजून काहीच बांधकाम न झाल्यानं वार्‍याला अडसरच नव्हता. रानोमाळ भणाणणारा तो वारा तिच्या लेकराच्या थंडीत अजूनच भर घालीत होता.

सकाळी चुलीपुढे भाकरी थापताना चुलीची ऊब तिला फार सुखाची वाटत होती. दिवसभर कामाच्या चक्रात राहूनराहून तिला चुलीची आठवण येत होती. पेटत्या चुलीवरून तिला शेकोटी आठवत होती. शेकोटी पेटवून थंडी कमी करता येईल, असं तिला खात्रीनं वाटत होतं.

त्यासाठीच्या सरपणाच्या काळजीनं तिचं मन व्यापलं होतं. वरच्या मजल्यांवर विटा-सिमेंट वाहून नेताना तिची नजर चहूबाजूंना झाडं-झुडपं धुंडाळत होती. पण नवीन इमारती उभारण्यासाठी इथलं जंगल तोडून पार साफ केलं होतं. नजरेच्या टप्प्यात तर काहीच दिसत नव्हतं.

दिवसभराचं काम संपलं, मजले उतरून खाली आल्यावर बरोबरच्या सगळ्या जणी आपापल्या झोपड्यांकडे वळल्या. ती मात्र तिकडे वळली नाही. हिवाळ्यातला दिवस छोटा असल्यानं लवकर अंधारून येणार होतं.

अंधाराच्या आत लांबवर फिरून जिथून मिळेल तिथून काही सरपण तिला गोळा करायचं होतं. रात्री शेकोटी पेटवून तान्ह्या बाळाची थंडी घालवायची होती. दिवसभराच्या कामाचा शीण विसरून पाला-पाचोळा, काटक्या-कुटक्यांच्या शोधात ती घाईनं पावलं उचलू लागली.

ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

Friday, October 23, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग २६, २७, २८ : डॉ. कल्पना कुलकर्णी

 


भाग २६: गर्दी

 

आमचे दातारकाका लक्ष्मी रस्त्यावर राहतात. गणपतीतल्या गर्दीला टाळण्यासाठी ते दरवर्षीप्रमाणे यंदाही त्या दरम्यान गावाला गेले आणि सालाबादाप्रमाणे यंदाही गणपती बघण्यासाठी माणसांचा महापूर लक्ष्मी रस्त्यावर लोटलाच. वेगवेगळ्या गावांहून गाड्या भरभरून रोजच माणसं आली आणि प्रत्येकानं रस्त्यावरच्या गर्दीत भरच टाकली. दातारकाकांचं चूक नाही. दरवर्षी रस्त्यावरच्या गर्दीनं त्यांना त्यांच्याच घरात बांधून टाकल्यासारखं होतं. रस्त्यावर लोटणार्‍या गर्दीचंही बरोबरच आहे. घरादाराच्या रहाटगाड्यात दिवसेंदिवस जखडलेल्या जिवांना ही गर्दीच जरासा सैलपणा देते.

आपण सगळे रोजच्या बस-रिक्षाच्या गर्दीला वैतागलेले असतो. पुण्याच्या रस्ता भरून वाहणार्‍या वाहनांच्या “ट्रॅफिक जॅम”बाबत तर काय बोलावं? तरीही काही काही वेळा मात्र वाहनांची गर्दी चालेल; पण एकटेपणा नको अशी स्थिती येते. आम्ही (अडीच माणसं आणि एक कुत्री) बडोद्याला रेल्वेने न जाता गाडी घेऊन गेलो, तेव्हा कुठल्या रस्त्यानं जायचं याची खूप चर्चा केली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन-दोन दिवससुद्धा ट्रॅफिक जॅम राहू शकतो वगैरे अनेक किस्से आम्ही ऐकले. त्याचबरोबर सापुतार्‍याच्या जंगलातून जाणारा रस्ता अगदीच सुनसान आहे हेही ऐकलेलं. पुण्याच्या ट्रॅफिक जॅमवर कायमच आग पाखडणारे आम्ही सापुतार्‍याच्या एकाकी रस्त्यापेक्षा ट्रॅफिक जॅम परवडेल, कारण कधी गरज लागली तर आजूबाजूला माणसं तरी असतील असा अगदी पोक्त विचार करून त्या “वाहत्या” रस्त्यानंच गेलो.

थोडक्यात प्रत्येकाला सोयीनुसार, गर्दी हवी किंवा नको असते. मला मात्र वेगवेगळ्या प्रकारची गर्दी अनुभवायला आवडते. “बालगंधर्व”सारख्या नाट्यगृहांमध्ये एखादा नेटका प्रयोग पाहण्यासाठी जमलेली ती रेशमी सळसळीची आणि मोगर्‍याच्या गजर्‍यांच्या घमघमाटाची गर्दी खूप प्रसन्न करते. “भरत नाट्य मंदिरा”च्या आवारात “पुरुषोत्तम”, “फिरोदिया” करंडकांच्या वेळी तुडुंब भरलेली तरुणाईची मस्ती आजूबाजूचा परिसरच तरुण करून सोडते.

गर्दीचा कोलाहल पार्श्‍वसंगीतासारखा सुरेल झंकारतोय आणि माझी माझ्या मनाशी सुरेख तार जुळली हे मी खूपदा अनुभवलंय. सिंहगड चढता-उतरताना ती आजूबाजूची बिनओळखीची गर्दी मला सतत सोबत करते; पण तेव्हाच मन मात्र एकटं सुसाट धावत सुटतं, आठवणींचे किती तरी चढउतार सहज पार करतं. फार प्रसन्न अनुभव असतो तो! अल्पबचत भवनच्या लग्नाच्या हॉलमधली गर्दी अंगावर घेत, समोरच्या मैदानावर खेळणार्‍या मुलांचा कल्ला ऐकत, त्या तालावर मी आजपर्यंत कितीतरी शब्द कागदांवर उतरवले आहेत.

या सगळ्यांच्या पलीकडची, भोवतालच्या चराचरातील गर्दी? झुंजुमुंजु व्हायला लागतं आणि फांद्याफांद्यावरच्या पानांच्या गर्दीतून पक्ष्यांच्या विविध सुरावटींची झुंबड उडते. या गर्दीची मंजूळ सोबत घेऊन मी उठते आणि दिवसभराच्या भाऊगर्दीला सामोरी जाते. दिवसाअखेरी बगळे आकाशात गर्दी करतात आणि कावळे विजेच्या तारांवर शाळा भरवतात. मनात आठवणींची गर्दी दाटते. या गर्दीतून वाट काढत “द ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय” या सिनेमातलं एक दृश्य समोर येतं. सुनसान जंगलात बंदुकीचा मोठा दचकणारा आवाज येतो. घनदाट झाडांच्या पानापानांमधून हजारो पंख फडफडत बाहेर पडतात आणि आकाश व्यापून टाकतात! त्या आभाळभर पसरलेल्या पंखांनी माझं मन व्यापून गेलंय, असं मला वाटतं. मन व्यापणार्‍या अशा कितीतरी गोष्टी मला आसमंतातल्या गर्दीत सामावून टाकतात.

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )



भाग २७ : ...ये रे पावसा
 

 वरुणराजा, किती दिवस रे वाट पाहायला लावायची? येतोस की नाही, या चिंतेने मीसुद्धा हवालदिल झाले बघ. खरं तर मी आणि माझ्यासारख्या अनेक तुझ्यापासून अंतर राखून असतो. तुझ्या न येण्यानं नद्या आटल्या, पेरण्या खोळंबल्या हे सगळं आपलं ऐकीव! खरिपाची पिकं तुझ्यावर अवलंबून, हेही पुस्तकीच ज्ञान. रोजचं विजेचं भारनियमन आणि नळाचा कमी अथवा बंद झालेला पाणीपुरवठा आम्हाला जाणवून देणारा की तुझं येणं लांबलंय. मग आम्ही चर्चा करणार, “यंदा पाऊस कमी आहे म्हणतायत, पाणी जपून वापरलं पाहिजे. आता धान्य, भाज्या सगळंच महागणार. पेट्रोल तर आधीच महागलंय.” म्हणजे त्या चर्चेतसुद्धा तू शुद्ध स्वरूपात नाहीच. आमच्या नेहमीच्या महाग पेट्रोल वगैरेची तुझ्या असण्या-नसण्यात भेसळ. या अशा चर्चेनंतर तू बरसायला लागल्यावरही आम्हाला भरभरून आनंद होत नाहीच. आमचा आपला थोडका आनंद, आता पाणी भरून ठेवायला नको, भाज्या स्वस्त वगैरे.. तुझं रौद्र स्वरूपसुद्धा आम्हाला लांबचच. आमच्या एक दिवसाच्या पगाराच्या कोरड्या नोटांचा पूरनिधी दिला, की टी.व्ही.च्या बातम्यांमध्ये पूर पाहायला आम्ही मोकळे! पण तुझ्याशी असा दुरान्वयेच संबंध असला, तरी पावसाळ्याचे चार महिने आमची रोजनिशी नेहमीपेक्षा थोडी का होईना, पण वेगळी असतेच. म्हणजे कसं, की तू येणार म्हणून आम्ही आमच्या छत्र्या, रेनकोट काढतो; त्यांची डागडुजी उरकतो. कधी कधी त्याही पुढे जाऊन त्यांची नव्यानं खरेदी करतो. कपडे, चपला यांचा प्रकार बदलतो. (त्या खरेदीसाठी “मान्सून सेल” च्या “छत्र्या” जागोजागी उगवलेल्या असतातच) कपड्यांवर चिखलाचे डाग पडणार नाहीत, गाड्या पावसाच्या पाण्यानं बंद पडणार नाहीत, बॅगांचं लेदर खराब होणार नाही. अशा अनेक काळज्या घेतो. जेणेकरून आम्ही स्वत: आणि आमची कुठलीही गोष्ट तुझ्या वर्षावात भिजणार नाही. तुझ्या आगमनाची तयारी म्हणजे तुझ्यापासून बचावाचीच तयारी! असं असलं तरी, पहिल्या पावसात चिंब भिजायचं, पाऊस ऐकत चालत राहायचं अशी रोमँटिक स्वप्ने आम्हालाही अधूनमधून पडतात. “ऑफिसात जाताना कपडे भिजायला नकोत” सारख्या नन्नाच्या पाढ्याला बाजूला सारून आम्ही मध्यम मार्ग काढतो. खिडकीतून पाऊस बघत, एक-दोन शिंतोडे अंगावर घेत आम्ही चहा-भज्यांवर ताव मारतो आणि तुझं स्वागत करतो. “सरीवर सरी आल्या गं” सारख्या पावसाच्या विविध कवितांमधून, गाण्यांमधून तुला बंद घरामध्येच अनुभवतो. कधी तरी हा बंद अनुभव पुरेसा वाटत नाही. उघड्यावरच्या पावसाची उर्मी अनावर होते आणि त्यातूनच वर्षा सहलीचं आयोजन होतं. खास भिजण्यासाठी म्हणून चक्क सुट्टी घेऊन, रोजच्या धकाधकीपासून आम्ही दूर जातो. तू कोसळत असतोसच. ऐनवेळी मनच माघार घेतं. बेनकाब होऊन तुला सामोरं जाणं घडतंच नाही. “खूप नको भिजायला, किमान डोकं तरी झाकूयात. नंतर आजारी पडलो तर? सर्दी-खोकला झाला तर बाम लावायला आहे ना?” अशा धाकधुकीमध्येच ती वर्षा सहल उरकली जाते. त्यानंतर कोरड्या मनानं आणि कोरड्या हातानं सहलीचा जमाखर्च लिहितो. पण कधीतरी भरलेल्या आभाळाचं ओझं मनाला पेलवत नाही. मनही भरून येतं आणि झिरपू लागतं. लक्षात येतं, आपल्याच मनाच्या कोपर्यात पावसाचं गाव वसलेलं आहे. तिथे तो वर्षानुवर्षे कोसळतोच आहे. तरीही आपल्या वाट्याला “कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही” अशी स्थिती. आशा वाटते, कधी तरी असा दिवस उजाडेल, जेव्हा पाऊस आपल्यासाठी सुद्धा असेल. त्यासाठी वाट आहे ती मनाच्या कोपर्यातल्या पाऊस मन व्यापून टाकण्याची. या मनातल्या पावसाच्या पुराची, ज्यात आमच्या सगळ्या प्रापंचिक विवंचना, बंधने आणि कोरडे शिष्टाचार वाहून जातील आणि मग समोरासमोर भेटता येईल पावसाला. मला खात्री आहे, “अशा” पावसात मग चिंब भिजता येईल-स्वत:च पाऊस होता येईल. म्हणूनच मनातल्या पावसा ये, बाहेर कोसळणार्या पावसाला भेटण्यासाठी, या वरुणराजाला साकडं घालत असतानाच त्याच्या जोडीनंच तुलाही आमंत्रण- ये रे ये रे पावसा, भिजव मला रे “पावसा”. 


 ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग २८:पाऊस मनातला, गाण्यातला! 

आभाळ गच्च दाटून आलंय, कुठल्याही क्षणी पाऊस कोसळू लागेल, असं वाटतंय, दाटलेल्या आभाळाबरोबरच मनात हुरहुरही दाटून येते. “घन ओथंबून येती” म्हणता म्हणता आठवणी ही ओथंबून येतात. जणू - 

“आठवणीत पाऊस असतो, पावसात आठवण असते,
आठवणींची साठवण, पावसाच्या गाण्यांत असते” 

असा हा पाऊस ! पाऊस मनातला-पाऊस गाण्यातला !! संततधार पाऊस चाललाय. आभाळातलं मळभ हळूहळू मनावर पसरत चाललंय. त्या संततधारेचं बोट धरून ग्रेसचा दुखरा पाऊस कधी आठवून जातो कळतच नाही - 

“पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने,
 हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने...” 

 तिन्ही सांजेला किरकिरत पडणारा पाऊस गहिवर वाढवणाराच असतो. ग्रेसचंच “ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता...” गाणं आठवून आपल्यालाही घनव्याकूळ रडू कोसळेल, असं वाटायला लागतं. अशीच व्याकूळता व्यक्त होते गुलजारच्या गाण्यातून - 
 “एक अकेली छत्रीमें हम आधे-आधे भीग रहे थे । 
आधा सुखा, आधा गिला... सुखा तो मै ले आई हूँ,
 गिला मन शायद, बिस्तर के पास पडा है....” 

आजपर्यंत तुडवलेल्या आयुष्याच्या मुलखातल्या, मागे पडलेल्या या “गिला मन” च्या आठवणींनी डोळे भरून येतात. जणू पाऊस आणि अश्रू एकजीव होतात. गुलजारच्याच दुसर्या एका गाण्यातून ते ओघळतात.

 “शाखो पे पत्ते थे पत्तों पे बूँदे थी, बूँदो में पानी था, पानी में आसूँ थे...” 

आभाळीचा पाऊस डोळ्यांत उतरतो - “पाऊस रुपेरी आभाळ मेघ पापण्यांत आसू भिजे काजळ रेघ...” पडून गेलेल्या पावसानं आणि वाहून गेलेल्या आसवांनी आभाळ आणि मन मोकळं व्हायला लागतं. विरत चाललेल्या ढगांमधून सूर्याची किरणं दिसायला लागतात. इंद्रधनुष्याचे रंग मनात मिसळत जातात. तेव्हाच ऊनपावसाचा लपंडाव ओठांवर एक हसू उमटवतो. बालकवींची अजरामर कविता प्रकर्षाने आठवते, 

 “श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे,
 क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे...” 

हिरवळीवर बागडणार्या उन्हाच्या सोनकिरणांबरोबरच प्रसन्नताही पसरत जाते. मागचा कधीतरीचा सोनेरी पाऊस अलगद मनात उतरतो आणि पाडगावकरांच्या गाण्यातल्या मोरपिसासारखा मखमली बनून जातो. 

 “भुरभुरता पाऊस होता, सोनिया उन्हात  गवतातून चालत होतो,
 मोहुनी मनात चुकलेल्या, त्या वाटेची शपथ तुला आहे,
 दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे,
 मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे...” 

 मोरपिसाच्या मुलायम स्पर्शानं मनच मोर बनून जातं. थुईथुई नाचू लागतं. गदिमांच्या सदाबहार गीताबरोबरच अल्लडपणे सांगतं - “पावसाच्या रेघांत खेळ खेळू दोघांत निळ्या सवंगड्या नाच. नाच रे मोरा, आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच...” या नाचर्या गाण्यात तल्लीन होऊन पावसात भिजता भिजता मनीचं गूज ओठांवर येतं, सुधीर मोघेंच्या गाण्यातून - 

 “गाणं मनातलं पावसात येईल फुलून, तुझ्या माझ्यातलं अंतर जाईल पुसून, 
 बीज नवीन गाण्याचं पेरायचं, गुज ओठांनी ओठांना सांगायचं,
 एका पावसात दोघांनी भिजायचं...” 

 बरसणार्या पाऊसधारांमध्ये एकमेकांवर विसंबून भिजताना शुचिर्भूत झालेल्या मनात पाडगावकरांच्या आश्वासक ओळी उमटतात- “पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा अशा प्रीतीचा नाद अनाहत शब्दावाचून भाषा अंतर्यामी सूर गवसला नाही. "आत किनारा श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा...” सगळी फडफड थांबवून विसावलेल्या मनात विश्वास ओतप्रोत भरून जातो. अशा वेळी “थोडासा रूमानी हो जाए” च्या स्वप्न विकणार्या “बारिशकर” ची आठवण आल्यावाचून राहत नाही. पाऊस नसला तरी पावसाचा हलका शिडकावा आल्याचा भास होतो. त्या आभासातच ऐकू येतं - 

 “मुश्किल है जिना, उम्मीद के बिना,
 आँखो में सपने सजाए, थोडासा रूमानी हो जाए।” 

 भूतकाळातले अश्रू बाजूला होऊन भविष्यातल्या स्वप्नांना जागा करून देतात. डोळ्यांत स्वप्न सजतात आणि झिरपणार्या पावसाबरोबरच मनात खोलवर रुजतात. रुजणारी स्वप्नं, पडणारा पाऊस आणि भरलेलं मन सगळं एकजीव होऊन जातं. सुधीर मोघेंंचा पाऊस चौफेर व्यापला जातो- 

 “पाऊस चौफेर, आत नि बाहेर पावसाचा ऊर,
 दुभंगला पाऊस कणात, पाऊस क्षणात, पाऊस मनात,
 ओसंडला- पाऊस चौफेर आत नि बाहेर...!” 


 ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

Saturday, October 17, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग २३, २४, २५ : डॉ. कल्पना कुलकर्णी

 




 भाग २३: ई-दिवाळी

 

“तुझा नवरा इथे नसताना तुमचा रोज फोन व्हायचा का गं?” माझी एक मैत्रीण चौकसपणे विचारत होती. मी फोनच्या पुढच्या जमान्यातली विरहिणी असल्याने तत्परतेने नकार दिला आणि सांगितलं, “नाही, आम्ही रोज एकमेकांना ई-मेल करायचो.”

आता माझा नवरा परतलाय. त्यामुळे घरातल्या घरात ई-मेल न करता आम्ही एकमेकांशी बोलतोय, पण ह्याच्या मानगुटीवरून मात्र हे ई-मेल भूत अजिबात उतरत नाहीये. उलट ते जास्तच घट्ट बसत चाललंय. तो दिवसेंदिवस अगदी ई-आधीन होतोय. म्हणजे बँकेची कामं, बिलं भरणं, ई-कॉमर्स इत्यादी इत्यादी आणि मी आपली बिचारी! काही इलाजच नसल्याने इतर अनेक गोष्टींबरोबर या “ई” उलाढालीही सांभाळते.

तर सांगायचा मुद्दा, या “ई”चा सुळसुळाट वाढत चाललाय. यंदा आमचा गणपती “ई-गणेशोत्सव” होता. म्हणजे डाऊनलोड केलेल्या गणपतीच्या फोटोची कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपोआप होणारी आरती व माऊस क्लिक केला, की वाजणार्‍या घंटा, पेटणारी  उदबत्ती, पायाशी पडणारी फुलं, दाखवला गेलेला नैवेद्य इत्यादी इत्यादी.

गणपतीनंतर यंदाच्या दिवाळीवरही ही “ई” चालून आली. आमच्या घरात घोषणा झाली. “यंदाची दिवाळी - ई दिवाळी”! आतापर्यंत मीही थोडीफार ई-वातावरणाला सरावले होतेच. त्यामुळे मी होकार दिला आणि कॉम्प्युटरवर कामांची यादी करायला बसले.

मन जरा सुखावलंच. पंधरा दिवस आधीपासून आठवणीनं भेटकार्ड आणून पत्ते शोधून, तिकिटे चिकटवून, पोस्टात टाकण्याचं माझं किचकट काम कमी होणार. ई-भेटकार्ड नवरा हौसेनं पाठवेल. चला माझं एक तरी काम कमी झालं आणि त्याच्या खाती गेलं. पुढचा विचार तर फारच आल्हाददायी होता. नवरा, मुलगी, मोलकरीण सगळ्यांची वेळापत्रकं सांभाळत, घर आवरण्याचं बिकट काम! ती कटकटच नाही. यंदा कशी सुटसुटीत, ई-स्वच्छता! ई-रोषणाई! फटाकेसुद्धा आणायला नको. प्रदूषणात भर न घालण्याचं पुण्यही मिळेल आणि शिवाय खिसाही आनंदित राहील.

मन जरा जास्तच वाहवत चाललं होतं. फराळाचे पदार्थ करायलाच नकोत.

ई-फराळाला बोलवायचं सगळ्यांना! लाडवाचा पाक फसणे, अनारशाचं पीठ बिघडणे, चकल्या-शेवेचे घाणे घालून मनगटं दुखणे, करंज्या लाटून लाटून हात भरून येणे.... या सगळ्या संकटांमधून सुटका! मी अगदी हरखून गेले. स्वप्नरंजनाच्या पुढच्या पायरीवर अलगद चढले.

यंदा अगदी छान साडी घ्यायची आणि ती  घालून, नटूनथटून नुसतं मिरवायचं. काही कामच नसणार दुसरं या ई-दिवाळीमुळे! अगदी खुशीत येऊन नवर्‍याला सगळा बेत सांगितला आणि मागणी केली, की या वेळच्या पाडव्याची पैठणी मला आधीच घेऊन दे. म्हणजे पाडव्याला नेसता येईल. नेहमीच निवांत दिसणारा माझा नवरा आरामात म्हणाला, “काय घाई आहे ? ई-पैठणी तर घेऊन द्यायचीये. दोन मिनिटांत काम होईल.”

मी क्षणार्धात भानावर आले. म्हणजे खरा फराळ करायचा नाही, तशी खरी पैठणी पण मिळणार नाही? “ईऽऽऽ” मी अगदी ईडलिंबूतला “ई” चीत्कारले. “कशाला ही नसती सोेंगं? आपल्या आहेत त्या जुन्या गोष्टीच चांगल्या आहेत बरं का!” - इति मी. त्यानंतर रोजच्या रोज मी दुकानात, पोस्टात जाते, बाजारातून वाणसामान खरेदी करून आणते. फटाके आणते, गॅसजवळ तास न् तास उभी राहून घाम गाळते, ही नेहमीची उस्तवार ओघानं आलीच. हे सगळं केवळ ती “ई-पैठणी” नाकारून पाडव्याची पैठणी मिळण्याच्या आशेनं.

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )



भाग  २४: भोंडल्याची गाणी

 

नवरात्रीतले सगळे नऊ दिवस जमलं नाही तरी एक दिवस मी सईचा भोंडला अगदी हौसेनं केला. रूचकर खिरापती सजल्या. सईच्या आणि माझ्याही छोट्या-मोठ्या मैतरणी नटूनथटून आल्या. सुरेख फेर धरला गेला. कळणारी आणि न कळणारी सगळीच गाणी मुलींनी मजेत म्हटली. खिरापतींवर ताव मारताना मात्र माझ्या एका सखीनं नाक मुरडलं. “काय गं ही कालबाह्य आणि निरर्थक गाणी शिकवतेस मुलींना..?”

“पण मुलींना तर आवडतात ती गाणी !” माझं समर्थन.

“त्यांना काय कळतंय?” तिचा प्रतिप्रश्‍न.

मी विचार करू लागले. “अडगुळं-मडगुळं” पासून किती निरर्थक गाणी आपण म्हणतो, ती आपल्याला आवडतातच ना. भोंडल्याची कितीतरी गाणी मुलींना कळंत होतीच की.

“ऐलमा, पैलमा...” चा फेर संपल्यावर मुलींनी किती यमक जुळविले होते. “एक लिंबू झेलू बाई” च्या चालीवर तर “एक झाड लावू बाई” असं कोणत्यातरी शाळेतच शिकवलं होतं म्हणे. “अक्कणमाती, चिक्कणमाती” गाणं म्हणजे मला एखादा फ्लो चार्ट कसा असावा, याचं खूप चांगलं उदाहरण वाटतो. खड्डा-माती-जातं-सपिटी-करंज्या-तबक-शेला-पालखी-माहेर अशा एकातून एक गोष्टी सहज उलगडत समोर येतात. रोजचे वार शाळेच्या आणि टीव्हीच्या वेळापत्रकानुसार पाठ करणार्‍या मुलींना “आज कोणवार बाई...” गाण्यातून, त्या - त्या वारासाठी “नेमलेल्या” देवांची ओळख होते. “सोन्याचा करंडा बाई मोत्याचं झाकण” ऐकल्यावर कितीतरी जोडशब्दांची उजळणी मुलींनी केल्याचं मला आठवतंय.

सासू, सासरा, दीर, नणंद, भावजय ही सगळी सासरची नाती मुलींना तशी टी.व्ही. च्या “क” च्या बाराखडीतल्या मालिकांमधून दिसतातच. ती त्यांनी गाण्यांमधून अनुभवली. शिवाय या गाण्यात प्रत्येक जण काही ना काही दागिना आणतच असतो. नटून आलेल्या त्या मुलींना हार-बांगड्यांचं अप्रूप तर कळत होतं ना ! “सासरच्या वाटे, कुचुकुचु काटे” गाण्यात “कुचुकुचु” शब्द म्हणायला मुलींना फार आवडतं, हे माझ्या लक्षात आलं. “झिपर्‍या कुत्र्याला बांधा-सोडा” हा आदेश मुली खूप दणक्यात देत होत्या, बहुतेक “झिपर्‍या” शब्दाच्या प्रेमात पडूनच ! सई लहान असताना हे गाणं म्हणताना “सासर्‍यानं आणल्या बाटल्या” (पाटल्या आणि बांगड्या) असं म्हणून तिनं आमची खूप करमणूक केली होती.

रोजची भाजीतली मिरची - कोथिंबीर दिसली की सई अजूनही प्रेमानं साद घालते. “कोथिंबिरी बाई गं!” त्या चेंडूच्या गाण्यात “आला चेंडू, गेला चेंडू” अशा चेंडूपासून खेळ सुरू करून, राम, आकाश, बोहलं, लग्न, झाड, फूल, वेणी, भांग, खोपा आणि त्यात उंदीर घेतो झोपा गं.. अशा खेळाचा शेवट ऐकताना मुली कानगोष्टी खेळतायत असं वाटतं. “कृष्ण घालितो लोळण” या गाण्याचा वापर तर भोंडल्याव्यतिरिक्त नाजूकसं अंगाईगीत म्हणूनही करावासा वाटतो.

अशी अनेक गाणी असली तरी मुलीचं सदा सर्वदाचं लाडकं गाणं आहे. “श्रीकांता कमलकांता...” आम्ही लहानपणी हे गाणं आवर्जून म्हणायचो. आजही मुलींना ते हवंच असतं. “तिकडून आला वेडा, त्यांनं डोकावून पाह्यलं.” या ओळीला फेर धरलेला असतानासुद्धा मुली इतक्या छान थोड्याशा कोनात डोकावतात ना की पाहत राहवंस वाटतं ! वेड्याच्या नावावर खपवलेल्या करंज्या-होड्या, लाडू-चेंडू, शेवया-अळ्या आणि झोप-मरण या साम्यभेदाच्या जोड्या मुलींना खिळवून ठेवतात.

माझ्या सखीला भोंडल्याची गाणी कालबाह्य वाटतात. “अवलगीचं पाणी गं” सारखे संदर्भ घेऊन येणारे काही सोपस्कार कालबाह्य झाले असतीलही. आजची स्त्री ही कालच्या सुनेइतकी सासुरवाशीण नसेलही, तरीही बहुतेक वेळा कामानिमित्त आणि क्वचित कधीतरी विरंगुळ्यासाठी घराबाहेर पडणार्‍या आजच्या गृहिणीची स्थिती भोंडल्याच्या गाण्यातल्या सुनेसारखीच “कारल्याचा वेल लाव गं सुने, मग जा अपुल्या माहेरा” अशीच असते. अनेक कडू कारल्यांचे वेल जोपासत आणि त्यांच्या भाज्या करत करत ती बाहेर पाऊल टाकेपर्यंत एकच पालुपद अनुभवते “मग जा जरा बाहेर!”

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )



भाग २५: आस्तिक-नास्तिक

 

जेव्हा जेव्हा मी पहाटे सिंहगड चढायला सुरुवात करते तेव्हा तेव्हा मला माझ्या बाबांची हमखास आठवण येते. पंचाहत्तरी उलटलेला हा वृद्ध (?) तडफेने अजूनही आषाढीच्या वारीला पायी जात असतो. मला वाटते, चालत जाण्याची ही अनावर ऊर्मी आनुवंशिकतेनेच माझ्यात आली असावी. संदर्भ, भावना वेगवेगळ्या असतील. पण मूळ प्रेरणास्रोत हा चालण्याचाच असावा. ते त्यांच्या विठ्ठलाच्या ओढीनं थंडी-पावसाची तमा न बाळगता दिवसेंदिवस चालत राहतात. खरं तर त्यांना बसने जाऊनही दर्शन होईलच पण त्या नुसत्या दर्शनापेक्षा तेथे चालत जाण्याचा सोहळा त्यांच्यासाठी जास्त आनंददायी असावा.

माझ्या सिंहगडला जाण्यात कुठलं लौकिकार्थातलं देवदर्शन नसतं, पण ती आजूबाजूची नीरवता, ते पुसट होणारं चांदणं, चित्रातले रंग भरत जावेत तसं ठळक होत समोर येणारं ते सूर्यबिंब हे सारं “ईश्‍वर” या संकल्पनेचं उलगडणंच असतं.

आस्तिक-नास्तिक या वादात मी कधी पडले नाही, पण स्वत: कधी व्रतवैकल्यामध्ये अडकले नाही. सोमवार ते रविवार या विविध वारांचे उपवास करणार्‍या भाविकाचं मला खूप कौतुक वाटतं. मी कुठल्या वाराच्या वाटेला कधी गेले नाही. कुठल्या मंदिरामध्ये कधी गेलेच तर ते मंदिर पाहणं, ते स्वच्छ आहे की नाही हे शोधणं हेच मी जास्त कुतूहलानं करते. देवाला केलेला नमस्कार हा केवळ उपचाराचाच भाग असतो. आमच्या घरी गणपती, दिवाळी अगदी उत्साहात साजरे होतात. पण त्यात धार्मिक कर्मकांडाऐवजी उत्सवप्रियताच जास्त असते. त्याच उत्साहात घरी ख्रिसमसचीही तयारी होते.

मी एकदा पाहुणी म्हणून एका छोट्या गावात गेले होते. पाहुणचाराचा भाग म्हणून मला आजूबाजूच्या प्रसिद्ध तीर्थस्थळांना (जेथे दिवसाकाठी भारतातून हजारोंनी लोक येतात) घेऊन जाण्याचा बेत ठरत होता. मी जायला नकार देताच सगळ्यांच्या आश्‍चर्याला पारावार उरला नाही. कारण त्यांचा अनुभव होता की, त्या देवस्थळांच्या भेटीसाठीच लोक त्या छोट्या गावाला येणं पसंत करत होते. त्यांनी मला नास्तिक म्हणायचं ठरवून टाकलं होतं. पण माझ्या दुसर्‍या दिवशीच्या वागण्यानं मी त्यांना गोंधळात टाकलं होतं. संध्याकाळचं फिरत फिरत गावापासून दोन-तीन किलोमीटरवर असलेल्या छोट्याशा टेकडीवरच्या गावदेवीच्या मंदिरात मी आनंदाने गेले. तेथे जाऊन सूर्यास्त पाहून त्या शांत मंदिराच्या आवारात मी अगदी प्रसन्नचित्त होते.

माझ्या लहानपणी आई ज्या श्रावणातल्या कहाण्या वाचायची त्या ऐकून ऐकून पाठ होत्या. त्यातली एक मला फारच भावलेली होती. राजा फर्मान काढतो. देवाचा गाभारा दुधानं भरायचा. प्रत्येकानं घरात काहीच दूध न ठेवता सगळं दूध देवाच्या गाभार्‍यात ओतायचं म्हणजे गाभारा भरेल. पण गाभारा काही भरत नाही. एक म्हातारी राजाचं न ऐकता मुला-बाळांना, वासरा-बछड्यांना दूध पाजते. त्यातून उरलेलं वाटीभर दूध गाभार्‍यात ओतते आणि त्यानं गाभारा भरतो.

मला वाटतं, माझी आजची उघड नास्तिकता आणि अल्पशा आस्तिकतेबरोबर जोपासत गेलेली सृजनावरची गाढ श्रद्धा यांच्या घडणीत श्रावणातल्या त्या कहाणीचा पाया आहे.


ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

Friday, October 9, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग २०,२१,२२ : डॉ. कल्पना कुलकर्णी





भाग २० : तीन देवियाँ

             जागतिकीकरणाचं युग होतं. एक आटपाट नगर होतं. तिथं एक धन्वंतरी राहत होता. धन्वंतरी मोठा सत्त्वशील आणि धैर्यशील होता. आरोग्यदेवतेबरोबरच आहारदेवता आणि व्यायामदेवतेचाही तो उपासक होता. त्यासाठी कडक व्रत करीत होता. धन्वंतर्‍याचे व्रत काय होते? सकाळी लवकर उठावे. “चितळे”, “साने”, “गोकूळ”, “कात्रज” असे कुठले तरी दूध प्यावे. बॅडमिंटनचे दोन हात करावेत. पोटभर नाष्टा करावा. दिवसभराचे रुग्णसेवेचे काम मन लावून करावे. वेळच्या वेळी चौरस आहारानं उदरभरण करावे. जमेल तेव्हा, जमेल तेवढे चालत राहावे.

            धन्वंतर्‍यास दोन पुत्र होते. सृजन आणि मदन. दिसामाशी ते वाढत होते. काळानुसार बदलत होते. आपले पुत्र राजबिंडे युवक होतील, असं स्वप्न धन्वंतरी पाहत होता. सृजनाची पित्यावर श्रद्धा होती. तो मनापासून धन्वंतर्‍याचं व्रत अंगीकारत होता. धन्वंतरी दोन्ही पुत्रांचे सर्व हट्ट पुरवत होता. त्यांनी एकदा घोड्यांचा हट्ट धरला. धन्वंतर्‍यानं काही घोडे मागविले. प्रत्येकास आपआपला घोडा निवडण्यास सांगितले. मदनानं “मोटारसायकल” नावाचा धट्टाकट्टा घोडा निवडला. सृजनाने “सायकल” नावाच्या मरतुकड्या घोड्यास पसंती दिली. मदनाच्या घोड्याचा आहार खूप होता. तो सतत “पेट्रोल” नावाचं द्रव पीत असे. सृजनाचा घोडा नुसत्या हवेवरच जगत असे.

            आपआपल्या घोड्यावरून दोन्ही तरणेबांड वीर दौडत असत. सृजन पित्याचे बोल प्रमाण मानून, प्रभातसमयीच त्याच्या घोड्यावरून रपेट मारून बॅडमिंटन खेळण्यास जात असे. मदन मात्र सूर्यमुखी. दर्पण न्याहाळणे हाच त्याचा छंद. सृजन दूध पीत असे. मदन विविधरंगी “पेप्सी”, “थम्सअप” “फँटा” अशी पेये प्राशन करीत असे. सृजनाचा आहार भात-वरण, पोळी-भाजी, विविध फळं.... मदनाला मात्र हॉट-डॉग, व्हेज बर्गर असे पदार्थ भावत असत.

            दिवस जात होते. धट्ट्या-कट्ट्या घोड्यावरचा मदन दिवसेंदिवस सुकत होता. मरतुकड्या घोड्यावरचा सृजन कसा राजबिंडा होत चालला होता. पोरीबाळींच्या नजरेत भरत होता. मदन स्वप्न पाहत असे, “मी मदन आहे. एक दिवस माझी रती माझ्याकडे येईल.” सृजन घोडा हाकून, बॅडमिंटन खेळून दमत होता. श्रमल्या शरीरानं शांतपणे झोपत होता.  स्वप्नांसाठी त्याला वेळच नव्हता.

            एक दिवस चमत्कार घडला. रतीचं आगमन झालं. मदन हरखून गेला. तिच्या स्वागतासाठी सज्ज झाला. पण रतीचं मदनाकडे लक्षच नव्हतं. ती आली तशी थेट पोहोचली बॅडमिंटन कोर्टवरच. सृजनाला विचारती झाली, “बॅडमिंटन मिक्स्ड डबल्समध्ये पार्टनर म्हणून घेतोस?” सृजनानं होकार दिला. दोघे मिळून बॅडमिंटनचे दोन हात करू लागले. हळूहळू हात हातांत गुंफले गेले. सृजन-रती चतुर्भुज झाले.

            मदन मनी निराश झाला. उदास मनानं पित्याकडे गेला. विचारता झाला, “बाबा, माझं काय चुकलं? मला रती का नाही लाभली?” धन्वंतरी उत्तरला, “बाळा तू उतलास, मातलास. माझं व्रत पाळलं नाहीस. आहारदेवता आणि व्यायाम देवतेस रुष्ट केलेस. त्यामुळे आरोग्यदेवता कोप पावली आणि केवळ त्याचमुळे रतीनामक भाग्यदेवतची तुझ्यावर मेहेरनजर झालीच नाही.”

            “बाबा, त्याला उपाय काय?”

            “मदना, उतू नकोस, मातू नकोस, घेतलं व्रत टाकू नकोस. आरोग्यदेवता, आहारदेवता आणि व्यायामदेवता या “तीन देवियाँ” ची योग्य उपासना कर. तुझी रती तुझ्याकडे नक्कीच येईल. मदनानं आपली चूक सुधारली. यथावकाश त्याची रती त्याला मिळाली आणि “रती-मदन” सुखानं नांदू लागले. जसे ते सुखी झाले, तसेच सर्व “रती-मदन” “तीन देवियाँ” ची उपासना करून सुखाने  नांदोत, ही साठा उत्तराची  कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण !

 

ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग २१: सखी पार्वती

सखी पार्वती, तू तुझ्या सहचराला, महादेवाला विचारलंस, कुठल्या पुण्याईने तू त्या शिवाची पार्वती झालीस. त्यावर प्रत्यक्ष महादेवांनी सर्व व्रतांत श्रेष्ठ असलेल्या हरतालिका व्रताचं माहात्म्य तुला सांगितलं, ज्याच्यामुळे तुला तुझा वर मिळाला होता.

हे ज्ञानदीप कलिके, चौसष्ट वर्षे घनदाट जंगलात तू घोर तप केलंस. नुसती झाडांची पानं खाऊन राहिलीस. अशा तेजस्वी कन्येसाठी योग्य वर कोण, असा तुझ्या पित्याला प्रश्‍न पडला. नारदमुनींनी विष्णूचे नाव सुचविले; पण तू शंकराला मनोमन वरलेले होतेस. त्यामुळे तू रागावलीस, निर्जन अरण्यात गेलीस, हरतालिकेचे व्रत केलेस, वाळूचे शिवलिंग स्थापिलेस, पूजा केलीस, दिवसभर निर्जल उपवास केलास, रात्र जागवलीस. या तुझ्या पुण्याईने साक्षात कैलासपतीचे आसन ढळले आणि त्याने प्रसन्न होऊन तुझा पत्नी म्हणून स्वीकार केला. अशा रीतीने या व्रतपूर्तीने तुझी मनोकामना पूर्ण झाली.

तुझ्या पावलावर पाऊल टाकून युगानुयुगे आम्ही स्त्रिया हे व्रत धरतोय. पण देवी, तुझ्या दीर्घ दैवी आयुष्यातल्या चौसष्ट वर्षांच्या काळाची पुण्याई तुझ्या गाठीस होती. आमचं मर्त्य मानवी आयुष्यच उणंपुरं चौसष्टच्या आतबाहेर. त्यात त्या वर्षातल्या एका दिवसाच्या व्रतानं आम्हाला लाभलेलं पुण्य तुझ्या पासंगालाही पुरत नाही. त्यामुळे इच्छापूर्तीसाठी आमच्या कुमारिकांना या एका व्रताबरोबर आजच्या युगातली अनेक व्रतं घ्यावी लागतात. काही काही जन्मभराची खडतर व्रतं असतात. उच्चशिक्षित व्हावं लागतं, स्वयंपाकपाणी शिकावं लागतं. “गृहकृत्य दक्ष” असं बिरुद मिळवावं लागतं. एकाच वेळी घरंदाज आणि मॉड दिसू शकण्याची दीक्षा घ्यावी लागते. त्यानंतर बर्‍याचदा नोकरी करून लग्नासाठी पैसेही जमवावे लागतात. लग्नाच्या बाजारात “दाखवून” घेण्याच्या व्रताची खडतरता, तर तुझ्या कल्पनेच्या पलीकडची आहे.

भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या हरतालिका व्रताचा तू घालून दिलेला पायंडा, तर आम्ही पाळतोच. त्याशिवाय वेगवेगळ्या लहानमोठ्या कालमाहात्म्याची अनेक व्रतं आजकाल पाळावी लागतात.

काही व्रतांमध्ये ठराविक साबणानंच स्नान करावं लागतं; मग ते पाळलं तर काही कालावधीनंतर त्या “साबण व्रता”मुळे हल्लीचा महादेव मिळतो. दुसर्‍या काही व्रतांमध्ये ठराविक अशीच सौंदर्य प्रसाधने वापरावी लागतात. अशा रीतीने दर थोड्या दिवसांनी नवीन कुठल्या तरी व्रताचा महिमा ऐकायला मिळतो आणि जास्तीतजास्त पुण्य पदरात पडण्याच्या आशेनं आमच्या कन्या त्या सगळ्या व्रतांचा स्वीकार करतात.

माते, तू वेगवेगळ्या जन्मी वेगवेगळी दिव्यं पार पाडलीस. त्या तुझ्या थोर पुण्याईनं तुला तुझा भोळा शंकर मिळाला. मात्र, आमच्या आजच्या सख्यांना एकाच जन्मी इतक्या दिव्यांना सामोरं जाऊनही, एवढ्या व्रतवैकल्यांच्या सोपस्कारानंतरही मनातलाच वर मिळेल याची खात्री नसते. कधीकधी तर “वर”च मिळत नाही. “मनातला” कुठे घेऊन बसलीस? पर्वतदुहिते, या सगळ्यांमुळे आमच्या दुहिता या असंख्य व्रतांच्या चक्रात अडकल्यात बघ. कधी तरी आपापली कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण होईल, या आशेनं!

काही थोड्या कन्या “स्व”त्वाचं व्रत स्वीकारायचं ठरवतात. लग्नाचं व्रत नाकारतात. त्यांनाही त्यांच्या व्रतपूर्ततेत अनेक अडथळ्यांचे पर्वत येतात. “लग्न हीच जीवनाची इतिश्री” असं ठरवण्याचं कर्तव्य भोवतालचा जनसमुदाय करीतच असतो.

हे आदिशक्ती, मनापासून हरतालिका पूजणार्‍या आमच्या मुलाबाळींना या आजकालच्या वेगवेगळ्या व्रतांच्या दुष्टचक्राशिवाय “जो जे वांछिल तो ते लाहो” असा तुझा आशीर्वाद दे. आज तुझ्याकडे एकच मागणं, ज्या प्रबळ इच्छाशक्तीनं तू तुला हवा असलेला महादेव मिळवलास, ती तुझी इच्छाशक्ती आणि सहनशक्ती काही प्रमाणात का होईना, आम्हाला मिळू दे. जी आम्हाला आमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बळ देईल, ती मनोकामना महादेव मिळविण्याची असो अथवा न मिळविण्याची, किंवा दुसरं काही मिळविण्याची!

ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग २२: हे विद्युल्लते...

 हे विद्युल्लते, तुझ्या चापल्याची ख्याती आम्ही पामरांनी काय बरं वर्णावी? आकाशात लख्खकन चमकतेस आणि दिसेनाशी होतेस. आमच्या काळजात मात्र रूतून बसतेस.

ही तू आकाशीची वीज, काय बरं म्हणालीस धरतीला? आणि अवतीर्णच झालीस की आमच्या घरात. अगदी अंकितच केलंस हं तू आम्हाला! मात्र आम्हा धरित्रीच्या लेकरांना अधूनमधून तुझी आकाशलोकीची चमक दाखवतेस बघ. तिथे कशी क्षणात चमकून दिसेनाशी होतेस; तशीच आता इथे गायब होते आहेस. क्षण-पळ-घटिका ही मोजमापं मात्र तू आकाशलोकीच ठेवून आलीस. तुझं भूलोकीचं गायब होणं मिनिटं-तास-दोन तास-अर्धा दिवस- पूर्ण दिवस असं वाढतच चाललंय. ठाऊक आहे का तुला, किती हाहाकार माजवतेस तू, तुझ्या नसण्यानं?

पण सौदामिनी, माझ्या भाबड्या जिवाला वाटतंय की, तू जी नाहीशी होते आहेस ती मात्र नक्कीच काही स्वर्गसुखं आमच्या पदरात टाकण्यासाठीच!

आता हेच बघ ना, “फ्रीज” नावाच्या थंडगार कपाटाच्या आम्ही किती आहारी गेलो होतो. तेच ते गारढोण शिळंपाकं खात होतो. आता तू नाहीस, म्हटल्यावर कसं गं चालायचं ते यंत्र? आपोआप सकाळ-संध्याकाळ ताजं रुचकर जेवण सुरू झालं बघ! मिक्सरचं खोकं जरा मागे सरकलं आणि तो खलबत्याचा सुबक घाट पुन्हा दिसायला लागलाय. एरवी दिव्यांच्या अमावस्येची वाट बघत बसलेले सगळे दिवे बघ कसे घासूनपुसून घराला उजळवून टाकताहेत. परवा मी भिंतीच्या कानांनी पलीकडच्या घरातल्या जोडप्याची कुजबूज ऐकली. घरातच दोघं “कँडल लाईट डिनर”ची लज्जत चाखत होते. किती प्रेमी जिवांना तू ही कँडल लाईट डिनरची संधी दिलीस गं!

तुझ्या नाहीसं होण्यानं माझ्या घरात स्वर्गच उतरलाय, हे मला कधी उमजलं माहिती आहे? अगं, नेहमी “कालनिर्णय”च्या पानांवरच राहणारी आणि दर पानागणिक उलटणारी पौर्णिमा माझ्या वीतभर खिडकीतून माझ्या घरात उतरली. त्या आकाशीच्या चंद्राचा पूर्ण प्रकाश आणि भोवतालच्या लुकलुकणार्‍या असंख्य चांदण्या मी अंगभर लपेटून झोपले बघ. पहाटवारा आला आणि त्या उबदार प्रकाशातून अलगद झिरपला. शिरशिरत आलेली ती जाग किती प्रसन्न होती म्हणून सांगू?

तू असतीस तर खिडक्या-खिडक्यांवर टांगलेल्या बल्बमधून दिसला असता का असा चंद्र? डोक्यावर गरगरणार्‍या पंख्याखालून भेटला असता पहाटवारा?

 


ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

Thursday, October 8, 2020

बालदोस्तांचे काव्यवाचन : ७, ८

भाग ७

चि. ओजस चौगुले 

कविता : माणसा, तूच तुझा वैरी  

कवी:  चि. ओजस चौगुले 


भाग ८

कु. ऐश्वर्या रायते 

कविता : नातं  

कवयित्री :  कु. ऐश्वर्या रायते  






Saturday, October 3, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग १७,१८,१९ : डॉ. कल्पना कुलकर्णी

 


भाग १७: आमचे व्यायामाचे प्रयोग

             शालेय जीवनापासूनच आम्हा सर्वांची प्रयोगशीलता अनुकरणातच होती. म्हणजे साहित्य, कृती लिहून मिळालेली, वर्षानुवर्षांची चालत आलेली निरीक्षणं आपली आपण डोळे भरून करायची आणि पुस्तकातल्यासारखाच निष्कर्ष आला की आम्हाला भरून पावायचं.

            आम्ही प्रयोग तर करायचो हेही नसे थोडके! शालेय शिक्षण संपवून आम्ही संसारात पडलो, पण “प्रत्येक जण हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो.” या उच्च विचाराचा पाठपुरावा करत आम्ही आमच्या परीनं, मनाला भावलेल्या काही गोष्टींचं अनुकरण केलं. आमच्यासाठी ते सगळे प्रयोग अनोखेच होते.

            घर, नोकरी, मुलं ही कसरत करता करता व्यायामाची आवड आणि निकड स्वस्थ बसू देत नव्हती. आजूबाजूला खूपच प्रयोगशील मित्र-मैत्रिणी! आजच्या प्रयोगांची सुरुवात निष्कर्षापासून व्हायची. उदाहरणार्थ, “रोज सकाळी पळण्याचा व्यायाम प्रकृतीला चांगला हे त्रिकालबाधित सत्य! आजची सवय म्हणजे माहितीतलेच प्रयोग स्वत:चे म्हणून करायची. त्यामुळे आम्ही हा प्रयोग सुरू केला. साहित्याची जमवाजमव म्हणजे पळण्यासाठी वेगळे बूट, वेगळा ट्रॅक सूट यांची खरेदी अगदी धामधुमीत झाली. कृती करण्याची वेळ आली, तेव्हा आमची प्रयोगशीलता उफाळून आली. मूळ कृतीत बदल करून आम्ही रोजच्या ऐवजी एक आड एक दिवस, पुढे दोन दिवसांनी एकदा, त्याही पुढे आठवड्यातून एकदा असं सुरू केलं. किती वेळ पळायचं, गहन प्रश्‍न! स्वत:ची तयारी आणि एकमेकांच्या भेटीगाठींत जास्त वेळ जाऊन “पळण्याचा व्यायाम” कमी होत होत पाच मिनिटांवर येऊन ठेपला. आजचा निष्कर्षसुद्धा मूळ सिद्धांताहून बदलला. “पळण्याचा व्यायाम” प्रकृतीसाठी चांगला असला तरी आजच्यासारख्या घरीदारी कामात असणार्‍या लोकांना करता येण्यासारखा नाही. (सकाळी उठणं झेपत नाही!)

            या प्रयोगानंतर भूमीवरून आमची नजर पाण्याकडे वळली. “पोहणे” या विषयावर आम्ही खूप भारून जाऊन चर्चा करू लागलो. सूट-बूट मागे पडले आणि पोहण्याचे पोशाख आले.

            याही प्रयोगात आमचीच परीक्षा पाहिली गेली. थंडी आणि पाऊस आमच्या विरोधात गेले आणि आमचा बारमाही पोहण्याचा व्यायाम हंगामी सुटीपुरताच उरला. तरीही आम्ही मागे हटलोच नाही. आमची नजर भिडली ती थेट सिंहगडच्या माथ्याला. “सिंहगड वारकरी संघाची” वाटचाल आमच्यापर्यंत येऊन पोहोचली. दर रविवारी पहाटे उठून सिंहगड चढायला जायचं नक्की ठरलं.

            मगर जमाना बहुत बुरा है। ती पहाटेची प्रसिद्ध “स्वारगेट-सिंहगड बस” कायमच गच्च भरलेली आणि आम्हालाच जागा न देणारी. अतिशय वेळेवर सुटणारी आणि आम्हाला मागेच टाकून जाणारी. शेवटी कंटाळून बसचा नाद सोडून आमच्या खाशा स्वार्‍या दुचाकींवर बसच्या मागे निघाल्या. बस पायथ्यापासून परतली. पण आम्ही मात्र पायउतार न होता थेट त्या दुचाक्याच वरपर्यंत दौडवल्या. वर पोहोचून पिठलं भाकरी आणि दही खाण्यासाठी चाललो तेवढाच व्यायाम.

            आमच्या तावडीतून हेल्थ क्लब आणि एरोबिक्सही सुटले नाहीत. आमची प्रयोगशीलता आम्ही एरोबिक्सच्या इंग्लिश गाण्याऐवजी हिंदी गाणी वाजवण्यात (प्रायोजक - दलेर मेहंदी आणि सहकारी) दाखविली. त्यानंतर सगळे जमलोच आहोत तर कॉफी, वडा, कधीतरी पाणीपुरी हा परिपाठ खूप दिवस (महिने किंवा वर्ष नाही) पुरवला.

            पुढची गाठ पडली ती व्यायामासाठीची घरातली सायकल आणि जवळपास फिरण्यासाठी दुसरी सायकल यांच्याशी! चाकात हवा नसणे हा यातला मोठा अडथळा ठरला. घरातल्या सायकलीच्या हॅन्डलचा छत्र्या टांगण्यासाठी बराच उपयोग झाला.

            अशी ही आजची प्रयोगशीलता गेली 10-12 वर्ष सातत्यानं टिकून आहे, आजच्या फसलेल्या प्रयोगांनी नाउमेद न होता आम्ही सतत नव्याच्या शोधात आहोत. माझी खात्री आहे, न्यूटन, आईनस्टाईनसारख्या मोठमोठ्या शास्त्रज्ञांचेसुद्धा कित्येक प्रयोग फसले असतीलच. आम्हालासुद्धा कधीतरी  “युरेका” म्हणण्यासारखा शोध लागेल. पण तरीही या व्यायाम-प्रयोगाच्या वाटचालीत काही थोड्या “शोधकणिका” आमच्या हाती लागल्याच आहेत. या यशस्वी प्रयोगांच्या शोधाचं श्रेय कोणाचं? यावरून आता आमच्यात थोडे कुंग फू, कराटे (चक्क मारामारीचा व्यायाम) चाललेत. त्यामुळेच मी अजिबात दिरंगाई न करता या शोधकणिका “माझ्या” म्हणून सांगतेय. उदाहरणार्थ-1. राहण्यासाठी शक्यतो वरचा मजला व लिफ्ट नसलेली बिल्डिंग निवडावी. 2. अशा घरांमध्ये जमल्यास कुत्रा किंवा मांजर असे पाळीव प्राणी पाळावेत. म्हणजे तुम्हाला त्यांच्यासाठी वारंवार खालीवर जावं-यावं लागेल. 3. स्वयंपाकघरात काम करताना जमतील तेवढी कामं जमिनीवर बसून करावीत; ओट्याशी उभं राहून करू नयेत. ही कामं साधारणत: कणिक तिंबणे, भाज्या चिरणे अशा पद्धतीची असावीत म्हणजे हातांना व्यायाम होतो. काहीतरी सामान घ्यायचं राहिलं, की ते घेण्यासाठी ऊठबस होऊन पायांना, पोटाला, पाठीला व्यायाम होतो.

            “हसत-खेळत स्वयंपाक व व्यायाम” अशा बर्‍याच छोट्या छोट्या प्रयोगांच्या कृती माझ्याकडे आहेत. त्या माहीत करून घेण्यासाठी लवकरात लवकर भेटा, कारण ही “शोधकणिका” वाचून माझ्याविरूद्ध नक्कीच कुणीतरी कोर्टाची नोटीस बजावणार. जी स्वयंपाकघरातल्या कृतीबाबत बोलणं म्हणजे अमेरिकेनं कडुनिंबाचं पेटंट घेण्यासारखं आहे.

ऑडिओ लिंक : 

(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग १८:भांडण्याची कला

 माझ्या बारशाच्या वेळी माझं नाव काय ठेवावं यावर म्हणे बराच खल झाला होता. “क” अक्षरावरून नाव ठेवायचं होतं. “कलावती” नाव सुचवलं गेलं, पण आईनं त्याला तातडीनं नकार दिला, कारण एक तर माझ्या ताईचं नाव “लीलावती” नव्हतं, ज्यायोगे “कलावती” चं यमक जुळेल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे, “मुलाचे (मुलीचे) पाय पाळण्यात दिसतात”, या म्हणीनुसार मी मोठेपणी काय करीन, हे जरी दिसत नसलं, तरी कोणत्याही कलेच्या क्षेत्रात फार हातपाय मारू शकणार नाही, याची तिला माझ्या पाळण्यात उडणार्‍या हातापायांकडे पाहून खात्री पटली होती.

माझ्या नावाबद्दलचा हा किस्सा ऐकत-ऐकतच मी मोठी झाले. त्याचबरोबर आपल्याला कोणतीच कला येत नाहीये, या दु:खाचं रूपांतर हळूहळू संतापात होऊ लागलं. मी खूप भांडखोर बनत चालले (म्हणणारे म्हणोत, की मुळातच तिचा स्वभाव भांडखोर आहे.) “वार्‍याशीसुद्धा भांडू शकते”, अशी वरची श्रेणी मला प्रत्येक भांडणात मिळू लागली. “भांडण” ही एक अवघड कला आहे आणि तिची साधना इतकी वर्षे करीत असल्याने आपल्याला ती काही प्रमाणात का होईना, पण साध्य झालीय, अशा निष्कर्षाप्रत मी पोहोचले. आपण इतरांना ही कला शिकवू शकतो, असं मला जाणवलं. “भांडण : एक कला” या विषयाचा कोचिंग क्लास आपण सुरू करावा, असं मला वाटू लागलं. त्यासाठी लेखी आणि प्रात्यक्षिक अभ्यासक्रम तयार करण्याचं मी ठरवलं.

लेखी अभ्यासक्रमाची मी काही ढोबळ वर्गवारी केली. भांडणाचा आजवरचा इतिहास, कालानुरूप भांडणाच्या स्वरूपात होत गेलेले बदल याचा आढावा घेतला. इतिहासातल्या महत्त्वाच्या भांडणांची उजळणी क्रमवार मांडली. उदा. - रामायण, महाभारतातील राज्यासाठीची भांडणं, इंग्रजांनी भारतावर राज्य केले, त्या काळातली इंग्रजांबरोबरची आणि इंग्रजांनी लावलेली भांडणं, स्वतंत्र भारतातील विविध राजकीय पक्षांमधली भांडणं ते अगदी अलीकडच्या हॉकी-क्रिकेटसारख्या खेळांमधली भांडणं वगैरे वगैरे....

“भांडणांची कारणे” असे एक वेगळे पाठ्यपुस्तक तयार केले. त्यात सुरुवातीला भांडणं ज्या कोणत्या  नात्यांमध्ये होऊ शकतात, त्या सगळ्या वेगवेगळ्या नात्यांचे गट केले. उदा. आईवडील-मुलं, नवरा-बायको, भावंडे, शेजारी, सहकारी, सार्वजनिक ठिकाणची गर्दी इ. इ. प्रत्येक नात्यानुसारच भांडणाच्या वेगवेगळ्या कारणांची यादीही लांबू लागली. उदा. शेजार्‍यांमधील भांडणांसाठी नळाचं पाणी आणि खिडकीतून भिरकावलेला कचरा त्या दोन कारणांची टक्केवारी सगळ्यात जास्त आली. नवरा-बायकोच्या भांडणात बायकोनं नवी साडी नेसलीय्, हे नवर्‍याच्या लक्षात आले नाही आणि त्यानं बायकोचं कौतुक केलं नाही. त्यामुळे कडाक्याचं भांडण पेटलं. या कारणाला अग्रमानांकन मिळालं. भांडणासाठीचा शब्दकोश संग्रहित करणं. हे खूप अवघड काम होतं. अस्सल ग्रामीण मराठीतले भांडणासाठीचे इरसाल शब्द, शहरी मध्यमवर्गीय भांडणातले जपून वापरले जाणारे शब्द, शालजोडीतले शेलके शब्द, भांडताना मधूनमधून पेरता यावेत यासाठी हाताशी असणारे काही खास फॅशनेबल इंग्रजी शब्द (सिली, स्टुपिड, शट अप...) तात्त्विक भांडणासाठी लागणारे मोठमोठे अवजड शब्द असं करीत-करीत ते एक मोठं बाड झालं.

लेखी अभ्यासक्रम पुरा करता-करताच प्रात्यक्षिकांची तयारी सुरू केली. भांडणासाठी लागणारा मुख्य गुण म्हणजे तारस्वरात लागलेला आवाज! आवाज चढवून सतत सतत दुसर्‍यावर शब्दांचा भडिमार करणं सोपं नसतं महाराज! भांडता भांडता तापत जाणारा आवाज जर मध्येच चिरका झाला, तर त्या भांडणातली सगळी हवाच जाईल. त्यामुळे तो भांडणासाठीचा खास वरच्या पट्टीतला आवाज कमविण्यासाठी गळ्याची मेहनत आली. तीव्र आवाजात बोलण्याची सवय होण्यासाठी दोन-दोन जणांचे गट केले. रोज संध्याकाळी 15 मिनिटे पुण्याच्या कोणत्याही वेगवेगळ्या चौकात उभे राहून त्या दोघांनी मोबाईल फोनवरून संभाषण करण्याची योजना केली. आठ दिवसांत मोठ्याने बोलण्याची सवय होते, असं लक्षात आलं. या चाचणीचा पुढचा टप्पा म्हणजे, कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सवातल्या चालू ध्वनिवर्धकांसमोर 10 ते 15 मिनिटे समोरच्याशी संवाद (?) साधणं, हे उद्दिष्ट दिलं. ते साध्य करणार्‍यांच्या आवाजाची प्रत तपासल्यावर ती विशेष गुणवत्ता मिळविण्याइतकी उंच गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही पूर्ण चाचणी प्रात्यक्षिकांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली. भांडणाच्या विषयानुसार आवाजाचा चढ-उतार, शब्दफेक, आवेश, जोष या सगळ्यांचा रियाज हा आवश्यकच. त्यामुळे तोही अभ्यासक्रमात घातला. भांडताना तोंडाचा पट्टा चालू असतो, तेव्हा नजरेतूनही संताप वगैरे व्यक्त होण्यासाठी डोळ्यांचे काही खास व्यायाम विकसित केले. भांडण कधीही मुद्यावरून गुद्यावर जाऊ शकतं, हे लक्षात घेऊन पुढची पायरी म्हणून गुद्यांसाठीही मानसिक आणि शारीरिक क्षमता अंगी बाणवण्यासाठीचे प्रयत्न म्हणून ज्युदो-कराटेसारखे काही खेळ ठरविले.

इंटरनेटच्या जमान्यात “चॅट” वरच्या भांडणात कमी पडू नये, म्हणून संगणकाचे मूलभूत प्रशिक्षण आणि इंटरनेट वापरासंबंधीची काही प्रात्यक्षिके नेमून दिली. त्याबरोबर भांडणाच्या विविध वेबसाईटस (संकेतस्थळे) तयार केल्या.

भांडण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी गटागटांच्या वेगवेगळ्या सार्वजनिक नळांना भेटी, रिक्षावाल्यांशी हुज्जतीची सवय व्हावी म्हणून रिक्षातून अभ्यास सहल, सरकारी ऑफिसातून एखादे काम करून आणण्यासाठी खास नियुक्ती अशा षळशश्रवुेीज्ञ चा भांडणाच्या वरच्या वर्गाच्या अभ्यासक्रमात अंतर्भावच केला.

हा सगळा अभ्यासक्रम एखादी मैफल जमावी, तसा मनासारखा जमून आलाय याची खात्री पटताच “भांडण-एक शास्त्रोक्त शिक्षण” असे पेटंट मिळविण्यासाठी मी अर्ज केला, पण परंपरेनुसार कोणत्याही भारतीय गोष्टींच्या पेटंटवर फलाण्या अमेरिकी माणसानं आधीच हक्क सांगितलेला असतोच. त्यामुळे माझा पेटंटचा अर्ज हा त्याला अपवाद नव्हताच. आता हे पेटंट मिळविण्यासाठी मी न्यायालयीन भांडण करण्याच्या विचारात आहे. त्या निमित्तानं “भांडण” या कलेचं आजपर्यंत माझ्याकडून दुर्लक्षित राहिलेलं हे न्यायालयीन अंगही जवळून अभ्यासायला मिळेल. शेवटी काहीही झालं, तरी या भांडणकलेची मी हाडाची उपासक आहे आणि कोणत्याही सच्चा कलाकाराप्रमाणे या कलेचा एकेक पैलू आत्मसात करण्याचा मी माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत प्रयत्न करणारच!



ऑडिओ लिंक :  
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

भाग १९: विश्‍वकरंडक असाही

 2003 च्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा सुरू व्हायच्या आधी सईची “किती हा कंटाळवाणा खेळ” अशी कुरकुर असायची. “चौथीत गेलीय तशी अजूनही क्रिकेट पाहत नाही; कसं व्हायचं हिचं पुढे आयुष्यात?” अशी एक आदिम चिंता मला भेडसावत असायची. क्रिकेटची मॅच चालू असताना खुशाल तरातरा जाऊन टीव्हीचं चॅनल बदलणारी ही माझी (!) मुलगी मला विश्‍वकरंडकाच्या मॅचेस सुरळीत पाहू देईल की नाही, ही शंकासुद्धा होतीच.

मी मॅच बघण्याचे प्रयत्न सोडत नव्हते. हळूहळू विरोध करायचा तिला कंटाळा येऊ लागला. मारून-मुटकून ती माझ्याबरोबर टीव्हीसमोर मॅच पाहायला (?) बसायला लागली. दर ओव्हरनंतर फिरणारे जाहिरातींचे गारुड तिला हळूहळू खेचू लागलं. “पेप्सी”च्या माध्यमातून सचिन, गांगुली, द्रविड, हरभजनसिंग अशा सगळ्या भारतीय क्रिकेटपटूंची ओळख तिला थोडी-थोडी पटू लागली. सतत समोर दिसत असल्यामुळे शेन वॉर्नसुद्धा तिच्या डोळ्यांत ओळखीची खूण उमटवू लागला. माझ्या आशा पल्लवित झाल्या. वार्षिक परीक्षा जवळ आल्यानं इतिहास, भूगोल, गणित, शास्त्र असा सगळा अभ्यास घेता-घेता हिचा क्रिकेटचा अभ्यासही करवून घेण्याचा मी निश्‍चय केला. सईला “क्रिकेटवाली” करवून खर्‍या अर्थानं (!!) तिला भारतीय नागरिक बनवणं, हे एक भारतीय आई म्हणून माझं परमकर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी निष्ठेनं पार पाडायचं ठरवलं.

“ते बघ, तिला पण क्रिकेटमधलं काहीच कळत नाहीये, तरी बसलीये ना तिथे” असा “मंदिरा”चा दाखला देत “एक्स्ट्रा इनिंग” मध्ये जमणार्‍या पतौडी, कपिलदेव, श्रीकांत या जुन्या रथी महारथींबद्दलची माझी भक्तिभावना मी तिच्यापुढे आनंदाने प्रकट करू लागले. तिच्या इतिहासातल्या ग्रीक, रोमन साम्राज्यांच्या रसभरित हकिगती पाठ करून घेतानाच क्रिकेटमधल्या वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान अशा विविध परकीय साम्राज्यांच्या आणि त्यातील विविध सम्राटांच्या रोमहर्षक लढायांचा आढावा घेऊ लागले. ज्युलियस सीझर, फिडीपिडीस, रोम्युलस यांच्या स्पेलिंग्जबरोबर वॉल्श, सोबर्स, रिचर्ड, बोथम, रणतुंगा, बॉर्डर, इम्रान वगैरेंची स्पेलिंग्जही गिरवू लागले.

भूगोलाच्या अभ्यासात, भारतातली सगळी राज्यं, त्यांच्या राजधान्या, तिथलं पीकपाणी हे पाठांतर चालूच होतं. सईनं आणि मी मिळून आमच्या भूगोलाच्या कक्षा रुंदावल्या. “विश्‍वकरंडका”त सहभागी झालेल्या सगळ्या टीम्सच्या देशांची नावं पाठ झाली. (म्हणजे कांगारूंचा ऑस्ट्रेलिया, किवींचा न्यूझीलंड वगैरे) मॅचेसच्या ठिकाणांनुसार दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेमधील त्या त्या प्रसिद्ध स्थळांची सगळी माहिती तिच्या मेंदूत कोंबली गेली.

प्रत्येक मॅचमध्ये “रनरेट” काढताना सहाचा पाढा अगदी पाठ झाला. “मॅच जिंकण्यासाठी अजून किती रन्स?” “किती बॉलमध्ये किती रन्स?” अशा प्रश्‍नांमुळे बेरीज-वजाबाकी, त्रैराशिक तयार होऊन गेलं. हा क्रिकेटचा इतिहास-भूगोल, गणिताचा अभ्यास करता-करता क्रिकेटच्या भाषाशास्त्राचा अभ्यास चालूच होता. क्रिकेटचे मूलभूत कायदेकानून ती हळूहळू शिकत होती. भारत-पाकिस्तान मॅचपर्यंत “एल.बी.डब्ल्यू” “क्लीन बोल्ड”, “सिक्स-फोर” यॉर्कर, फुल टॉस, स्ट्रेट ड्राईव्ह, स्वीप असे काही शब्द अर्थासह किंवा अर्थाशिवाय म्हणण्याइतकी तिची प्रगती झाली. त्या मॅचच्या भारलेल्या वातावरणाचा नाही म्हटलं तरी तिच्यावरही परिणाम झालाच. इतके दिवस रडत-खडत मॅच बघणारी सई, पुढच्या “सुपर सिक्स”च्या मॅचेस हिरिरीने पाहू लागली. “सचिनला “मॅन ऑफ द मॅच” द्यायचं सोडून श्रीनाथला का?” अशी माझ्याशी हुज्जत घालू लागली. “कसा सोपा कॅच सोडला” वगैरे टिपण्या करू लागली. या सगळ्यामुळे माझ्या “क्रिकेट फिव्हर” मध्ये तीही आजारली.

माझ्या क्रिकेटमधल्या अंधश्रद्धांनी तिचाही ताबा घेतला. “आपल्या बॅटिंगच्या पहिल्या दोन ओव्हर्स आपण पाहिल्या नाहीत की आपण जिंकतो” हे माझं समीकरण तिनंही आचरणात आणलं. मागच्या केनियाच्या मॅचला मावशी गवार निवडत मॅच पाहत होती. ही निकडीची आठवण तिनंच मला केली. त्यामुळे मीही लगेचच ताईला फोन करून “सेमी फायनल” साठी किलोभर गवार आणून निवडायला सांगितलं. ऐश्‍वर्या रायच्या एका जाहिरातीत दाखवलं होतं, की तिनं “कोक”ची बाटली उघडली, की चौकार अथवा षटकार ठोकला जायचा. म्हणून ती मॅच संपेपर्यंत ढीगभर बाटल्या कोक प्यायची. आम्ही आपले गवार निवडणार!

फायनलला आमची गणितं चुकली. आजपर्यंतच्या मॅचेस न पाहिलेल्या लाखो लोकांनी शेवटची मॅच पाहायची ठरवली आणि तिथेच सगळं चुकलं. आजपर्यंतच्या प्रत्येक मॅचला आम्ही जे जे केल्यामुळे किंवा न केल्यामुळे मॅच जिंकली गेली (म्हणजे गवार वगैरे) ते संतुलन या लाखो लोकांच्या अचानक मॅच पाहण्यामुळे ढळलं आणि मॅच “हातची” गेली. डाव्या हातानं करंडक स्वीकारण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं. (डावखुर्‍या कर्णधाराप्रमाणे आम्ही दोघीही डावखुर्‍याचं!)

पण तरीही, फार काही बिघडलं नाही. क्रिकेटबाबतचा भारतीय दुर्दम्य आशावाद आहेच. “ओनिडा” च्या जाहिरातीसारखं. यंदाच्या दक्षिण आफ्रिकेतल्या विश्‍वकरंडकापासून पुढच्या वेस्ट इंडिजमधल्या विश्‍वकरंडकापर्यंत पुन्हा अभ्यास, पुन्हा जय्यत तयारी. नव्या जोमानं! शिवाय एक जास्तीचं समाधान आहेच. सईच्या सुजाण क्रिकेटीय भारतीय नागरिकत्वाच्या निर्मितीची प्रक्रिया या विश्‍वकरंडकापासून पुढच्या विश्‍वकरंडकापर्यंत!

ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

Thursday, October 1, 2020

बालदोस्तांचे काव्यवाचन : भाग ४ ते ६

 भाग  ४

कविता : बॅट्समन 

कवी: मंगेश पाडगावकर 

काव्यवाचन: चि. नाथन गाडगीळ


 भाग  ५ 

कविता : ऑनलाईन शाळा  

कवयित्री: सिद्धी ढोके, 

काव्यवाचन: कु. ओवी चौगुले 


 भाग   

कविता : पतंग   

कवी:अ. ज्ञा. पुराणिक 

काव्यवाचन: कु. उत्पला गाडगीळ