Monday, July 27, 2020

माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक २:गंगाधर पुरुषोत्तम : : श्री. बलबीर अधिकारी



लेखांक :गंगाधर पुरुषोत्तम

डोक्यावर करडे परंतु भरपूर केस, भावुक डोळे, वरकरणी हसरा पण मधूनच गंभीर होणारा चेहरा, सामान्य मराठी माणसाचा बुशशर्ट व पँट हा पेहराव, कधी चौकटी वा निळा कोट घालून एक्झिक्युटिव्ह दिसण्याचा वा थंडी आवरण्याचा गोंडस प्रयत्न, कशालाही हो म्हणून डावा हात केसावरून फिरवत आत्मविश्वास वाढवण्याची ढब एवं गुणविशिष्ट गंगाधर पुरूषोत्तमंचा आणि अस्मादिकांचा परिचय घडला तो थोडा नाट्यमय प्रसंगानेच.

      आमच्या कंपनीत एक नवीन सामाजिक प्रकल्प आकार घेत होता. त्यासाठी तळमळीची दोन माणसे हवी होती. आम्ही कारखान्यातले कर्मचारी असलो तरी युवा कार्यकर्ते असल्याने आमचा लोकसंग्रह बरा होता. लोक आमचा प्रामाणिकपणा ओळखत होते. शब्दाला थोडे वजन होते. कामात टापटीप व वक्तशीरपणा होता. यामुळे आम्हाला त्या कामासाठी बोलावणे आले व गंगाधार पुरूषोत्तमांच्या नेतृत्वाखाली परिणामकारक अंमलबजावणीची आज्ञा झाली. आम्ही त्यांच्या कार्यालयात गेलो तेव्हा कुठल्यातरी प्रदर्शनाचे आयोजन सुरू होते. आम्हाला पाहून त्यांनी केवळ हॅलो न करता जवळ येत हस्तांदोलन करून पाठीवर हात ठेवला व सार्यांना उद्देशून ते म्हणाले  'Here come the two friends. Now the project will march ahead, galloping & dancing.' आणि खरोखरच प्रकल्पाने वेग घेतला. त्यांचा कामाचा उरक चांगला होता. दृष्टी तीक्ष्ण होती पण नको त्या विषयाकडे दुर्लक्ष करण्याइतकी ती उदारही होती. स्वत: प्रसिद्धीप्रमुख असले तरी ते प्रसिद्धी पराङ्मुख होते. जवळजवळ दर आठवड्याला एक कार्यक्रम, दरम्यान भेटी, भोजन, नियोजन, आर्थिक तरतूद, आमंत्रणे, स्थानिक नेते मंडळींशी सल्लामसलत, वार्तापत्र, बुलेटिन, हिशेब, फोटोग्राफी सारे असायचे. प्रकल्प वृक्षारोपणाचा. त्यामुळे तीही तरतूद असायचीच. शिवाय त्यांचे इतर कामही असायचे. तेही मोठेच असावे असे आज वाटते. त्यावेळी आम्हाला आमचेच काम मोठे वाटायचे. तेही तसेच भासवायचे. आणि आमच्याबरोबर आमच्या कामात रममाण व्हायचे.

      वरून धडधाकट असले तरी जी.पी. (हे टोपणनाव त्यांच्या मित्रांनी त्यांना दिले होते) प्रकृतीने तसे नव्हतेच. चहा जास्त  व्हायचा की ते फक्त चहाच प्यायचे हे कळत नसे. जेवण हा अप्रिय विषय होता. इतरांसमोर खाणे त्यांना कदाचित असंस्कृतपणाचे वाटत असावे. बरोबरचा डबा बहुधा घरी परत जाई अथवा दान केला जाई. त्यामुळे आम्लपित्त वाढून त्रास होई पण त्यांनी कधी इलाज केल्याचे दिसले नाही.

      जी. पी. म्हणजे बॉर्न टू सफरयाचे आणखी एक उदाहरण म्हणजे आमची संयुक्त दिल्ली भेट-ट्रेड फेअरमध्ये आमच्या कंपनीचा प्रदर्शन स्टॉल होता. त्यानिमित्त आम्ही तिथे होतो. महाराष्ट्र भवनात आमचा मुक्काम होता. थंडीचे दिवस होते, ते दररोज सकाळी नाश्ता झाल्यावर अथवा रात्री मला दूध वा फळांचा रस प्यायला घेऊन जात. नको म्हटले तरी स्वत:च पैसे देत. स्वत: काही खात नसत. एकेदिवशी सकाळी ते उठले नाही म्हणून मी त्यांच्या खोलीत गेलो तेव्हा ते पंचा ओढून झोपले होते. कांबळे अथवा शाल का घेतली नाही हे तर त्यांनी मासलेवाईक उत्तर दिले. “थंडी सहन होते का ते पाहत होतो.”

      खरे पाहता ते कुडकुडत होते. बहुदा कपडे मिळाले नसावेत किंवा कंटाळा केला असावा. स्वत:ची सोय करून घेण्यापेक्षा त्रास काढणे त्यांना पसंत होते की काय ते कळत नसे, आपली कामे ते सफाईने करीत. मग ती सभा असो, मिटिंग असो वा चर्चा-फील्डमधले काम करण्यातही त्यांचा हातखंडा होता. टिपणे, रिपोर्ट, कलासक्ती, सौंदर्य यांची त्यांना जाण होती. सहकार्यांविषयी सहानुभूती व वरिष्ठांविषयी आदर होता. विषयाचा आवाका त्यांच्या सहज लक्षात येत असे. इंग्रजी व मराठी त्यांना सारखेच चांगले येत असे. या सर्व गुणांमुळेच त्यांची प्रतिमा चांगली होती. ती वाढविण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यांचा उपजत स्वभावच ममत्व असणारा होता. त्यांना राग येत असेच पण तो व्यक्त करणे त्यांना कमीपणाचे वाटे.

      मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना जी.पी. जिल्हा प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम पाहत होते. कामाचा उरक व अचूकता त्यावेळी त्यांनी उत्तमपणे दाखवली. वर्तमानपत्रे व इतर प्रसिद्धी माध्यमे यांच्याशी जवळीक साधणे व कार्यक्रमांची वृत्ते प्रसिद्धीला देणे; तसेच मनमोहक स्वभावाने ते वार्ताहरांना स्विकारण्यास प्रवृत्त करणे या गोष्टी सहज करीत. वृत्तसंकलन व प्रसिद्धी यातील विशेष नैपुण्यामुळे त्यांच्या नावाला प्रसारमाध्यमांच्या जगात मोठे वजन होते.

      त्यांच्या कार्यकाळात ट्रॉम्बे विस्ताराचे दोन टप्पे, विपणन विभाग विस्तार व थळ खत कारखान्यासंबंधीच्या प्राथमिक बाबी पूर्ण झाल्या. कंपनीचे अस्तित्व 1978 साली वहिवाटीस आले. हे सर्व त्यांनी चांगल्याप्रकारे कार्यान्वित केले. थळ खत प्रकल्प उभा राहण्याअगोदर त्या जागी राज्य व केंद्र सरकारचे अधिकारी व मंत्री यांनी दिलेल्या भेटी, जागतिक बँकेच्या पथकांनी केलेली पाहणी, स्थानिक पातळीवर झालेला विरोध व तोे कमी करण्यासाठी आखलेल्या योजना यात जी.पी. अग्रभागी होते. आम्ही त्यांच्याबरोबरच होतो. कृषिविकास व समाजसेवा या क्षेत्रात कंपनीतर्फे जे प्रामाणिक प्रयत्न झाले त्यात जी.पी. चे स्थान मोठे व मानाचे होते.

      समाजाविषयी कृतज्ञता व कंपनीची सामाजिक उद्दिष्टे याविषयी दक्ष असणारे जी.पी. स्वत:विषयी मात्र बेफिकीर असत. त्यांना पगार नेहमीच कमी मिळे. वेगवेगळ्या कामासाठी घेतल्या गेलेल्या अग्रिम रकमांचा हिशेब करणे व तो नियमांप्रमाणे देणे त्यांना जमत नसावे. त्यामुळे मोठ्या जागेवर काम करूनही त्यांना नेहमी चणचण भासे. खिशात असलेले पैसेही गरजूंना वाटले जात. त्यामुळे सतत अडचण असे. प्रकृतीकडे लक्ष देण्याइतके अवधान व वेळही त्यांना सापडत नसे. त्यामुळे ते सारेच अंगावर काढीत. परिणामी केवळ 49 व्या वर्षी त्यांना पक्षाघात होऊन ते कोसळले आणि त्यातच त्यांचा अंत झाला.

      आज विचार करता 40 वर्षांनी देखील जी.पीं ची आठवण मनात ताजी आहे. त्यांच्याबरोबर काम करणार्या आमच्यासारख्या असंख्य मनांना जी.पी. चटका लावून गेले. घरातले वडिलधारे माणूस गेल्यावरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू दिसणार नाही, अशांच्या डोळ्यांना धारा लागल्याचे आम्ही पाहिले. काही असो, जी.पी. हे कंपनीला व समाजाला पडलेले एक हवेहवेसे स्वप्न होते हे मात्र खरे !


गप्पा आजोबांशी:लेखांक 2:



"गप्पा आजोबांशी", म्हणजे संस्कारक्षम वयातील मुलांनी त्यांच्या आजोबांशी मारलेल्या गप्पा आणि त्यातून मनावर बिंबित होणाऱ्या संस्कारांचा ठेवा ! 
श्री. बा. ल. शुक्ल लिखित, मुक्तांगण प्रकाशित पुस्तकाचा लेखांक 2: ऑडिओ स्वरूपात !  
"दुरितांचे तिमिर जावो..."
  

गप्पा आजोबांशी : लेखांक १



"गप्पा आजोबांशी", म्हणजे संस्कारक्षम वयातील मुलांनी त्यांच्या आजोबांशी मारलेल्या गप्पा आणि त्यातून मनावर बिंबित होणाऱ्या संस्कारांचा ठेवा ! 
श्री. बा. ल. शुक्ल लिखित, मुक्तांगण प्रकाशित पुस्तकाचा लेखांक १: ऑडिओ स्वरूपात !  
"दिव्या दिव्या दिपत्कार" !!  

Saturday, July 25, 2020

वाटा.. आनंददायी ऑनलाईन शिक्षणाच्या


१५ मार्च २०२० पासून कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा नियमित वेळेवर सुरु न झाल्याने  विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही शाळांतून तासन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले तर काही शाळांमधून व्हाट्सअप आणि यूट्यूब सारख्या माध्यमातून म्हणजे मेसेंजिंग आणि व्हिडीओ अशा  माध्यमातून शिक्षण सुरू झाले आहे.  या शिक्षण पद्धतीमध्ये पालकांचीही भूमिका महत्त्वाची ठरत आहे. अशा परिस्थितीत सर्वच पालक आपापल्या परीने, विविध विषयांच्या शिक्षणावर तोडगा काढताना दिसत आहे. विषय सोपा करून सांगण्यासाठी कुठले माध्यम , खेळ , उपक्रम, प्रयोग उपयुक्त ठरतो आहे याबद्दलच्या संकल्पनांची  पालकांमध्ये देवाण घेवाण सुरु आहे. 

अशात आम्ही काही मैत्रिणींनी मिळून मराठी भाषा शिक्षणाचा असाच एक प्रयोग आमच्या प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी केला.  सर्वप्रथम मराठी भाषा शिक्षण द्यायचे म्हणजे काय यावर ऊहापोह केला. तेव्हा असे लक्षात आले की  भाषा शिक्षणामागील हेतू हा मुलांचा शब्दसंग्रह वाढविणे, नवीन शब्दांविषयी त्यांना योग्य ते आकलन होणे, त्याद्वारे त्यांची संवाद साधण्याची कला तसेच विचार करण्याची क्षमता वाढीस लागणे असे असायला हवे. मग हे हेतू साध्य करण्यासाठी दुसरी-तिसरीच्या मुलांसमोर आपण असे काय खाद्य ठेवले पाहिजे ज्याचा ते आनंदाने, सहज  वृत्तीने स्वीकार करतील असा विचार आम्ही केला आणि "कविता" हे मुलांच्या आवडीचे माध्यम निवडले.  सुंदर ताल, नाद, ठेका असणाऱ्या कविता मुले सहजपणे गुणगुणायला लागतात, त्यातील  शब्दांचा अन्वयार्थ लावण्यात सुरुवात करतात हा अनुभव पाठीशी होताच.  तेव्हा, मुलांसमोर हा  बालसाहित्याचा अमूल्य ठेवा उलगडण्यासाठी  आम्ही एक ऑनलाईन उपक्रम घेण्याचे ठरविले आणि "कविता मनातल्या" या कार्यक्रमाचे आयोजन केले! मराठी भाषेमध्ये कित्येक श्रेष्ठ, ज्येष्ठ, अनुभवी रचनाकारांनी बालसाहित्य निर्मिले आहे.  कवयित्री शांता शेळके, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज.  विं. दा.  करंदीकर, मंगेश पाडगावकर, कवी ग्रेस  आदींमार्फत उत्तमोत्तम बालकविता रचल्या गेलेल्या आहेत शिवाय त्या चालबध्द केल्यामुळे गेय स्वरूपात त्यांची गाणी देखील उपलब्ध आहेत.  अशाच काही  बालकविता आम्ही मुलांना सुचविल्या, त्या म्हणून दाखवायला, ऐकवायला सुरुवात केली आणि मग त्या सुंदर तालबद्ध केलेल्या कवितेच्या माध्यमातुन  मुले नवीन शब्द, भावनांच्या व्यक्त करणाच्या पद्य-पद्धती   सहजपणे शिकू लागली. कवितांनी  मुलांच्या मनावर गारुड केले.  काहींनी त्या पाठ करून  साभिनय सादरीकरण केले, काही मुलांनी आपल्याला येत असणाऱ्या वाद्यांवर त्या वाजविल्या तर काही मुलांनी त्यावर नृत्य करणे पसंत केले.  विशेष म्हणजे मुलांनी स्वतःहून रस दाखवित, कल्पकता लढवत  उत्साहाने कार्यक्रमाची तयारी केली.   मुलांची तयारी झाल्यावर मुलांच्या पालकांकडून आम्ही त्या कवितांचे व्हिडिओ मागविले  आणि मग तयार झाला "कविता मनातल्या " कार्यक्रमाचा युट्युब प्रीमिअर !! सर्वच मुले उत्कंठतेने प्रिमिअरची वाट बघत होती. त्या  प्रीमिअरचा  सगळ्या मुलांनी, घरातील सर्व कुटुंबियांसोबत आनंद घेतला. कित्येक दिवसांनंतर आपल्या वर्गमित्रांना असे डिजिटली भेटणे मुलांना जाम आवडले.  युट्यूब वरील हा व्हिडिओ मुलांनी  पुनः पुनः पाहिला आणि आता तर आपल्याशिवाय आपल्या इतर मित्रवर्गाने सादर केलेल्या जवळपास १७ कविता, आठवड्याच्या कालावधीतच मुलांना मुखोदगत झालेल्या आहेत.  या  युट्युब प्रीमिअर उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी, भाषा तज्ज्ञांनी  कौतुक केले आहे. हा व्हिडिओ पुढील लिंकवर उपलब्ध आहे. 

https://www.youtube.com/watch?v=PEDn8UoPWkM

या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातुन आम्ही पुढील हेतू साध्य करण्यास सफल ठरलो. १) कवितांच्या माध्यमातून मुलांचा शब्दसंग्रह वाढविणे, २) विविध भावना व्यक्त करणेसाठी कवितेच्या माध्यमाचा उपयोग, ३) मराठीतील संपन्न  बालसाहित्याची ओळख, ४) प्रभावी सादरीकरण पद्धती, ५) मुलांच्या कल्पकतेला चालना  इ.   

शैक्षणिक टाळेबंदीचा कालावधी किती लांबणार आहे त्याची आपल्याला कल्पना नाही. पण तो पर्यंत शिक्षण जास्तीत जास्त आनंददायी कसे करता येईल यावर मात्र कल्पक उपाय शोधत राहिले पाहिजे. बघुया, काय काय समोर येतेय ते !!       

       डॉ. रुपाली कुलकर्णी,

९०११८९६६८१

                                                                                                                    alparambha@gmail.com 

                    



Saturday, July 11, 2020

माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १: पठाणमामू : : श्री. बलबीर अधिकारी



लेखांक १: पठाणमामू

      त्याचे खरे नाव काय होते ते माहित नाही. सारे जण त्याला पठाणमामू म्हणत. आम्हीही तेच नाव वापरत असू. खरे नाव माहीत करून घेण्याची वेळ वा गरज कधी पडलीच नाही. नामपूर गावात चार फाट्यावर एका झोपडीवजा घरात मामूचा संसार होता. स्वत: व्यवसायाने गवंडी असूनही त्याने आपल्या घराची वीट कधी सरळ रेषेत बसवली नाही. ओळंब्याचा वापर करणे त्याला जणू कधी जमलेच नाही, पण त्यामुळे त्याचे कधी अडले आहे, असेही कधी दिसले नाही.

      मामूचा गोतावळा बराच मोठा होता. गावात त्याचा भाऊ आणि त्याचा परिवार बहाद्दर म्हणून प्रसिद्ध होता. पुराने वेढलेल्या नदीत उतरणे, कोणाच्या घरात साप घुसला असेल तर तो हुसकणे वा मारणे, खोल बारवेत उतरून तळाची चीजवस्तू काढून देणे यात त्याचा हातखंडा होता. कदाचित त्यामुळेच तो लोकांना हवाहवासा वाटत होता. त्यालाही असे कलंदराचे जीवन प्यारे असावे, असे त्याच्या एकंदर वागण्या-बोलण्यात जाणवत होते. मामू मनस्वी जीवन जगत होता.

      मनस्वी स्वभावामुळेच मामूने एक दिवस आपल्या भाईबंदाना आवडणारी गोष्ट केली. त्याने चक्क प्रेमविवाह केला. गावच्याच परिसरात असणार्या भिल्ल वस्तीतील राबिया नावाच्या तरूणीने त्याच्या मनात घर केले होते. दिसायला साधारण, सावळ्या वर्णाची राबिया नवीन लुगडे पडशी अंगावर ओढत पठाणमामूबरोबर मोमिनवाड्यात आल्याचे पाहून सार्यांनी गिल्ला केला. मामूला धमक्या दिल्या. गावातून बाहेर काढण्याबद्दल सुनावले, पण पठाणमामू सच्चा होता. मोठ्या दिलाचा होता. तिच्यासाठी त्याने सारा गोतावळा सोडला, पण अखेरपर्यंत तिला अंतर दिले नाही. त्याचा परिणाम म्हणूनच गावाच्या चार फाट्यावर त्याला झोपडीत संसार मांडावा लागला. पठाणमामू राबियाला आपले अपत्य नव्हते, पण गांवातील सारी मुले त्याच्या झोपडीत खेळत. बकर्या, कोंबड्या, म्हैस, यांच्याबरोबर मुलांचा वेळ चांगला जाई. खाटेवर मामू चिलीम ओढत बसलेला आणि राबिया घरकाम करताना दिसे. आला गेला मामूला हाक देई. तेव्हा मामू उठण्याचे कष्ट घेता आतूनच उत्तर देत असे. चंद्रमौळी घरामुळे आत-बाहेर असे काही नसायचंच. दर दिवाळीला आणि राखीला आईकडून तो ओवाळून घ्यायचा. आईही नाते जपायची. जमेल ते गोडधोड त्यांच्यापुढे ठेवायची अन् दुखले खुपले पाहायची. अशी नाती शेजारधर्माला उन्नत स्वरूप प्राप्त करून देत असायची. बघणारालाही बरे वाटायचे. गावात एक बरे असते. रीतिभाती सोडल्या तर सारी माणसे - माणसेच असतात. त्यात कुणी हिंदू, कुणी मुसलमान, कुणी बाई, कुणी पुरूष असा भेद नसतो. सारे रोखठोक असते. मनात एक, ओठात एक अशी द्विधा वा लेचीपेची प्रवृत्ती नसते. प्रेमही खरे असते आणि वैरही खरेच असते. ते परिणामाची विशेष पर्वा करीत नाही. पठाणमामूने तर कधीच ती केली नाही.

      परिणामांची पर्वा करणार्या पठाणमामूला गांवातल्या सर्वच मुलांचा कळवळा असे. गांवातील आठवडे बाजारच्या दिवशी सारी पोरे मामूच्या भोवती धिंगाणा घालत. त्यांचे मनोगत त्याच्या ध्यानी येई. राबिया कधी त्याला डाफरत असे, पण तो तिला जुमानत नसे. कधी भेळभत्ता, कधी टरबूज, कधी आंबे, कधी पपया विकत घेऊन तो मुलांसमोर ठेवी त्यांच्याकडे पाहात तो मुलांना खाऊ भरवीत असे. कधी मुलांसाठी तो असा खाऊ स्वत: घेऊन येई. शाळेत जाताना मधल्या सुटीत काहीबाही लागले तर मामूचा खिसा हमखास मोकळा सापडे अन् मुलांच्या चेहर्यावरच्या स्मितरेषा मामूला सुखावून जात.

      1969 साली महापूर आल्याने गावात मातीच्या घरांची  पडझड झाली. त्यात आमचेही घर होते. संसार उघड्यावर आला होता. मामू गवंडी होता. त्याच्याकडे गरजूंची रीघ लागली. हाताखाली कामाला माणूस मिळेना. घराचे खांब आणि छत उभे करण्यासाठी मातीच्या विटा तयार करण्यासाठी माणूसबळ हवे होते. आम्ही घरातल्या मुलांनीच मामूला साथ द्यायचे ठरवले. मामूने चार पैसे मिळण्याचे साधन सोडून बहिणीचे घर उभे करायला घेतले आणि आठवड्यात जसे होते तसे करून दिले. मोबदल्याची बात करताच तो उसळून म्हणाला होता."आप क्या दोगे? पैसा ? कीमत करोगे मेरे काम की ? छोटे हो - छोड दता हूँ - पर आइंदा ऐसी बात करना - बडा धक्का लगता है."

      आम्ही त्याच्या गरजेविषयी बोललो, पण मामू आपल्या शब्दावर ठाम होता. तो म्हणाला, "यह घर मेरा अपना है. जो चाहे ले लूँगा. पर इस तरह नहीं, ऐसे समय भी मैं काम आया तो कब आऊंगा ?"

      खरे पाहता मामू मुलांच्या कामी अनेकवेळा येत असे. जणू त्याने त्यांना दत्तकच घेतले होते. मुलांच्या शिक्षणासाठी कपडालत्ता, पुस्तके, फी यात त्याचा हात असे, प्रसंगी तो आपल्या कोंबड्या बकर्या विकत असे. ते पाहून कधी अवघडल्यासारखे वाटले तर, "अरे, उसके लिए तो रखा था उनको ?" असे म्हणून हसण्यावारी सारे नेत असे. किरकोळ दुखणे जास्त होऊन राबिया सोडून गेल्यानंतर पठाणमामू एकटा पडला. एव्हाना मुलेही मोठी होऊन आपआपल्या व्यवसायात अडकली होती. तथापि गावी गेल्यावर मामूकडे उठबस चालूच होती. तोही आता थकला होता.मधून मधून तो आजारी पडे. कधी जास्त झाल्यावर सार्यांना बोलावून घेई. निरवानिरवीचे बोलत असे. आम्हाला ते सारे असह्य होत असे. कारण उत्साही कार्यमग्न असणार्या परोपकाराच्या पायघड्या घालणार्या पठाणमामूचे असे दर्शन त्रासदायक असे, पण सार्यांचेच सगळे दिवस सारखे नसतात. आपल्याला आठवण असो वा नसो काळ आपले काम करीतच असतो. अशाच एका दिवसाने मामूची जीवनयात्रा संपवली.

      आजही एस.टी. ने गावी जाताना जेव्हा नामपूरच्या चार फाट्यावर मी उतरतो तेव्हा उजवीकडे वळून पाहतो. जेथे मामूची झोपडी होती तिथे आता हॉटेल उभे आहे. पण मला मात्र ती झोपडीच दिसते आणि खाटेवर मामू बसलेला दिसतो. तो मला साद घालील असे वाटते, पण हाक आल्यामुळे मी हातातली पिशवी सावरत घराकडे पाऊल टाकतो. थोडे थबकून पाठीमागे माझी नजर जाते तेव्हा तिथे काहीच दिसत नाही. मामू आणि झोपडी - दोन्ही आता दिसणारच नाहीत. मनातले कधी जेव्हा बाहेर दिसू लागेल तेव्हा कदाचित मला पठाणमामूला भेटण्याचा योग येईल. अन् त्यापाठी शब्दही येतील. "आओ बेटा. कहो, कैसे हो ?"


- श्री. बलबीर अधिकारी