Thursday, March 23, 2023

संत जनाबाईंची मानसहोळी

 



संत जनाबाईंची मानसहोळी


कराया साजरा |

होलिकेचा सण |

मनाचे स्थान |

निवडिले ||


ऐसे ते स्थान |

साधने सारवले |

भक्तीने शिंपिले |

केले सिद्ध ||


त्या स्थानी खळगा |

समर्पणाचा केला |

त्यात उभा ठेला |

अहंकार एरंड ||


रचलीया तेथे |

लाकडे वासनांची |

इंद्रीय गोवऱ्याची |

रास भली ||


गुरुकृपा तैल |

रामनाम घृत |

अर्पिले तयात |

ऐसे केले ||


रेखिली भोवती |

सत्कर्म रांगोळी |

भवरंगाचे मेळी |

शोभिवंत ||


वैराग्य अग्नीसी |

तयाते स्थापिले |

यज्ञरूप आले |

झाली कृपा ||


दिधली तयाते |

विषय पक्वान्नाहुती |

आणिक पुर्णाहूती |

षड्रिपु श्रीफळ ||


झाले सर्व हुत |

वैराग्य अग्नीत |

जाणावया तेथ |

नुरले काही ||


वाळ्या म्हणे जनी |

व्हावी ऐसी होळी |

जेणे मुक्तीची दिवाळी |

अखंडित ||🙏

Saturday, March 18, 2023

प्रेरणादायी : राधिका गुप्ता , मुख्य कार्यकारी अध्यक्ष, एडलवाईस


 राधिका गुप्ता या एडलवाईस, वित्तीय सेवा कंपनीच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष आहेत. वयाच्या ३३ व्या वर्षी सीईओ झालेल्या राधिका त्यांच्या शारिरीक व्यंगामुळे  अथवा दिसण्यामुळे नेहमीच हास्याची शिकार व्हायच्या ! त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता आणि जन्मावेळी ओढवलेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची मान तुटलेली होती ! त्यांना Girl with broken neck म्हणून ओळखले जाई ! पण आज भारताच्या युवा , मुख्य कार्यकारी अध्यक्ष (CEO) पदांवरील अधिकाऱ्यांत त्यांची गणना होते आणि भारतातील म्युच्युअल फंड क्षेत्रात  त्या पहिल्या महिला CEO आहेत !! 
 

वयाच्या २२व्या वर्षी त्यांना जेव्हा  कॉलेजनंतर नोकरी मिळाली नाही आणि आपल्या  सातव्या नोकरीच्या मुलाखतीत त्या अपयशी झाल्या तेव्हा  आत्महत्या करू बघणाऱ्या  राधिका याना मित्रांनी येऊन वाचवले !! 

गुप्ता यांनी २००५ मध्ये मॅकिन्से अँड कंपनीमध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २००६ मध्ये त्या  पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून AQR कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये  कार्यरत होत्या. २०१७ मध्ये एडलवाईस असेट  मॅनेजमेंटमध्ये  सीईओ म्हणून काम करण्याआधी , गुप्ता यांनी एडलवाईस मल्टी स्ट्रॅटेजी फंड मॅनेजमेंट मध्ये धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी, गुंतवणूक, विक्री आणि वितरणावर देखरेख करण्यासाठी काम केले आहे. 

२०२२ मध्ये  मर्सिडीजचे भारत प्रमुख श्री. संतोष अय्यर यांनी विधान केले होते  की, भारतात लक्झरी कारची विक्री शक्य नाही कारण येथे लोक पैसे खर्च करण्यापेक्षा बचत करण्यावर अधिक भर देत आहेत. त्यांनी थेट म्युच्युअल फंडांच्या SIP सारख्या योजनांना लक्ष्य केले, "जर लोकांनी त्यांची एसआयपी गुंतवणूक लक्झरी कार मार्केटकडे वळवली तर हा व्यवसाय खूप सुधारू शकतो," असे श्री. अय्यर म्हणाले होते. त्यावर राधिका यांनी व्हिडिओ पोस्ट करून त्यांना सडेतोड उत्तर दिले होते आणि गुंतवणुकीचे महत्व अधोरेखित केले होते ! 

"Limitless: The Power of Unlocking Your True Potential" हे त्यांनी, आपल्या जीवन प्रवासावर  लिहिलेले प्रेरणादायी पुस्तक, एप्रिल २०२२ मध्ये प्रकाशित झालेले आहे.      

अशा या निडर, प्रेरणादायी आणि यशस्वी  महिलेस आमचा सलाम  आणि पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा !!



Saturday, February 25, 2023

मराठी भाषा गौरव दिन




मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेले आहे. १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून '१ मे' दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला. १ मेेे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असतांना वसंतराव नाईक यांनी मांडलेले मराठी भाषा दिनाचे मांडलेले विचार प्रेरक होते. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली. राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. अनेक मराठी लोकांसाठी व आधिकाऱ्यांसाठी 'राजभाषा परिचय' पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. 

'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी भाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.


Saturday, January 28, 2023

ई-कचरा ! चिंताजनक बाब

 

महानगरांमध्ये निर्माण होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा आणि त्याच्या निर्मितीचे वाढते प्रमाण  चिंताजनक बाब आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने याचे निःसारण होत नसल्याचे चित्र सर्वसामान्य आहे !!  अ ई-कचर्‍याचे व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी त्याचे संकलन आणि पुनर्प्रक्रियेमध्ये असणार्‍या त्रुटी सुधारणे आवश्यक आहेत. तसे न झाल्यास ई-कचरा भविष्यामध्ये मोठ्या समस्येचे रूप धारण करणार आहे. 

ई-कचरा म्हणजे काय ?

निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून तयार झालेला कचरा म्हणजे ई-कचरा होय. यामध्ये वापरण्यास अयोग्य असलेले संगणकाचे भाग, मोबाईल आणि त्यांचे सुटे भाग, बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गाड्यांचे सुटे इलेक्ट्रॉनिक भाग, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल यांचा समावेश होतो. हा कचरा घनकचर्‍याप्रमाणेच आपल्या घरातूनदेखील निर्माण होतो आणि सर्वप्रमाणपणे त्याची विभागणी न होता आपल्या रोजच्या घरगुती कचर्‍यामधूनच तो थेट कचराकुंडीत जातो. हा कचरा टिकाऊ स्वरुपाचा असल्याने त्याचे पर्यावरणात विघटन होत नाही. दरवर्षी जगभरात साधारण 70 दशलक्ष टन ई-कचरा तयार होतो. वैज्ञानिक पद्धतींनी ई-कचऱ्याची हाताळणी केल्याने हवा, पाणी आणि मातीचे  प्रदूषण होते आहे , ज्यामुळे मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावर परिणाम होतोय.

भारतातील ‘ई-कचर्‍या’चे उत्पादन

ई-कचरा उत्पादनामध्ये संपूर्ण जगात भारताचा पाचवा क्रमांक लागतो. यामधील सुमारे 70 टक्के ई-कचरा केवळ संगणक उपकरणांमधून, 12 टक्के दूरसंचार क्षेत्रातून, आठ टक्के वैद्यकीय उपकरणांमधून आणि सात टक्के इतर उपकरणांमधून निर्माण होतो. सरकारी, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या एकत्रितपणे 75 टक्क्यांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा तयार करतात, तर घरगुती स्तरावर केवळ 19 टक्के ई-कचर्‍याचे उत्पादन होते. ई-कचरा निर्मितीमध्ये भारतात मुंबई शहर आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ नवी दिल्ली, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांचा क्रमांक लागतो. राज्यनिहाय महाराष्ट्र आघाडीवर असून तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश त्यामागे आहेत. या इलेक्ट्रॉनिक कचर्‍यामध्ये सर्वात जास्त शिसे आढळते. ज्याचे प्रमाण 43 टक्के आहे आणि यामुळे 72 टक्क्यांपेक्षा जास्त जड धातू तयार होतात.

महाराष्ट्र आणि ‘ई-कचरा’

’महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या आकडेवारीनुसार 2019-20 या सालात राज्यात 10 लाख टन ई-कचरा निर्माण झाला. त्यापैकी केवळ 975.25 टन कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करण्यात आली आहे. उर्वरित 11 हजार, 015.49 कचर्‍याचे नोंदणीकृत धारकांकडून (फॉर्मल सेक्टर) उन्मूलन करण्यात आले. राज्यात ई-कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करणार्‍या केवळ नऊ नोंदणीकृत कंपन्या असून त्यांची पुनर्प्रक्रियेची एकूण क्षमता 11 हजार, 794 टन आहे. असे असतानादेखील केवळ 975 मेट्रिक टन कचर्‍यावरच पुनर्प्रक्रिया करण्यात आली आहे. म्हणजेच राज्यात निर्माण झालेल्या एकूण इलेक्ट्रॉनिक कचर्‍यापैकी (ई-कचरा) केवळ एक टक्का कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करण्यात आली आहे. ई-कचर्‍याचे उन्मूलन करणार्‍या 90 कंपन्या असून त्यांची उन्मूलनाची क्षमता 74 हजार, 006 मेट्रिक टन आहे. अशा परिस्थितीत 2019-20 मध्ये केवळ 11 हजार, 015 मेट्रिक टन ई-कचर्‍याचे उन्मूलन करण्यात आले आहे. 

सद्य परिस्थिती 

आता टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप किंवा अन्य कोणताही ई-कचरा घराबाहेर डंप केला, तर त्यासाठी दंडाबरोबरच शिक्षेचीही तरतूद असलेला इलेक्ट्रॉनिक वेस्ट (मॅनेजमेंट ॲन्ड हॅंडलिंग) कायदा-२००० लागू झाला आहे.

या कायद्याअंतर्गत ई-कचरा आपण कुठेही टाकू शकत नाही. आपल्याला ई-कचरा सरकारने अधिकृत केलेल्या एजन्सीजना द्यावा लागेल. पर्यावरण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कोणताही नागरिक त्याचेर जुने इलेक्ट्रॉनिक साहित्य तीन पद्धतीने नष्ट करू शकतो. यामध्ये अधिकृत संग्रह केंद्रावर, रिसायकलिंग करणाऱ्या अधिकृत संस्थेकडे किंवा त्या साहित्याची निर्मिती करणाऱ्या उत्पादकाकडे जमा करून त्या साहित्याची विल्हेवाट लावता येईल. मात्र, या कायद्यातील काही तरतुदींबद्दल इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी विरोधही दर्शवला आहे. या कायद्याअंतर्गत ई-कचरा एकत्र करणे ही इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची जबाबदारी असेल. त्यामुळे उत्पादक कंपन्यांना या कायद्यामध्ये काही सुधारणा हव्या आहेत.

भारतामध्ये माहिती-तंत्रज्ञान व्यवसायाचे एक प्रमुख केंद्र क्षेत्र बंगलोरमध्ये आहे. या शहरात सुमारे १७०० आयटी कंपन्या आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी सुमारे ६००० ते ८००० टन इलेक्ट्रॉनिक कचरा बाहेर पडतो. सर्वात चिंतेची बाब म्हणजे देशामध्ये निर्माण होणारा हजारो टन ई-कचरा पारंपरिक भंगारवालेच खरेदी करतात. अशा प्रकारचा कचरा खरेदी करण्यासाठी त्यांना अनुमती नाही आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाही त्यांच्याकडे नाही.

सरकारद्वारे वेगवेगळ्या ठिकाणांहून ई-कचरा एकत्र करण्यासाठी नेटवर्क तयार करण्यात आले आहे. देशामध्ये ६०० पेक्षा जास्त ई-कचरा संग्रहण केंद्रेही आहेत. पण ज्या प्रमाणात ई-कचऱ्याची निर्मिती होत आहे, त्यामानाने ही संख्या कमी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ६०० केंद्रांवर प्रत्येक वर्षी जवळजवळ सुमारे ३००० टन ई-कचराच रिसायकल केला जातो. एका अहवालानुसार, येत्या १० वर्षामध्ये भारत, चीन आणि अन्य विकसनशील देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विक्रीत मोठ्या वेगाने वाढ होईल आणि पर्यायाने त्यातून निघणाऱ्या ई-कचऱ्याचा पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल.

देशात ई-कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करणार्‍या कंपन्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. तसेच सद्यस्थितीतील कंपन्यांनी जर त्यांच्या पुनर्प्रक्रियेच्या क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात पुनर्प्रक्रिया केल्यास त्यांच्या दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. 2016च्या नियमावलीनुसार अनौपचारिक किंवा असंघटित क्षेत्रात समाविष्ट होणार्‍या कचरा गोळा करणार्‍यांना अधिकृत किंवा औपचारिक दर्जा देणे, त्यांची नोंदणी करणे, त्यांना परवाना देणे या गोष्टी करणे आवश्यक होत्या. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये या गोष्टी झालेल्या नाहीत. ई-कचर्‍यावरील पुनर्प्रक्रिया वाढविण्यासाठी नोंदणीकृत धारकांच्या (फॉर्मल सेक्टर) कक्षेत अनौपचारिक धारक (इन्फॉर्मल सेक्टर - कचरावेचक इ.) आणण्याची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करुन ई-कचर्‍याचे संकलन आणि त्यावर होणार्‍या पुनर्प्रक्रियेच्या क्षमतेमध्ये वाढ करणे काळजी गरज बनली आहे.

-संकलित माहिती  : आभार विकीपिडीया  !

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशनने , ई-यंत्रण: ई-कचरा संकलन मोहीम : प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२३ मध्ये सहभाग नोंदविला !! या सामाजिक तसेच पर्यावरणपूरक मोहिमेचे उद्दिष्ट्य हे "नागरिकामध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता आणणे, ती वाढविणे आणि त्याच्या संरक्षणार्थ इलेक्ट्रॉनिक वेस्टचे योग्य पद्धतीने निर्मूलन करण्याची शिस्त बाणविणे" असा होता. जवळपास १०० किलो तांत्रिक कचरा यावेळी पूर्णम इकोव्हिजन पुणे , या संस्थेकडे जमा करण्यात आला. या सर्व ई-कचऱ्याचे पर्यावरणपूरक पद्धतीने पुनरुत्पादन, पुनर्निर्मितीसाठी प्रयत्न केला जाईल.


Saturday, December 10, 2022

देणाऱ्याची भूमिका ..


कट्टर तत्वनीष्ठ विंदा करंदीकरांची एका लेखक मित्राने सांगीतलेली एक आठवण.आयुष्यात एकाही पुरस्काराचे पैसे त्यांनी कधी घरी सोबत नेले नाहीत. पुरस्कार घेतल्या बरोबर तिथल्या तिथे कोणत्यातरी संस्थेला ते दान करुन टाकायचे. 

"आमच्या जी. एस्. मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे विंदा करंदीकर , मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांच्या एकत्रित काव्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. शनिवार दुपार होती ती. कार्यक्रम रंगला. संपला. मी या मंडळाचा त्या वर्षाचा कार्यवाह. मानधनाची पाकिटे तिन्ही कविवर्यांना दिली. विंदा म्हणाले, " तुमचे हाडाचे हॉस्पिटल कुठे आहे? ", " टाटाच्या समोर, जवळच आहे. पाहायला जायचं आहे का कुणाला ? ", मी म्हणालो.

विंदाचा वाटाड्या होऊन आम्ही ऑर्थोपेडीक सेंटरमध्ये गेलो. काही रुग्णांचा मुक्काम तिथे अनेक महिने असायचा. विशेषतः फ्रॅक्चरचे रुग्ण. घरात संडासापासूनच्या सोयीची कमतरता. त्यामुळे हॉस्पिटलात सक्तीचा निवास. नवीन पेशंट्सचा दट्ट्या असायचा. मग वॉर्डातले काही पेशंट्स पॅसेजमध्ये यायचे. पॅसेजमधून वॉर्डाबाहेरच्या मोकळ्या जागेत.

विंदाना ज्या बाईंना भेटायचं होतं त्या अशाच एका पॅसेजमध्ये होत्या. शाहीर अमर शेखांच्या पत्नी. आम्ही त्यांना 'शोधून' काढलं. विंदांनी त्यांची चौकशी केली. खिशातून पाकीट काढलं. आमच्या मंडळाने दिलेल्या मानधनाच्या पाकिटात त्यांनी जिना चढतानाच थोडे पैसे (स्वतःजवळचे) भरले होते. ते पाकिट त्यांनी बाईंच्या हातात दिलं. "औषधासाठी होतील म्हणून शिरूभाऊंनी दिले आहेत. मी आज इथे कार्यक्रमाला येणार होतो. म्हटलं नेऊन देतो."

थोड्या वेळाने आम्ही बाहेर पडलो. मीही विंदांबरोबर बसस्टॉपवर आलो. विचारू की नको अशा मनातल्या गोंधळावर मात करत मी प्रश्न विचारला. तोही घाबरतच. " तुम्ही त्यांना मदत केलीत, पण शिरूभाऊंचे नाव का सांगितलंत? ". शिरूभाऊ म्हणजे बहुधा त्यांचे मित्र श्री. ना. पेंडसे असावेत.

विंदांनी त्यांच्या खास नजरेने माझ्याकडे आरपार बघितलं. " असं बघा, घेणाऱ्याचं मन आधीच बोजाखाली असतं की आपल्याला कुणाकडून तरी मदत घ्यावी लागतेय. अशावेळी याचक होतं मन. देणाऱ्याकडून समोरासमोर घेताना त्रास वाढतो. कमी नाही होत. अशावेळी आपण निरोप्या झालो तर समोरच्याचा त्रास वाढत तरी नाही. शेवटी महत्त्वाचं काय? त्या व्यक्तीला मदत मिळणं ! कुणी केली हे नाही " .

माझी विंदांशी काही ओळख नाही. ही आमची शेवटची भेट. पण माझ्या मनात त्या वेळी लागलेले हजारो वॅटचे लाईट अजून विझलेले नाहीत. देणाऱ्याने देताना, घेणाऱ्याच्या भूमिकेत स्वतःला नेणं. ते सारे क्लेष क्षणभर अनुभवणे. पुन्हा देण्याच्या भूमिकेत येणं आणि " इदं न मम " असं म्हणत यज्ञवृत्तीने दान करणे.

मी empathy ची व्याख्या मानसशास्त्राच्या पुस्तकातून शिकण्याआधी कवीकडून शिकलो याचा मला अभिमान आहे.

- माधव सावळे.

(स्रोत : कायप्पा )

Saturday, December 3, 2022

भारताचा युवा वैज्ञानिक : प्रताप

 

महिन्यातून अठ्ठावीस दिवस विदेशांचा प्रवास करणारा हा अवघे २१ वर्षांचे वय असलेला युवा आहे प्रताप.फ्रान्सने त्याला त्यांच्याकडे नोकरी करण्याचे निमंत्रण दिले आहे. मासिक सोळा लाखांचा गलेलठ्ठ पगार, पाच शयनकक्षांचे घर, अडीच कोटींची दिमाखदार कार, अशा प्रलोभनपूर्ण प्रस्तावांनी अनेक संस्थांनी त्याला बोलावले. ह्या पठ्ठ्याने या सर्वांना सरळ नकार दिला. आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले, उचित पारितोषकाने त्याचा सत्कार केला आणि 'डी आर डी ओ' मध्ये त्याला सामावून घेण्यास सांगितले.

या कर्नाटकातील मुलाने काय नेमके पटकाविले आहे ते पाहूयात.

पहिला भाग:

कर्नाटकातील मैसूर जवळ कोडाईकुडी नावाच्या एका दुर्गम खेड्यात याचा जन्म झाला. त्याचे शेतकरी वडिल सुमारे दोन हजार रुपये कमवू शकत.  याला बालपणापासूनच 'इलेक्ट्रॉनिक्स' मध्ये विशेष रस. हा प्रताप बारावीत शिकत असताना आसपासच्या सायबर कॕफेंच्या माध्यमातून त्याचा बोईंग ७७७, रोल्स रॉईस कार, अवकाश, हवाई प्रवास, अशा गोष्टींशी परिचय झाला. याने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांना याच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत शेकडो इमेल लिहिले आणि कळविले कि त्याला काम करायचे आहे पण कसचे काय अन् कसचे काय कुणीच दखल घेतली नाही. प्रतापला खरेतर इंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिकावे वाटत होते परंतु हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याने बी एससी (फिजिक्स)ला प्रवेश घेतला. हे ही त्याला सोडून द्यावे लागले. त्याला वसतीगृहाचे शुल्क भरता आले नाही म्हणून हाकलून देण्यात आले. तो मैसूर बसस्टँडवर झोपायचा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहात कपडे धुवायचा. त्याने एकलव्याप्रमाणे सी प्लसप्लस, जावा कोअर, पायथॉन या संगणक भाषा स्वतःच शिकल्या. अशातच त्याला ई वेस्ट पासून ड्रोन बनविण्याबद्दल कळले. सुमारे ऐंशी खटपटीं नंतर त्याला असा ड्रोन बनविण्यात यश आले.

दुसरा भाग:

आय. आय. टी. दिल्ली मध्ये ड्रोन स्पर्धा आयोजित केली होती. प्रताप तिथे भाग घेण्यासाठी विना आरक्षित डब्यातून प्रवास करीत, त्याच्या गावरान कपड्यात, पोहोचला. त्याने दुसरे पारितोषक पटकावले. त्याला सांगितलं गेलं की जपान मध्ये एक स्पर्धा आहे व त्याने त्या स्पर्धेत भाग घ्यावा. जपानच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चेन्नईच्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने त्याच्या शोध निबंधाला मान्यता देणे आवश्यक होते. हा चेन्नईला प्रथमच जात होता. महत्प्रयासाने प्राध्यापक महाशयांनी त्याच्या निबंधाला काही शेरे देऊन मान्यता दिली. शेऱ्यात त्यांनी लिहिले कि शोध निबंध लिहिण्याची अर्हता याच्यापाशी नाहीय. प्रतापला जपानला जाण्यासाठी साठ हजार रुपयांची गरज होती. मैसूर मधील एका भल्या माणसाने त्याच्या तिकिटाची व्यवस्था केली. बाकीचे पैसे शेवटी प्रतापच्या आईच्या मंगळसूत्राच्या विक्रीतून उभे केले. त्याच्या पहिल्यावहिल्या विमान प्रवासाने प्रताप एकटाच टोकियोला पोहोचला. उतरला तेव्हा तिथल्या खर्चासाठी त्याच्यापाशी उरले होते केवळ चौदाशे रुपये. महाग असल्यामुळे त्याने बुलेट ट्रेनचे तिकिट काढले नाही आणि नियोजित गावापर्यंत पोचण्यासाठी सोबतच्या सामानासह त्याने सोळा ठिकाणी ट्रेन बदलत साध्या ट्रेनने प्रवास केला. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रताप आणखी आठ किलोमिटर सर्व सामान घेऊन पायी चालत गेला. एकशे सत्तावीस देशांचे स्पर्धक असलेल्या त्या महाप्रदर्शनात शेवटी त्याने भाग घेतला. निकाल गटागटाने आणि वरचे दहा क्रमांक राखून जाहीर होत होते. प्रताप हळुहळू हताश होत मागे सरकत होता.  निकाल जाहीर करणारे हळुहळू पहिल्या दहातील निकाल सांगत होते. सरकत सरकत तिसरा क्रमांक घोषित झाला. मग दुसरा... आणि घोषणा झाली 'आता स्वागत करूयात भारतातून आलेल्या सुवर्णपदक विजेत्या श्री. प्रताप यांचे' त्याच्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. तो डोळ्यांनी पहात होता अमेरिकेचा ध्वज खाली खाली सरकत आहे आणि भारताचा तिरंगा डौलाने वर वर सरकत आहे. प्रताप दहा हजार डॉलर्सनी सन्मानित केला गेला. सर्वत्र सत्कार समारंभ होऊ लागले.  त्याला मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचा फोन आला. सर्व आमदार खासदारांनी सन्मान केला. फ्रान्सने त्याला मोठी नोकरी आणि मानपानाची साधने प्रस्तावित केली. प्रतापने फ्रान्सला सरळ नकार दिला. 

आणि आता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले आहे आणि (डी आर डी ओ)  "रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन"  मध्ये त्याला सामावून घेतले आहे भारतीय 'बलस्य मूलं विज्ञानं' चे व्रत घेऊन भारतमातेची सेवा करण्यासाठी !!

More Read @ https://www.leadcampus.org/rolemodels/prathap-n-m


Saturday, November 26, 2022

वानोळा


"घरी चाललाच आहेस तर जातांना वानोळा घेऊन जा.... रिकाम्या हाताने जाऊ नये....!!", वरिल वाक्य ऐकले आणि

 वानोळा शब्द मनात फिरत राहिला नकळत मन बालपणाच्या आठवणीत गेलं. तेव्हा असली चॉकोलेट, कॅडबरी नाही मिळायची हातावर..., किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना. तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी बनवलेल्या पायली दोन पायली दाळी, ओल्या हरभऱ्याची पेंढी, शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी- कोथंबीरची जुडी. आणि असलंच बागायतदार घर तर टोपलीभर पेरू, पपई सारखी फळं, आणि अजून श्रीमंत घरात गेलं की मिळायचा केळीचा घड, तोही पूर्ण किमान दहा डझनभर केळी लपेटलेला !

 मग घरी येऊन जोवर तो वानोळा पुरायचा, तोवर त्या नातलगांची आठवण रोज निघायची.  तो वानोळा केवळ जिन्नस नसायचा, ती माया असायची.. प्रेम असायचं, हृदयातून पोटापर्यंत जाणारं. वाळवणाचे दिवस असले की, मग तर बघणंच नको. पापड, कुरडई प्रत्येक घरात व्हायची, तरी शेजार पाजारी वानोळा जायचा. ती प्रत्येकाच्या हातची चव चाखण्यात ही वेगळाच आनंद असायचा. सगळ्यात विशेष म्हणजे "कैरीचं लोणचं." मसाला तोच, कैऱ्या त्याच, पद्धतही तीच. तरी प्रत्येक घरातल्या लोणच्याचा सुगंध ही वेगळा आणि चवही वेगळी !!

थोडक्यात काय तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या वानोळ्या च्या निमित्ताने माणसं आणि घरं परस्परांच्या हृदयात राहायची. एखादयाची गाय किंवा म्हैस व्याली तरी खरवस संपूर्ण गल्ली तरी खायची. आज शेजारच्या घरात बाळ जन्माला येतं तरी आपल्याला बारशाला कळतं. हे वास्तव आहे. अशावेळी खरंच वाटतं, आपण खरंच सुधारतो आहोत की माणसांपासून दुरावतो आहोत. 

जोवर वानोळा होता तोवर माणूस भोळा होता. माणूस शहाणा सुशिक्षित झाला, 'वानोळ्या'ची लाज वाटायला लागली आणि मनं दुरावत गेली. मग 'वानोळ्या'ची जागा मिठाईच्या पाकिटांनी आणि कॅडबरी सेलिब्रेशनने घेतली. जितक्या लवकर कॅडबरी विरघळते तितक्या लवकर माणूस माया, स्नेह विसरायला लागला.  सगळं कसं प्रॅक्टिकल होत गेलं आणि इमोशन्स फक्त सिनेमाच्या कथेमध्येच बंद झाल्या.. तिकीट काढून आम्ही डोळ्यात आसवं आणायला लागलो आणि कथा कादंबऱ्यात नाती वाचायला लागलो..

माहेरवाशीण आता केवळ गोष्टींमधेच सापडते, तिच्या  गाठोड्यात वानोळा देणारी माय देखील पडद्याआड जाऊ पाहते. तरी अजूनही तुमच्या माझ्या सारख्यांची आई निघताना पिशवीत काही ना काही टाकते, हाच "वानोळा" असतो.

देत राहणाच्या संस्काराचा, वाटून खाण्याच्या वृत्तीचा, लक्ष्मीची ओटी भरून पाठवणी करण्याचा, दूर असलो तरी स्मरणात राहण्याचा मार्ग असतो... वानोळा.

स्रोत : कायप्पा 

Saturday, November 19, 2022

बोलावे ऐसे..

 



बोलावे ऐसे व्हावे जे रटाळ🥱

 नेमकेच वदावेका ठरावे वाचाळ !! 🤬

 

लिहावे ऐसेमांडावा मतितार्थ🎯

 कमी,अचूक शब्दांतउतरवावा अर्क !! 💧

 

ऐकावे ऐसेकी समजून घ्यावे,😊

 प्रतिक्रिया टाळुनीप्रतिसादा द्यावे !!😇

 

वर्तावे ऐसेजे बोलू ते चालावे😎

 गदारोळ टाळुनियाजगा शांतवावे !!😇

 

ऐसे गुणदर्शनेजनी जनी वाढितो सन्मान,🙌🏽

अपेक्षित फलश्रुती,अपेक्षित परिणाम !!🎯

 

रुपाली


Saturday, October 22, 2022

सिग्नलवरची दिवाळी ...


पुन्हा एकदा दीपावली, रोषणाई, खरेदी,फराळ आणि आप्त,

या सगळयात रममाण असतानाही, मनात थोडीशी असते खंत !


आठवतात तेव्हाही, सिग्नलवर भटकून आकाशदिवे,पणत्या विकणारी मुले,

काय करत असतील ते, जेव्हा फटाके उडवितात आपले  चिमुकले ? 


सिग्नल लाल होईपर्यन्त, नजर त्यांची  न्याहाळत असते आकाशातील रोषणाई,

एकमेकांना दाखवायची असते त्यांना, आपण पाहत असलेली नवलाई !!


पुन्हा सिग्नल लाल, पुन्हा फिरफिर, भरकटलेली नजर मात्र अवकाशात,

हे सगळे नाही उतरत, वातानुकूलित, काचबंद वाहनातील मनांत !!       


आजतरी थोडावेळ नशिबाने द्यावी ना त्यांना थोडी उसंत?

थोडे उजळावे त्यांचेही चेहरे, थोडाकाळ मिटावी त्यांचीही  भ्रांत !!


दिसतो एखादा अनामिक चेहरा, एखाद्याचे जागृत मन, 

फराळाची पाकिटे आणि फटाके, त्यांना वाटणारा एखादाच जण !!


त्यांच्याही अंधारलेल्या चेहऱ्यांवर, उजळत जाते मग दिवाळी पहाट, 

'चूक-की-बरोबर'च्या हिशेबात न पडता, मीही पकडते तीच  वाट !!      


- डॉ.  रुपाली दिपक कुलकर्णी  

Saturday, October 8, 2022

लाल बहादूर शास्त्री

 भारतीय राजकारणातील अत्यंत निस्पृह, स्वच्छ व्यक्तिमत्त्व - लाल बहादूर शास्त्री- जयंती २ ऑक्टोबर.

११८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!


प्रसंग १. 

देशाच्या केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची आई एका कार्यक्रमात पोचली. अर्थात तिला कोणीच ओळखले नाही. तिने चौकशी केली की, माझा मुलगा तिथे आला आहे. तुम्ही पाहिलं का? लोकांनी विचारले की तो काय करतो? ती म्हणाली की तो रेल्वेत काम करतो.तिने केलेल्या वर्णनाचा कोणीही व्यक्ती तिथे कामाला नव्हता. अखेर तिने मुलाचे नाव सांगताच सर्वजण अवाक झाले. ते होते लाल बहादूर शास्त्री. लोकांनी तिला शास्त्रीजींजवळ नेले. शास्त्रीजी कार्यक्रमातून बाहेर आले. त्यांनी आईला बसविले, विचारपूस केली आणि घरी पाठविले.त्या दरम्यान त्यांना त्या कार्यक्रमात बोलायचे होते पण त्यांनी संयोजकांना हळूच नकार कळविला. आई घरी गेल्यावर लोकांनी शास्त्रीजींना विचारले की ते बोलले का नाही? त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरावर अनेकांना आश्चर्य वाटले. त्यांना सांगितले की, ते रेल्वेमंत्री आहेत हे त्यांच्या आईला माहिती नाही. ती फारशी शिकली नव्हती. आपला मुलगा केंद्र सरकार मध्ये इतका मोठा मंत्री आहे हे कळले असते तर तिने त्यांच्या नात्यातील गरीब, गरजू मुलांना नोकरीत लावण्यासाठी आग्रह केला असता.एकीकडे आईचा आग्रह मोडवला गेला नसता आणि दुसरीकडे ते ज्या तत्वाने,निस्पृहपणे जीवन जगत होते त्याचे पालन झाले नसते.

आज जगात आपल्या असलेल्या/नसलेल्या पदाबाबत शेखी मिरवणारे लोक आजूबाजूला पाहत असतांना शास्त्रीजींचे हे उदाहरण आगळेवेगळेच आहे.

प्रसंग २.

१९६५ मधली घटना आहे. स्थळ- दिल्लीच्या एका महाविद्यालयातील प्रवेशाची रांग. या रांगेत बराच वेळ उभा राहून चक्कर आल्याने एक युवक खाली कोसळला.ताबडतोब काही जणांनी धावत जाऊन त्याला पाणी पाजले आणि त्याचे नाव विचारले.नाव ऐकताच सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला.ही बातमी महाविद्यालयाच्या प्राचार्यांपर्यंत जाऊन पोचली. युवकाचे नाव ऐकताच ते पण धावत आले.कोण होता हा युवक? की ज्याचे नांव ऐकून प्राचार्यही धावत आले? महाविद्यालयात तासनतास प्रवेशासाठी उभ्या असलेल्या या युवकाचे नाव होते - अनिल लालबहादूर शास्त्री! 

होय, देशाच्या पंतप्रधानांचा मुलगा महाविद्यालय प्रवेशासाठी चक्क अन्य विद्यार्थ्यांबरोबर रांगेत उभा होता.या गोष्टीवर आज कोणीही विश्वास ठेवणार नाही.पण हे सत्य आहे.

प्रसंग ३.

१९६६ मधील घटना. पंतप्रधानांची दोन्ही मुले त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेली होती. त्यांच्या खासगी मालकीच्या साध्या फियाट गाडीतून जाण्याऐवजी ते पंतप्रधान कार्यालयाची शेव्हरलेट इंपाला ही आलिशान गाडी घेऊन गेले. दुपारी जेवायला घरी आलेल्या पंतप्रधानांना त्यांच्या पत्नींनी ही गोष्ट सांगितली. परत आल्यावर मुलांना वडील नाराज झाल्याचे कळले. सकाळी मुले वडिलांसमोर येण्याची हिम्मत करीत नव्हते. शेवटी वडिलांनीच दोघांना आणि त्यांच्या खासगी सचिवांना समोर बोलाविले. पंतप्रधान कार्यालयाची गाडी काल दिल्लीत खासगी कामासाठी १४ किलोमीटर फिरली आहे. त्याचा शासकीय दराने जो खर्च झाला आहे तो माझ्या मानधनातून कापून घ्या असा आदेश झाला. इकडे दोन्ही मुलांची मान शरमेने खाली गेली. यापुढे अशी चूक करायची नाही अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली.ही दोन्ही मुले अर्थातच अनिल आणि सुनील शास्त्री होते आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री.

हे अनिल शास्त्री आणि त्यांचे बंधू सुनील शास्त्री वडील पंतप्रधान असतांना देखील महाविद्यालयात बसने जात असत.शासकीय किंवा खासगी कारने नाही. राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, राजकारण म्हणजे लांगूलचालन, राजकारण म्हणजे जातीपातीचा, धर्माचा वापर,राजकारण म्हणजे आपले खिसे भरून जनतेची लूट असाच सर्वसामान्य समज असतो.या साऱ्यांच्या पलीकडे स्वच्छ,निस्पृह, पारदर्शक,प्रामाणिक राजकारण ज्या मोजक्याच लोकप्रतिनिधींनी देशात केले त्यात लाल बहादुर शास्त्री यांचे नाव सर्वोच्च स्थानी होते,आहे आणि राहील.

लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ चा. उत्तर प्रदेशातील मुगलसराय म्हणजे आताच्या पंडित दीनदयाल उपाध्याय नगरचा.त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ असे मोजके दीड वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.पण आपल्या निस्पृह, पारदर्शक,प्रामाणिक कार्याने त्यांनी आपल्या कार्याचा ठसा देशात आणि जगात उमटविला. पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी परराष्ट्रमंत्री आणि गृहमंत्री अशी महत्त्वाची खातीही दीर्घकाळ सांभाळली.

त्याआधी स्वातंत्र्यानंतर ते उत्तर प्रदेश काँग्रेसचे संसदीय सचिव झाले. उत्तर प्रदेशातच पंडित गोविंद वल्लभ पंत यांच्या मंत्रिमंडळात ते पोलीस आणि परिवहन खात्याचे मंत्री झाले. देशातील पहिल्या महिला कंडक्टरची नियुक्ती एस टी मध्ये करण्याचे श्रेय लालबहादूर शास्त्रींना आहे.दंगलीतील संतप्त जमावावर नियंत्रण करण्यासाठी लाठीचार्ज ऐवजी पाण्याच्या फवार्‍याचा वापर त्यांच्याच कारकिर्दीत त्यांच्याच प्रेरणेने आणि कल्पकतेने सुरु झाला. १९५१ मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव झाले. १९५२,१९५७ आणि १९६२ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळवण्यासाठी त्यांनी अतोनात परिश्रम केले होते. २७ मे १९६४ ला पंडित नेहरूंच्या अचानक निधनानंतर स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून देशाचे पंतप्रधान पद त्यांच्याकडे चालत आले.याच काळात पाकिस्तानने भारताशी युद्ध छेडले.त्यात पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तानने कल्पनाही केली नव्हती अशी दारुण स्थिती भारताने पाकिस्तानची केली. एरवी मेणाहून मऊ असणारे शास्त्रीजी वज्राहून कठोर झाले. त्यांनी तिन्ही दलाच्या सेनापतींना पूर्ण स्वातंत्र्य दिले; त्यांना सांगितले की पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी काय करावे हे तुम्ही सांगा, मी त्या आदेशावर सही करतो.त्यांच्या प्रेरणेने भारतीय सैन्याने थेट लाहोरपर्यंत मजल मारली होती.मात्र आंतरराष्ट्रीय दडपणामुळे रशियातील ताशकंद येथे पाकिस्तानबरोबर तह करण्यासाठी ते अनिच्छेने गेले आणि ११ जानेवारी  १९६६ ला तिथेच त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला. 

साधेपणा,प्रामाणिकपणा, देशभक्ती या गुणांमुळे १९६६  मध्येच त्यांना देशाची भारतरत्न ही सर्वोच्च पदवी बहाल करण्यात आली.

१९५१ मध्ये देशाचे रेल्वेमंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून लालबहादूर शास्त्री यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.अशी नैतिकता आज कुठे दिसून येते? घोटाळे सिद्ध होतात, शिक्षा होते पण पद आणि शासकीय बंगले न सोडणाऱ्या आजच्या खुज्या, थिट्या राजकारणापुढे शास्त्रीजींची उंची कितीतरी मोठी आहे.

त्यांच्या साधेपणाच्या कितीतरी गोष्टी सांगता येतील. शास्त्रीजी पंतप्रधान असताना त्यांनी एका कापड गिरणीला भेट दिली. शास्त्रीजींना पत्नीसाठी साडी घेण्याची इच्छा झाली.त्या उद्योजकाने गिरणीतील सगळ्यात भारी साडी त्यांना दाखवली मात्र किंमत ऐकून शास्त्रीजींनी ती साडी घेण्यास नम्र नकार दिला आणि ते देऊ शकतील तितक्याच रकमेची साडी घेऊन त्यासाठीचे पैसेही त्यांनी  दिले आणि उद्योजकाने विनामूल्य देऊ केलेली सर्वात भारी साडी नम्रपणे नाकारली. स्वातंत्र्यपूर्व काळात तुरुंगात असतांना त्यांच्या मुलीची प्रकृती बिघडली.तिची सुश्रुषा करता यावी म्हणून लाल बहादूर शास्त्री ब्रिटिशांची परवानगी घेऊन तुरुंगातून काही काळासाठी बाहेर आले.मात्र त्याच दिवशी त्यांची मुलगी मरण पावली.मुलीचे अंत्यसंस्कार आटोपून शास्त्रीजी तडक पुन्हा तुरुंगात गेले.ज्या कामासाठी बाहेर आले होते ते काम शिल्लक राहिले नाही म्हणून ते स्वतः तुरुंगात परत गेले.

एकदा त्याचा मावसभाऊ स्पर्धा परीक्षेला जात असताना घाईगडबडीत तिकीट न घेता रेल्वेत बसला.पकडले गेल्यानंतर त्याने लालबहादूर शास्त्रींचे नाव सांगितले.पोलिसांनी खात्री करण्यासाठी लालबहादूर शास्त्री यांना फोन केला.शास्त्रीजींनी तो आपला मावसभाऊ आहे हे मान्य केले परंतु तरीही पोलिसांना नियमानुसार कारवाई करायला सांगितले.पंतप्रधान असताना देखील शास्त्रीजी आपले फाटलेले कपडे शिवून वापरत असत.वरच्या कोटाखाली आत फाटका सदरा असे.फाटलेल्या कपड्यांचे रुमाल करून ते वापरत.आजच्या राजकारणी लोकांकडे, त्यांच्या कपड्यांकडे पाहून आपला यावर विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे.

स्वातंत्र्य पूर्व काळात ते काँग्रेससाठी पूर्णवेळ काम करीत असत.त्यांना या कामाचे मानधन मिळत असे. या मानधनातून दरमहा काही रक्कम पत्नीकडे शिल्लक राहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वतः पक्षाला पत्र लिहून मानधन कमी करून घेतले.पंतप्रधान झाल्यावर सुद्धा त्यांनी आपली झोपण्याची गादीही बदलली नव्हती.शास्त्रीजींच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले पैसे देखील त्यांच्या बँक खात्यात नव्हते इतका साधा पंतप्रधान अजून कोणी झाला नसेल आणि होणार नाही.

ते दीड वर्षांचे असतांनाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.त्यांची आई माहेरी वडिलांकडे राहायला आली. मात्र आजोबांचाही मृत्यू झाला.प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. नावेतून शाळेत पलीकडे जाण्यासाठी बऱ्याचदा त्यांच्याकडे पैसे नसत म्हणून आपले दप्तर नावेतील मित्राकडे देऊन ते थेट गंगा नदीत उडी मारून पोहत पलिकडे जात आणि पुन्हा आपलं दप्तर घेऊन शाळेत जात असत.

काशी विद्यापीठात त्यांनी सुवर्णपदकासह शास्त्री मिळवली.तेव्हापासून आपले श्रीवास्तव हे जातीवाचक आडनाव त्यांनी कायमचे काढून टाकले आणि शास्त्री बनले.शास्त्रीजी महात्मा गांधीजींचे कट्टर कार्यकर्ते होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि अनेकदा तुरुंगात गेले.महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये "करो या मरो" असा मंत्र दिला परंतु शास्त्रीजींनी त्यात बदल करून "मरो नही मारो" असा बदल करून तो कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला. पुरुषोत्तम दास टंडन, पंडित गोविंद वल्लभ पंत आणि पंडित नेहरू यांचे त्यांना मार्गदर्शन मिळत राहिले. "जय जवान जय किसान" हा नारा शास्त्रीजींनी दिला.पाकिस्तान बरोबरच्या युद्धात भारतीय सैन्य थेट लाहोरपर्यंत पोहोचले होते मात्र युद्धविरामासाठी जगभरातून भारतावर दडपण आले व पाकिस्तान बरोबर तहाची बोलणी करण्यासाठी शास्त्रीजी रशियातील ताशकंदला गेले.भारतीय सैनिकांनी जिंकलेली जमीन पाकिस्तानला परत देण्याची अट शास्त्रीजींना अजिबात मान्य नव्हती मात्र आंतरराष्ट्रीय दबावाखाली त्यांनी करारावर स्वाक्षरी केली खरी परंतु त्याच मध्यरात्री त्यांचे रहस्यमय निधन झाले.

त्यांचा आणि महात्मा गांधींचा वाढदिवस एकाच दिवशी येई. याचा कोणी उल्लेख केला की त्यांना संकोच वाटत असे. आपल्यापेक्षा गांधीजींचे कार्य खूप मोठे आहे असे ते विनयाने म्हणत. एक इमानदार, साधी राहणी, सरळ, सच्चे, इतरांच्या दुःखाने दुःखी होणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.राजकारणाच्या भांगेतील तुळस असेच वर्णन त्यांच्या कार्याचे करता येईल. त्यांच्या कार्यास, स्मृतीस,साध्या आचरणास,उच्च विचारसरणीस त्यांच्या 

११८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏🏼

जय जवान- जय किसान

- दिलीप वैद्य,रावेर मो नं ९६५७७१३०५०

स्रोत : कायप्पा