Monday, June 27, 2022

अर्थ साक्षरता अभियान: हस्ताक्षर स्पर्धा



भारतीय स्वातंत्र्याचे  अमृत महोत्सवी वर्ष हे  निमित्त साधून,  SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रा. लि. नासिक आणि अप्लारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन, नासिक यांचा संयुक्त उपक्रम "अर्थ साक्षरता अभियान: हस्ताक्षर स्पर्धा" 

१) स्पर्धा  गट : 

गट १: रुजवात अर्थसाक्षतेची : वयोमर्यादा : १० ते १७. 

गट २: बोधी अर्थसाक्षतेची : वयोमर्यादा :  १८ पासून पुढे 

गट ३: तीचे अर्थभान (महिलांसाठी फक्त) : वयोमर्यादा :  १८ पासून पुढे 

२) अपेक्षित 

अप्लारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशनच्या ब्लॉगच्या  संकेतस्थळावर वरील तीन गटांसाठी लेख दिलेले आहेत. 

१) तुमच्या गटासाठी असणारा  लेख (मराठी किंवा इंग्रजी पैकी कोणताही एक ) स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून, त्याचा फोटो २५ जुलै २०२२, च्या आत alparambha@gmail.com या ईमेलवर  पाठवायचा आहे.  ईमेल च्या विषयामध्ये  "हस्ताक्षर स्पर्धा" असा उल्लेख करावा. परीक्षणा दरम्यान  हस्ताक्षर, मांडणी, सजावट हे मुद्दे पाहिले जातील.     

२) सोबत तुमचा आधारकार्ड फोटो / इतर जन्मतारीख दर्शविणाऱ्या अधिकृत कागपत्राचा फोटो पाठविणे बंधनकारक !

लेख-मराठी : गट १: रुजवात अर्थसाक्षतेची 

 चक्रवाढ व्याजाचा बागुलवुवा ??

“चक्रवाढ व्याज” हा गणिती शब्द आपल्याला इयत्ता आठवीमध्ये गाठतो. हे नाव आणि त्याचा गणिती फॉर्म्युला वाचला ना की बऱ्याच मुलाना धडकीच भरते बर का !! या संकल्पनेचा बागुलबुवा उभा ठाकतो समोर आणि मग ह्या साध्या, सोप्या संकल्पनेची भीतीच वाटायला लागते. तर आज आपण जरा, याच  बागुलबुवाचा समाचार घेउयात.

                एक गोष्ट सांगते तुम्हाला. एका गावात, अतिशय उत्कृष्ट गायन करणारे दोन गायक रहात असत. त्यांची नावे होती वीरसेन आणि तानसेन. त्या गावाच्या राजदरबारी, राजगायक म्हणून कोणाची नियुक्ती करावी हे ठरविण्यासाठी, त्या गावाच्या राजाने, या दोघांच्यात गायन जुगलबंदीचे आयोजन केले. जो सरस ठरेल, तो अर्थातच भावी राजगायक होणार होता! निर्णायक सभेमध्ये, दोघांनीही उत्कृष्ट असे गायन सादर केले. राजा अतिशय प्रसन्न झाला. परंतु त्याला प्रश्न पडला की शेवटी निवड कोणाची करावी? मग त्याने एक युक्ती केली. दोघांनाही  बक्षिसी मागायला सांगितली. वीरसेनने खुश होऊन १०० पोती धान्य मागितले. राजाने ती मागणी तत्परतेने मान्य केली. वीरसेनचे कल्याण झाले म्हणून सगळे दरबारी आनंदून गेले. तानसेन मात्र अधिक चतुर होता. तो राजास म्हणाला, “मला आज तांदुळाचे फक्त दोन दाणे द्या. मात्र येणाऱ्या प्रत्येक दिवशी, मागील दिवसाच्या दुप्पट दाणे, माझ्या धान्य कोठारात जमा करण्यात यावे.” त्याची ही मागणी  ऐकताच, दरबारी लोक त्याला हसू लागले !! त्यांना वाटले, की मागून मागून काय मागितले तर तांदुळाचे फक्त दोन दाणे !! पण चाणाक्ष राजाने मात्र खूष होऊन ती मागणी मान्य केली आणि  मनोमनी तानसेनची, राजगायक म्हणून नियुक्तीही  करुन टाकली. प्रजेच्याही लक्षात यावे, म्हणून राजाने तानसेनच्या धान्य कोठारातरोजचे तांदूळ दाणे पोहचविण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी २, मग ४, मग ८, १६, ३२, ६४.....असे होता होता, काही काळातच, कोठारात पोत्यांनी धान्य जमा व्हायला सुरुवात झाली !! आणि बघताबघता १०० हून अधिक पोती धान्य जेव्हा जमा झाले, तेव्हा तानसेनने हे दान थांबविण्याची विनंती केली!! हे सर्व प्रजेच्या लक्षात येताच, राजाने तानसेनच्या नियुक्तीची  घोषणा केली !!

रुजवा हे मनो-Money:  "Effect of Compounding" म्हणजेच चक्रवाढ पद्धतीपासून अधिकाधिक लाभ मिळणेसाठी, बचत किंवा गुंतवणुकीची सुरुवात लवकरात लवकर करा !   



लेख-इंग्रजी : गट १: रुजवात अर्थसाक्षतेची 

Financial Literacy For Kids

For the children, the first step in understanding value of saving is to learn to distinguish between wants and needs. They should understand that needs include the basics, such as food, shelter, basic clothing, healthcare, and education. And that wants are all the extras—from movie tickets and candy to designer sneakers, a bicycle, or the latest smartphone.

The venerable piggy bank is a useful savings vehicle for younger children, but when they hit elementary school, they need to consider opening a saving account at an actual bank. It’s a good way to install the importance of gradually building up their balance, and it gives children an introduction to the banking industry.

Research suggests that many parents are reluctant to even talk about money with their kids. A 2021 survey by T. Rowe Price found that 41% of parents avoided those conversations. To teach healthy behaviors regarding money, moms and dads have to find a way to discuss the subject in the home.


लेख-मराठी : गट 2 : बोधी  अर्थसाक्षतेची 
 
मेडिक्लेम पॉलिसी  आणि अपेक्षित लाभ

जर एखाद्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला, भले कारण  आजार असो किंवा अपघातरुग्णालयाचा अनपेक्षित , अकल्पित असा खर्च  उभा राहतोच  ! अशा खर्चाची काळजी घेण्यासाठी मेडिक्लेम अथवा आरोग्य विमा हे साधन उपलब्ध असते. परंतु त्यापापसुन अपेक्षित लाभ मिळण्यासाठी, या विम्याच्या बाबतीत काही  सजगता बाळगणे जरुरी असते. आपण सर्वांनी, मेडिक्लेम पॉलिसी बाबत पुढील काळजी नक्कीच घ्यावयास पाहिजे.  

मेडिक्लेम पॉलिसी मध्ये आपल्या सर्वच कुटुंबियांचा समावेश आहे किंवा नाही ते एकदा तपासून पहा. आपल्या कुटुंबामध्ये नवीन व्यक्ती दाखल होताच, मेडिक्लेम पॉलिसी मध्ये सुधारणा करण्यास हवी. आपल्या आर्थिक सल्लागारास, कुटुंबातील असे बदल आवर्जून सांगणे आवश्यक असते. आता ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील, मेडिक्लेम पॉलिसी सुविधा उपलब्ध आहे. अगदी सत्तर वर्षाच्या व्यक्तीलासुद्धा मेडिक्लेम पॉलिसी मिळते. तेव्हा आपल्या आई-वडीलांच्या नावाचाही , मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समावेश करून घ्या. मेडिक्लेम पॉलिसी जुनी असली तरी बऱ्याच वेळा विमा कंपनीकडूनही चुका होऊ शकतात आणि “नो‌ क्लेम बोनस”, पुढच्या नूतनीकरण झालेल्या पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जात नाही. पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी ही बाब देखील तपासून घेतली पाहिजे. बहुतेक सर्व मेडिक्लेम पॉलिसी कंपनी मार्फत, दर दोन वर्षांनी किंवा चार वर्षांनी “मेडिकल टेस्ट” साठी लागणारा  सर्व खर्च दिला जातो. ह्या सुविधेचा लाभ, आपण वेळचेवेळी घ्यायला पाहिजे. मेडिक्लेम पॉलिसीचा लाभ मिळणेसाठी, कुठल्याही आजारपणामुळे जर रुग्णालयात दाखल व्हावे लागले  तर कमीत कमी 2४ तास ऍडमिट असणे गरजेचे असते. ॲक्सिडेंट/अपघातच्या  केस मध्ये मात्र हे सक्तीचे नाही. अशावेळी, तुम्ही उपचार घेऊन घरी जाऊ शकता, फक्त कागदपत्रांची पूर्तता उपचारादरम्यानच करावी लागते. आपल्या आर्थिक सल्लागाराला, आपण  "अर्था " शी  निगडीत असलेल्या आणि त्यावर परिणाम करू शकणाऱ्या सर्व बाबींची यथायोग्य, वेळेचेवेळी माहिती, पूर्णपणे द्यायाला हवी.

अशी सर्व काळजीआपण घेतली तर मेडिक्लेम पॉलिसी  मार्फत अपेक्षित असणारे  लाभ, आपल्याला मनस्तापाशिवाय घेता येतील.

                                                लेख-इंग्रजी : गट 2 : बोधी  अर्थसाक्षतेची 

Hold hand of right buddy..

Investing in Equity or Mutual Funds is like playing a Test Match. The more you stay on the crease; chances are more to make high scores. The Run Rate (Rate of Return) is not that important. If we continuously focus high Run Rate (returns), there are high chances of getting out at early stage. We just need to ensure we are playing with a good batsman irrespective of whether he is Virat, Sachin, Dhoni or Shikhar, Rahul or Rohit. We know all shall score high if any one of them remain on crease for a longer time. As we don’t know who is going to score more in the long run, we cannot assure high returns on any single scheme. Also, to be in the leading position, we need to do few adjustments in the batting strategy (Portfolio Balancing) leveraging on the situation offered from the opponents (Market). Here, in this inning of your investments with you as a batsman, your Financial Advisor plays the role of Buddy on the pitch, who holds your hands in all situations and manages your emotions and hence your performance!!

Hence investment in Mutual Funds or Equity simulates to  playing a Test Match where rate of return is just a check, whereas consistency and staying on the crease for long time is the key to WIN. Hold hand of right buddy to achieve Best Performance!!

लेख-मराठी - गट ३: तीचे अर्थभान (महिलांसाठी फक्त) 

 तीचे अर्थभान

घरातील आर्थिक निर्णय असू देत नाहीतर चर्चा, आपल्या आजूबाजूला घडणारे अनेक 'अर्थ'पूर्ण प्रसंग पाहिल्यानंतर हे खचितच मनात येते की 'घरातील स्त्रियांची, कुटुंबासंबंधित घेतल्या जाणाऱ्या आर्थिक निर्णयांबाबत/ नियोजनामध्ये  नक्की  काय भूमिका असते ? आधुनिक जगातील स्त्री वर्गाला पुरेसे अर्थभान आहे का?' घरातील स्त्री, मग ती स्वतंत्रपणे कमाविती असू देत किंवा नाही, तिचे घरातील आर्थिक निर्णयांबाबतचे मत अगदीच मोजक्याच घरांमध्ये जमेस  धरले जाते. याला कारण ठरते स्त्रीचे 'अर्थभान' ! 

 आपला पेहराव, वागणे-बोलणे, घराचा चेहरा-मोहरा 'अप टू डेट' ठेवणारी स्त्री, तिच्या आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत मात्र  'आउट-ऑफ-डेट' दिसून येते. आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल-मीडियाला  चुटकी(की बोटां)सरशी हाताळणारी स्त्री आर्थिक-निर्णय घेण्याच्या  बाबतीत मात्र  परावलंबीच आहे असे चित्र दिसते.आपल्या कुटुंबाकरिता कुठले आर्थिक निर्णय घेतले जातात आणि घ्यायला पाहिजे यावर स्त्रीलाही आपले स्वतंत्र, अभ्यासपूर्ण मत मांडता आले पाहिजे. आपल्याला बचत/गुंतणवुक   माध्यमांचे पुरेसे ज्ञान नाही या  वास्तवाला  'आता वेळ नाही' किंवा 'इतर कामे काय कमी आहेत' अशा सबबी सॊयीस्कररित्या पुढे करुन, स्त्रिया दूर ठेवू पाहतात. आर्थिक बाबींमध्ये सहभागी होण्याच्या संधीला त्या आळसापोटी, अज्ञानापोटी वेळोवेळी दवडतात. 'म्युचुअल फंड्स' , 'टॅक्स रिटर्न्स', 'लोन रिपेमेंट ऑप्शन्स'  इ. सारखे शब्द नुसते ऐकले तरी 'ते सगळे आमच्या ह्यांच्याशी बोला' असा आपल्या 'ह्यां'च्याकडे अंगुलीनिर्देश करून स्त्रीवर्ग  स्वतःची सुटका करून घेतो. खूपच कमी स्त्रिया अशा सर्व बाबी स्वतंत्रपणे हाताळतांना दिसतात. केव्हाही, कुठल्याही आर्थिक विवंचनेस, अनपेक्षीतरित्या  सामोरे जावे लागू शकते ह्याची जाणीव ठेवून प्रत्येक स्त्री ने आर्थिक बाबतीतही आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व आर्थिक योजनांचा, गुंतवणूक माध्यमांचा बारकाईने अभ्यास करण्याची वृत्ती जोपासण्याची आवश्यकता आहे.

मैत्रिणिनो, करा विचार, करा अंमल  ! जागवा स्वतःचे अर्थभान ! तुमच्यासाठी ... तुमच्या लाडक्या  कुटुंबियांसाठी !!    


लेख-इंग्रजी : गट ३: तीचे अर्थभान (महिलांसाठी फक्त) 

Financial literacy for women 

Financial literacy for women is an important aspect of their independence, financial and otherwise. Being financially illiterate can lead to a number of problems.   Financial literacy empowers people, especially women, to make independent decisions. During emergencies or unforeseen circumstances, an individual can take correct steps if she is financially literate.

Why do women need financial literacy?

This is due to the following reasons:

1. It prepares them for emergencies.
2. Women can help deal with rising costs of living and inflation if they are financially literate.
3. Children tend to be more influenced by their mothers than their fathers. Being financially literate sets a good example for your children as well.
4. In most households, women are responsible for the day-to-day expenses. Thus, it is helpful for them to know how best to use the money.
5. Women tend to live longer than men, and thus they should have the knowledge to carry on their day-to-day affairs and manage finances.
6. Women who are financially literate gain more confidence in their own decision-making.

Saturday, June 25, 2022

राष्ट्रीय सांख्यिकी दिन (National Statistic Day)

 राष्ट्रीय सांख्यिकी दिन  (National Statistic Day)




दैनंदिन जीवनात सांख्यिकींचा वापर लोकप्रिय करण्यासाठी 29 जून रोजी हा दिवस पाळला जातो. दिवंगत प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी आर्थिक नियोजन आणि सांख्यिकी क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून राष्ट्रीय सांख्यिकी दिन त्यांची जयंती म्हणून साजरा केला. 

प्रोफेसर प्रशांत चंद्र महालनोबिस किंवा पी.सी. महालनोबिस यांचा जन्म 29 जून 1893 रोजी कलकत्ता (आता कोलकाता), भारत येथे झाला. 28 जून 1972 रोजी कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले. ते भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांनी महालनोबिस अंतराची आखणी केली आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत भारताची औद्योगिकीकरणाची रणनीती तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी 17 डिसेंबर 1931 रोजी कलकत्ता येथे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली.त्यांनी दोन डेटा संचांमध्ये तुलना करण्याचे मोजमाप देखील तयार केले आणि आता ते महालनोबिस अंतर म्हणून ओळखले जाते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर नमुना सर्वेक्षण करण्याचे तंत्र शोधून काढले आणि यादृच्छिक नमुन्यांची पद्धत वापरून एकरी क्षेत्र आणि पीक उत्पादनाची गणना केली. त्यांनी लोकांच्या विविध गटांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीची तुलना करण्यासाठी फ्रॅक्टाइल ग्राफिकल विश्लेषण म्हणून ओळखली जाणारी सांख्यिकीय पद्धत देखील तयार केली. पूरनियंत्रणासाठी त्यांनी आर्थिक नियोजनासाठीही आकडेवारी लागू केली.

यात शंका नाही की, त्यांच्या कार्यामुळे सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये सांख्यिकीच्या भूमिकेबद्दल प्रामुख्याने नवीन पिढीतील लोकांमध्ये जागरुकता निर्माण होईल 


Saturday, June 18, 2022

चित्रकाव्य : कौलारू घर

 



असावे सुंदर 👌🏽
कौलारू घर 🏠
आणि सभोताली 😇
आप्तांचा वावर 👨‍👩‍👧‍👧

लाल अंगणी साजिरे 🏡
शोभे भरदार वृंदावन 🍃
चाफा, जास्वंदी , मोगरीने 🥀🌺
सतत धुंदाविते मन  😊

नारळी, केळी,पोफळीची 🌴🌴
छपरावरी चामर 
दारी उभे स्वागताला 😊
आंबे, फणस तत्पर 🙏🏼

दरवळ भोजनाचा 
रांधे सुगरणीचा हात 🍤🥙🥭
मन आणि पोट 😊
भर तृप्तीची सुखात 🤩


मऊसूत घावणे,🫓
सोलकढी, मोदक, 🥥
आमरस, कैरीपन्हे 🥤🥭
शांतवाया उदक 😊

घर डुंबते असे  
हस्यकल्लोळात 😆
गप्पांचा फड 👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧
रंगे हरएक रात 🌚

राहो अशीच अखंड 💞
घर, सवंगड्यांचीही साथ ❤️
जावो आयुष्य सर्वांचे 😊
असे सुखात, सुखात 😇

 डॉ. रुपाली कुलकर्णी,

  ट्रेनिंग हेड,

  SWS  

Saturday, June 11, 2022

निवेदनातील प्रकाशमान सरस्वती अनघा मोडक





महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राबाहेरचे असंख्य कार्यक्रम, व्याख्याने यामुळे लोकांसमोर आज अनघा मोडक हे निवेदन क्षेत्रातलं आघाडीचं नाव आहे. अंधत्वावर मात करून सुरू असलेला अनघा मोडकचा प्रवास सर्वांना नक्कीच प्रेरणादायी आहे.

ती कुठेतरी बघून वाचतेय, तिच्या हाताजवळ कागद असणारच त्याशिवाय एवढ कसं बोलेल…. एका कार्यक्रमातील रसिकांमध्ये सुरु असलेली कुजबुज… कार्यक्रमाचा निवेदक किंवा निवेदिका म्हटल कि माईकबरोबरच भरपूर कागदांचा ढीग, प्रसंगी नकोसं वाटणार निवेदन आणि कंटाळवाणा सूर अशी प्रचिती येते. पण याला अपवाद ठरणार सध्याचं आघाडीचं नाव म्हणजेच अनघा मोडक. आजारामध्ये दृष्टी गमावल्यानंतरही जिद्दीने तीने आपले कार्य सुरूच ठेवले असून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निवेदनामध्ये धनश्री लेले, सुधीर गाडगीळ आणि अनेक मान्यवर निवेदकांच्या पंक्तीमध्ये आज अनघाचे नाव आदराने घेतले जाते.

डोंबिवलीमध्ये रंगलेला शब्दसूरत्रिवेणी हा कार्यक्रम. आजही हा कार्यक्रम रसिकांच्या आठवणीमध्ये आहे तो या कार्यक्रमाच्या निवेदनामुळे. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच टाळ्यांचा कडकडाट आणि दाद मिळत होती. पण विशेष म्हणजे ही दाद होती अनघाच्या निवेदनाला. एरव्ही गाण्याला दाद देणारे रसिक गाण्याबरोबरच अनघाच्या निवेदनालासुद्धा दाद देत होते. हे तर एक उदाहरण झालं, अशा अनेक कार्यक्रमांच्या आठवणी अनघाच्या निवेदनामुळे आणि तिच्या अद्वितीय वाणीमुळे रसिकांच्या स्मरणात आहेत. शांत, धीरगंभीरपणे रंगमंचावर बसणारी अनघा ज्यावेळी अभ्यासपूर्ण निवेदन करते त्यावेळी त्या कार्यक्रमाचे यश निश्चितच असते. दुर्दैवाने डेंग्यूच्या आजारामुळे तिचे डोळे तिने गमावले. मात्र त्यानंतरही तिचा प्रवास थांबला नाही. उलट एवढ्या मोठ्या संकटावर मात करत आज अनघा अधिक सक्षमपणे उभी आहे आणि अनेक तरुणांसाठी आदर्श म्हणून काम करत आहे.

२०१४ ची गोष्ट, डेंग्यूच्या तापाचे निमित्त झाले आणि या आजाराने अनघाने दृष्टी गमावली. क्षणभर अनघालासुद्धा या आजाराचा धक्का बसला, मात्र त्याने अनघा कोलमडून गेली नाही. घरातले मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी या सगळ्यांसाठी हा एक मोठा धक्का होता. आता पुढे काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच होता पण अनघा मात्र शांतपणे या सगळ्याला सामोरी गेली. खूप बाहेरच जग अनुभवलस आता जरा आतमध्ये डोकावून बघ या तिच्या गुरूंनी दिलेल्या सूचनेच पालन तिने केलं आणि तिथपासून सुरु झाला एक नवा आणि कलाटणी देणारा प्रवास. जितक्या लवकर या धक्क्यातून बाहेर येणार तितक्या लवकर पुढचा प्रवास सुकर होईल हे अनघाने ओळखल आणि तिने आपली नवी वाट निवडली. यामध्ये तिचे कलाकार मित्र, मित्र मैत्रिणी, कुटुंबिय यांचा आधारसुद्धा मोलाचा होता.

अनेक लोकांना जन्मतःच दृष्टी नसते, त्यापेक्षा आपण भरपूर नशीबवान आहोत असा सकारात्मक विचार करत अनघाने पुढची वाट पकडली. यावेळी तिला मदत झाली ती तिच्या महाविद्यालयीन आणि शालेय जीवनातील साहित्य आणि कलेच्या व्यासंगाची. त्यातूनच तिने निवेदनाची वाट धरली. आजच्या घडीला काही मोजक्या सर्वोत्कृष्ट निवेदकांमध्ये अनघाची गणना केली जाते.

रंगांची आणि भटकंतीची प्रचंड आवड अनघाला होती. कॉलेजमध्ये असतानाच बाईक चालवण, गाडीने सफर करण हा तर तिचा आवडीचा उद्योगच. मात्र दृष्टी गमावल्यानंतर हालचालींवर आलेली मर्यादा आणि थांबलेल्या इतर गोष्टी अनघाने अत्यंत सकारात्मक पद्धतीने झेलल्या. रंगमंचावर निवेदक म्हणून गेल्यावर समोरचं दिसत नसेल तरीही रसिकांची दाद त्यांच्या शब्दांमधून आणि टाळ्यांच्या आवाजातुन ऐकता येते आणि यातच स्वतःला भाग्यवान समजून अनघाने आपली वाटचाल पुढे सुरु ठेवली.

अनघाने साहित्य विषय घेऊन रुपारेल महाविद्यालयातून बीएची पदवी घेतली. पत्रकारितेचा डिप्लोमा तिने केला, त्याचबरोबर फोटोग्राफीचा डिप्लोमापण केला. त्यानंतर पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयातून तिने पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिने गांधर्व महाविद्यालयातून गायनाचेही शिक्षण घेतले आहेत. काही काळ विविध वृत्तपत्रांमध्येही ती कार्यरत होती. सध्या मुंबई आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवर निवेदक म्हणून कार्यरत आहे. त्याशिवाय ती अनेक कार्यक्रमांसाठीही निवेदन करते. विविध विषयांवर व्याख्याने देते. वक्तृत्वकलेची तिला लहानपणापासूनच आवड आहे. तिला पद्यवाचनात विशेष रस आहे. ती स्वतःही कविता करते. डबिंग आर्टिस्ट म्हणूनही तिने काम केले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह गुजराती आणि संस्कृत भाषेचेही तिला उत्तम ज्ञान आहे. भविष्यात उर्दू, जर्मन यांसारख्या भाषांवरही प्रभुत्व मिळवण्याची तिची इच्छा आहे. यापुढे विवध विषयांवर व्याख्याने द्यायचा आणि वैविध्यपूर्ण निवेदन करण्याचा तिचा मानस आहे. आतापर्यंत तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एकंदरीत, तरुणांना, सातत्याने अडचणींचा पाढा वाचत पळवाट काढणाऱ्यांना आणि शारीरिक व्यंगाचा बाऊ करून सहानुभूती मिळवणाऱ्या सर्वांसाठीच अनघाचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रेरणादायी असे आहे.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत संयोजक कमलेश भडकमकर याने अनघा हिला निवेदन करण्याची विचारणा केली. त्यावेळी अनघाने हातात कागद नसल्याने विसरले तर काय असा प्रश्न उपस्थित केला. मात्र त्यावेळी कमलेश भडकमकर यांनी अनघाला विश्वासाने निवेदन करण्याचा सल्ला दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे अनघाचे दैवत. त्यांच्यावर आधारित कार्यक्रमाचे निवेदन करण्यासाठी सांगितल्यावर अनघाने एक महिनाभर तालीम केली आणि त्यानंतर निवेदन यशस्वीपणे केले. तेव्हापासून नियमितपणे व्याख्यानं, विविध कार्यक्रमाचे निवेदन, आकाशवाणीसाठी आरजे तसेच एबीपी माझाच्या माझा संघर्ष आणि मी या कार्यक्रमासाठी निवेदन अनघा सध्या करत आहे. तुम्ही हसत राहिलात तर दुखसुद्धा आपोआपच कमी होतात असं अनघा सांगते.

एखाद्या उंची अत्तराचा सुगंध जसा बहरत जातो तसा कार्यक्रमाच्या प्रवासामध्ये अनघाच्या निवेदनाला बहर येत आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये लोकांसमोर काहीतरी नवीन आणि रंजक मांडण्याचा प्रयत्न अनघा करत असते. आजच्या घडीला संपूर्ण राज्यभर व्याख्याने आणि कार्यक्रमांचे सादरीकरण अनघाने केलं आहे. जवळपास ५०० व्याख्याने आणि शेकडो कार्यक्रमांसाठी आजपर्यंत तिने निवेदन केले आहे. बेंगलोर महाराष्ट्र मंडळ, आर्ट सर्कल रत्नागिरी यांसारख्या मानाच्या संस्थाचा यामध्ये सहभाग आहे. विषयाची उत्तम समज, भाषेचा गाढा अभ्यास, शांत, धीरगंभीर पण तितकाच मिश्कील स्वभाव, निर्मळ मन आणि या सगळ्यांच्या जोडीला रसाळ वाणी आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी यामुळे अनघाच्या निवेदनाने एक वेगळीच उंची आज गाठली आहे. साधारणपणे निवेदक म्हटल की बोलताना वहावत जाण्याचा निवेदकांचा स्वभाव असतो. मात्र कुठे थांबावं आणि रसिकांना क्षणार्धात आपलसं कशाप्रकारे करून घ्यावं याची उत्तम जाण अनघाला आहे. त्यामुळे आजच्या घडीला एक यशस्वी निवेदिका म्हणून तिची ओळख आहे. याच जोडीला सावरकर, ज्ञानेश्वरी, दासबोध यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवर ती व्याख्यानेसुद्धा देते. त्याचबरोबर वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या संकल्पना डिझाईन करून त्या लोकांसमोर मांडण्याचासुद्धा तिचा प्रयत्न असतो.

आपल्या जडणघडणीत आई-वडील, पार्ले-टिळक शाळेतील आणि रूपारेल कॉलेजमधील शिक्षक आणि आणखी अनेक जणांचा मोठा सहभाग असल्याचे अनघाने नमूद केले. लहानपणी वडिलांनी शिकवलेली स्तोत्रं, पाहिलेल्या आणि ऐकलेल्या अनेक मुलाखती, तसेच मेघदूतासारखे कार्यक्रम यांमुळे सुस्पष्ट उच्चारण, उत्स्फूर्तता यांसारख्या गोष्टी अंगी बाणवल्या गेल्या असे तिने सांगितले. ‘‘तुला मोठं व्हायचं असेल तर पक्ष्यासारखी भरारी घेऊ नकोस. झाडासारखी मोठी हो. झाड उंच असल्यामुळे त्याचं आभाळाशी नातं असतंच, पण त्याची मुळं जमिनीशी जोडलेली असतात” या वडिलांनी दिलेल्या संदेशाचाही अनघा आवर्जून उल्लेख करते.

कॉलेजने घडवलं

रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना तिथल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा फायदा झाल्याचे अनघा सांगते. अनघातील अंगभूत गुणांना व प्रेरणांना दिशा देणारे शिक्षक लाभले. “वक्तृत्व स्पर्धेत भाग घे. फार तर काय होईल, हरशील. इतकंच ना? ‘अनुभव’ कधी हरवत नसतो.” असं राव मॅडमच्या मुखातून कुणीतरी पहिल्यांदा सांगितलं. अनघाला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आणि या वाक्यानेच तिला मणभर आत्मविश्वास मिळाला. त्यानंतर अनघाने सुमारे सत्तर वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यातील अडसष्ट स्पर्धा जिंकल्या ! इतकंच नव्हे, तर बारावीत असताना ‘बेस्ट परफॉरमर ऑफ द इयर’ हा किताबही अनघाला मिळाला. चित्रांची प्रदर्शने पाहताना त्यात नेमकं काय पहायचं, सिनेमाचा-गाण्यांचा आस्वाद कसा घ्यायचा, ही दृष्टी कोल्हे व गोडबोले सरांनी दिली. थोडक्यात काय, तर अनघाचं खऱ्या अर्थाने बौद्धिक पालनपोषण करणारं सगळं काही त्या रुपारेल कॉलेजच्या वास्तूत होतं. त्याच काळात आणखी एक घटना घडली आणि त्यामुळे अनघाच्या करिअरला एक कलाटणी मिळाली. एका कार्यक्रमात आयत्या वेळी अनघाला निवेदन करण्याची जबाबदारी येऊन पडली, आणि अनघाने ती इतकी उत्तम निभावली की त्याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या संगीतकार कौशल इनामदार यांनी अनघाचं प्रचंड कौतुक केलं. आपण उत्तम निवेदन करू शकतो हा आत्मविश्वास तिथेच अनघाला प्राप्त झाला.

त्यावेळी रुपारेलमध्ये गाण्याचे वेगवेगळे कार्यक्रम सादर व्हायचे. त्यासाठी तबल्यावर प्रसाद पाध्ये, बासरीवर वरद कठापूरकर, किबोर्डसाठी सागर साठे यांसारखे दिग्गज कलाकार असायचे. त्यावेळी कार्यक्रमांमध्ये आयत्यावेळी होणारे गाण्यांचे बदल, लिस्टमध्ये होणारे बदल यामुळे निवेदनामध्ये कराव्या लागणाऱ्या कसरतीची सवय झाली आणि त्यातूनच आज निवेदनामध्ये अडचण येत नसल्याचे अनघा सांगते.

संपूर्ण निवेदन तोंडपाठ

तीन तासाच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे निवेदन असो किंवा एखाद्या व्याख्यानाचा विषय असो. याचे निवेदन रेकॉर्डरच्या मदतीने अनघा मुखोग्द्त करते. अगदी सहजतेने कार्यक्रमाच्या वेळी लोकांसमोर निवेदन करत असताना निवेदनामध्ये वेगळेपणा अनघाने जतन केला आहे. मात्र त्यामागे असते अनेक दिवसांची मेहनत, एखाद्या कार्यक्रमाचे निवेदन करण्यासाठी अनघा जवळपास महिन्याभराचा अवधी घेते. त्यानंतर माहिती संकलनासाठी मदत घेतल्यानंतर ती स्वतःची स्वतंत्र स्क्रिप्ट तयार करते, त्याचे पाठांतर करत असताना त्यामध्ये बदल करते आणि या सगळ्यातून तज्ञ मंडळींशी चर्चा करून त्यानंतर कार्यक्रमामध्ये अंतिम निवेदन लोकांसमोर मांडते. अर्थात यामध्येसुद्धा उस्फुर्त सुचणाऱ्या कितीतरी गोष्टींचा समावेश निवेदनामध्ये असतोच हे विशेष. खास बाब म्हणजे एकाच संकल्पनेचे निवेदन दुसऱ्यांदा करायचे असले तरीही संपूर्ण स्क्रिप्ट पुन्हा एकदा तयार केली जाते. त्यामध्ये आवश्यक ते बदल करून प्रत्येकवेळी रसिकांना काहीतरी नवीन ऐकायला मिळाव हा अनघाचा प्रांजळ प्रयत्न असतो. यासाठी अनघाचे मित्र मैत्रिणी तिला माहितीचे संकलन करण्यास मदत करतात. याशिवाय प्रचंड वाचन याआधी केल्याने त्याचबरोबर वेगवेगळ्या निवेदकांचे विचार आणि गाण्यांचे वेगवेगळे कार्यक्रम ऐकल्याने अनघाने माहितीचा अमृतसंचय जमवला आहे. तंत्रज्ञान विकसित होत असल्याने त्याच्या मदतीने हा अनघाचा प्रवास सुरु आहे.

थांबण हा पर्याय नाही

एखाद शिखर गाठताना आपण ते शिखर सर केल्याशिवाय कधीच थांबत नाही. त्याचप्रमाणे आयुष्याच्या वाटेवर प्रवास करत असताना वळणवाटा या येणारच, त्यावेळी मात्र थांबणे हा पर्याय नसून नेहमी आपला प्रवास सुरूच राहिला पाहिजे असं अनघा सांगते. या प्रवासामध्ये आपल्यामागे अनंत हातांचे, आपल्या हितचिंतकांचे बळ असते. त्यामुळे त्या आधारावर नेहमी मार्गस्थ व्हायला पाहिजे असा विचार अनघा मांडते. शोभा कुंटे, शशिकुमार लेले, नेहा खरे, सोनाली गोखले, मीनल मोहाडीकर, सहकलाकार निरंजन लेले, प्रसाद पाध्ये, केतकी भावे जोशी यांसारख्या अनेकांचे सहकार्य मिळाल्याचे अनघा सांगते. माझ्यासाठी अनेक जण माझे डोळे होऊन मदत करत आहेत. त्या सर्वांच्या मदतीने माझा प्रवास पुढे सुरु असल्याचे अनघा सांगते. आत्तापर्यंत अनघाला तिच्या संपूर्ण वाटचालीसाठी वेगवेगळ्या पुरस्कारांनीसुद्धा सन्मानित करण्यात आल आहे . NAB चा राज्यस्तरीय पुरस्कार, पु ल देशपांडे युवा पुरस्कार यांसारख्या अनेक मोठ्या पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे.

अनघाचा असा हा निवेदनाचा प्रवास सुरूच आहे. काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द असल्यावर यश हे नक्की मिळतच.नवनवीन संकल्पना आणि कार्यक्रम आपल्याला तिच्या माध्यमातून अनुभवायला मिळत राहतीलच यात शंका नाही. तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

– आदित्य बिवलकर

स्रोत : कायप्पा 

Saturday, June 4, 2022

निमित्त : ५ जून : जागतिक पर्यावरण दिवस : प्लास्टिकचे रस्ते, प्लास्टिकचे फ्युएल!


प्लास्टिकचे रस्ते, प्लास्टिकचे फ्युएल!



आपल्या आजूबाजूच्या कचरापेट्यात, रस्त्यावरच्या मोकळ्या जागेत, हायवे आणि रेल्वेरूळांच्या शेजारी सहज नजर गेली तरी काय दिसतं? प्लास्टिकच्या पिशव्या, चिप्स, खाऊची रिकामी पाकिटं, कोल्डड्रिंकच्या बाटल्या यांचा अगदी खच. असं वाटतं की हे प्लास्टिक पृथ्वीला दशांगुळे व्यापून राहतंय की काय?  अगदी गायी- गुरं यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशीच एक घटना केशव- सीता मेमोरियल ट्रस्टच्या शिरिष फडतरे आणि डॉ. मेधा ताडपत्रीकर या संस्थापक सदस्यांच्या बाबतीत घडली. एका अभयारण्यात फिरायला गेलेले असताना, तिथल्या एका हरिणाचा मृत्यू पोटात प्लास्टिक गेल्याने झाल्याचं कळलं, आणि हे दोघेही खूप हळहळले. 

“या घटनेनं आम्हांला विचार करायला भाग पाडलं. आजूबाजूला वाढत जाणारे प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग अस्वस्थ करतच होते. शिवाय त्यात असे मुक्या प्राण्यांचे प्लास्टिक पोटात गेल्याने होणारे मृत्यू पाहून जास्तच त्रास होत होता. यावर काहीतरी उपाय करूया, असं ठरवलं. खरंतर मी आणि मेधा या दोघांपैकी कुणीच थेट संशोधक किंवा विज्ञान विषयाच्या पार्श्वभूमीचं नाही. मी कॉस्ट अकाऊंटंट तर मेधा यांची मार्केटिंग क्षेत्रात पीएचडी झालेली आहे. पण एकदा यात उतरायचं ठरवल्यावर या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक, संस्था, केमिकल, पॉलिमर इंजिनिअर्स यांच्याशी चर्चा- संशोधनं वाचणं सुरू केलं.” संस्थापक शिरिष फडतरे सांगत होते.

“क्रूड ऑईलपासूनच पेट्रोल इ. बनतं तसंच प्लास्टिकही बनतं. एवढं बेसिक ज्ञान आम्हांला होतंच. मग याचं उलटं करून प्लास्टिकपासून काही इंधन बनवता येईल का यावर आम्ही विचार सुरू केला. त्याबद्दल तज्ज्ञांशी बोललो, पण असं काही होण्याच्या शक्यता त्यांनी फेटाळून लावल्या. तरीही काही जणांच्या विचारानं प्रयोग तरी करून बघू म्हणून आधी पातेल्यात प्लास्टिकचे तुकडे, पिशव्या टाकल्या तर ते पेटलं. मग विचार केला हाच प्रयोग आपण प्रेशर कुकरमध्ये करून पाहू, तिथंही ते पेटतच होतं. मग कुकरच्या शिट्टीला सोल्डरिंग करून घेतलं आणि ते पाण्यात सोडलं. जे गॅसेस होते, ते पाण्यात येताच तेलासारखे तरंगू लागले. ते वेगळं काढून त्याला काडेपेटीची काडी लावून पाहिली, तर ते पेटलं! हा अगदी बेसिक प्रयोग आमच्यासाठी ‘युरेका’ क्षण होता.”

“या प्रयोगात बऱ्याच सुधारणा करण्याची गरज होती. मग हे नीट व्यावसायिक पद्धतीने करण्यासाठी आम्ही 2009 साली रूद्रा एन्व्हायर्नमेंट सोल्युशन कंपनीची केशव- सीता ट्रस्टअंतर्गत स्थापना केली. आणि एका फॅब्रिकेटर मित्राकडून 25-30 किलोच्या प्लास्टिकवर काम करणारा एक प्लांट तयार करून घेतला. यातून शिस्तीत ऑईल अर्थात इंधन निघायला लागलं. त्यातून जो वायू येत होता, तो तसाच हवेत निघून जात होता. एनसीएलमध्ये काम कऱणाऱ्या माझ्या मामांनी मला सांगितलं की तो वायू तसाच सोडू नका, गोळा करा. तो वायू आम्ही कॉम्प्रेसरद्वारे एका टाकीत जमा केला. आणि ऑईलचे प्रॉडक्शनही वाढलं. ते आम्ही जनरेटरमध्ये वापरून पाहिलं, विजेचे दिवे त्यावर सहज सुरू झाले. अर्थात हा प्रयोग यशस्वी झाला.” फडतरे सर सांगत होते.

यानंतर त्यांनी मशीनची क्षमता वाढवली, 300 किलोच्या क्षमतेचा प्लांट जेजुरी इथं सुरू केला. शिवाय  पॉलिमर्सची साखळी तोडणारे Thermo Catalytic Depolymerization ही प्रक्रिया वापरून ऑक्सिजनचा वापर न करता अधिक चांगल्या क्षमतेचं इंधन तयार होऊ लागलं. प्लांटचा Feasibility Analysis केला, या फ्युएलचे त्यांनी पीयूसी टेस्टिंग करून घेतले. त्यातून पेट्रोल- डिझेलच्या तुलनेत अत्यंत कमी सल्फर वातावरणात सोडणारे उत्तम पर्यावरणपूरक इंधन असल्याची पावती त्यांना मिळाली. शिवाय डिझेल आणि केरोसिनच्या तुलनेत उच्च म्हणजेच सुमारे 10500 कॅलरीफिक व्हॅल्यू या इंधनाची असल्याचे त्यांना समजले. या सगळ्या गोष्टींत 2014-2016 अशी दोन वर्षं गेली. 

हे फ्युएल उत्तम दर्जाचे, पर्यावरणाची हानी न करणारे असल्याने इंडस्ट्रीमधल्या बॉयलर्स, बर्नर्स, इनसिनिरेटर आणि अगदी स्वयंपाकासाठीच्या स्टोव्हच्या बर्नरमध्ये काही बदल करून वापरता येते, हे लक्षात आलं. शिवाय या फ्युएलची प्रतिलीटर किंमत ही फक्त 45रू. आहे, जिथं डिझेलची किंमत आजच्या घडीला 110रू. प्रतिलीटर झाल्याने हे उद्योगांना अगदीच परवडणारे आहे. त्यामुळे यांनी हे फ्युएल विकायला सुरूवात केली, फक्त तेवढंच नाही तर प्लास्टिकपासून इंधन बनवणारे असे 14 प्लांटही तयार करून त्यांनी उद्योग आणि काही मनपांना विकले. त्यात पुणे महानगरपालिका आणि कल्याण- डोंबिवली मनपाने असे प्लांट विकत घेतलेले आहेत.

यासोबतच रूद्रा कंपनीने प्लास्टिकचे पार्टिकल्स रस्ते बनवण्याच्या कामात वापरता येतात, हे ही दाखवून दिलं. ज्याने रस्ते पावसाळ्याच्या काळात खड्डे न पडणारे, वारंवार दुरूस्ती न लागणारे, नेहमीच्या डांबरी रस्त्यापेक्षा तीन वर्षे जास्त टिकणारे बनतात. एवढंच नाही तर त्याचा खर्च सुद्धा प्रति चौरस किमी 35 हजारांनी कमी होतो. इंधन बनवताना जे प्लास्टिकचे पार्टिकल्स राहतात ते या रस्त्यात वापरता येतात. खडी आणि डांबर यांचे मिश्रण करताना डांबराच्या आठ टक्के प्लास्टिकचा चुरा वापरला जातो. इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे प्रमाण ठरवलेले आहे. आणि हे सगळं कागदोपत्री नाही तर प्रत्यक्षात पुण्यात असे 23 हून जास्त रस्ते रूद्रा कंपनीने मनपाच्या सहाय्याने तयार केले आहेत. अलका टॉकिजजवळच्या चौकाजवळ भागवत रस्ता हा 2018 साली बनवलेला, पहिला प्लास्टिकमिश्रीत रस्ता. जो आजही उत्तम आहे. एवढंच नाही तर कल्याण डोंबिवली मनपा, मुंबई मनपाअंतर्गतही त्यांनी काही रस्ते बनवलेले आहेत. 

या सगळ्यात केशव सीता ट्रस्टचे उल्लेखनीय काम आहे, ते हे इंधन बनवण्यासाठी थेट लोकांकडून प्लास्टिक गोळा करण्याचे. सध्या पुण्यातील 15 हजार कुटुंबांकडून मल्टि लेयर प्लास्टिक (चिप्सचे, बिस्किटे, खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटं), दुधाच्या पिशव्या, शाम्पू बाटल्या, जुनी खेळणी, प्लास्टिकची फुलं अश्या अनेक गोष्टी त्या- त्या सोसायटीत जाऊन गोळा केल्या जातात. हे गोळा करताना अन्नपदार्थांच्या पिशव्या आणि कंटेनर्स स्वच्छ धुवून, वाळवून कश्या जमा करायच्या याची माहिती स्वयंसेवक लोकांना देतात. 15 दिवसांतून एकदा थेट तुमच्या सोसायटीत केशव सीता ट्रस्टची गाडी येते आणि हे सगळं प्लास्टिक मोफत घेऊन जाते. यामुळे रस्तोरस्ती प्लास्टिकचे ढीग जमा होण्याचे प्रमाण काही अंशाने कमी झालंय, आणि प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जाण्यापासूनही काही अंशी वाचतंय. मुळात लोकांमध्ये पुनर्वापराची जाणीव रूजतीये आणि त्यापासून पुन्हा कमी प्रदूषण करणारे इंधन बनून स्वच्छ पर्यावरणाला काहीसा हातभारही लागतोय.

तुम्ही पुण्यात राहत असाल आणि तुम्हांलाही तुमच्या सोसायटीत जर प्लास्टिक गोळा करायला ही गाडी बोलवायची असेल तर संपर्क साधा- रूद्रा एन्व्हायर्नमेट सोल्युशन्स लिमिटेड, एरंडवणे, पुणे-  02025448900/ 9373053235 (रविवारी सुट्टी)

.. स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे

- स्रोत: कायप्पा :