Saturday, November 28, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग ३८,३९,४०: डॉ. कल्पना कुलकर्णी

 


भाग ३८: इंडियन स्टँडर्ड टाईम

 

मध्यंतरी मुलीच्या एका स्पर्धेला जायचा योग आला. प्रवेशिका एकदम चकाचक. सोनेरी अक्षरात वेळ, ठिकाण छापलेलं. “वेळेच्या आधी दहा मिनिटे स्थानापन्न व्हावे”. ही सूचनाही आवर्जून छापलेली. स्पर्धेचं ठिकाण घरापासून लांब होतं म्हणून मी आपली तासभर आधीच घरातून निघून वेळेआधी पाच मिनिटं तिथे पोहोचले. सगळा शुकशुकाट. खूप फिरल्यावर आवारात दोन डोकी दिसली. चौकशी केल्यावर त्यांनी आत हॉलमध्ये बसा, असं सुचवलं आणि गायब झाले. हॉलमध्ये खुर्च्या आणि आम्ही. स्पर्धेच्या आधी स्थानापन्न होण्याच्या सूचनेतील दहा मिनिटं जवळ आलेली आणि प्रवेशद्वारातून काही स्त्रिया प्रवेशल्या. “भाईर थांबा, झाडू मारायचाय”, त्यांनी फर्मावलं. छापलेल्या चकाचक सूचनेपेक्षा ही सूचना थेट अंगावर आली असल्यानं आम्ही तिचं त्वरित पालन केलं.

“स्पर्धा कधी सुरू होणार?” - बाहेर थांबलेलं असताना पुन्हा अवतीर्ण झालेल्या एका डोक्याला माझा अधीर प्रश्‍न.

“होईल अर्ध्या-पाऊण तासात”- मोघम उत्तर.

झाडझूड, स्टेजची मांडामांड, संयोजक कार्यकर्त्यांच्या एकेक एंट्रया असं सगळं होता होता अर्धा-पाऊण तास खूपच गजगतीनं सरकला आणि दिलेल्या वेळेपासून अडीचव्या तासाला स्पर्धा सुरू झाली. आम्ही आणि आमच्यासारखेच एक-दोन वेळेचे पालनकर्ते सोडले तर बाकी स्पर्धक, स्पर्धा सुरू होण्याच्या बरोबर दहाच मिनिटं आधी येऊन स्थानापन्न झाले. “इंडियन स्टँडर्ड टाईम” त्यांना कसं अचूक कळलं, याचा मी मात्र अचंबा करीत राहिले.

इतके उन्हाळे, पावसाळे पाहिल्यावर मला हे भारतीय वेळेचं गणित थोडंफार उमजू लागलंय. तरीही कित्येक सार्वजनिक कार्यक्रमांत मी आपली तासन् तास तिष्ठत बसलेली आहे. खासगीत, माझ्या मित्रमैत्रिणींची वक्तशीर आणि बेवक्तशीर अशी वर्गवारी करण्यात मात्र मी यशस्वी झाले आहे.

मध्यंतरी आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं. माझी एक मैत्रीणही येणार होती. “कितीला निघायचंय?” तिनं विचारलं. भारतीय प्रमाणवेळेची ती पक्की निष्ठावंत पाईक असल्याचं मला ठाऊक होतं. त्यामुळे मी तिला दुपारी दोनची वेळ दिली. “आई, आपल्याला चारला जायचंय, दोनला नाही”, सईनं आठवण करून दिली. तिचे “दोन” म्हणजे “चार” होतील. मी खुलासा केला आणि खरोखरच ती गजर लावल्यासारखी पावणेचारला हजर!

या घड्याळांच्या काट्यांच्या जंजाळात काही सुखद अनुभवही येतात. सईला एक क्लास लावायचा होता. त्या बाईंनी संध्याकाळी साडेपाचची वेळ दिली आणि पत्ता सांगितला. ठिकाण शोधायला वेळ लागेल म्हणून मी आधीच निघाले. नियोजित वेळेच्या दहा मिनिटं आधी पोहोचले. दाराला कुलूप पाहून वाट पाहत थांबले. पाच मिनिटांनी त्या आल्या. मला पाहून चक्रावल्या. घर शोधायचंय आणि वेळ पाळायची म्हणून मी थोडा वेळ हाताशी राखून ठेवला हे कळल्यावर खुश झाल्या. केवळ वेळ पाळली गेल्यामुळेच आमची ती मुलाखत सुरू होण्याआधीच निम्मी यशस्वी झाली.

खरोखरच, वेळ पाळण्यात तत्पर असलेली मी सकाळी उठताना मात्र पाचला उठायचं ठरवलेलं असतं; पण साडेपाच झाले तरी डोळे उघडवत नाहीत. मी आपला माझ्या परीनं सुवर्णमध्य काढलाय. मी घड्याळ अर्धा तास पुढे करून ठेवलंय. सकाळी झोपेत हे काही आठवत नाही. साडेपाच वाजलेत, असं समजून मी उठते. त्यामुळे वेळेचं पालन होतंच शिवाय भारतीय प्रमाणवेळेचंही!

 ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग ३९: आमचा पाणी-प्रश्‍न

 ऐन दिवाळीत पाण्याचा माठ बदलला. पाण्याला कोर्‍या माठाचा वास, चव तीन-चार दिवस येतच राहिली. सईनं चांगलाच असहकार पुकारला आणि ते पाणी प्यायला नकार दिला. दर वेळी पाणी चाखून ती म्हणायची, “आई, याला किल्ल्याचा वास येतो.” दिवाळीच्या सुटीतला किल्ला बांधून तयार होता आणि त्यावर धान्यही पेरलेलं होतं. किल्ल्यावर पाणी शिंपडलं की, येणारा तो मातीचा घमघमाट आणि कोर्‍या माठाच्या मातीचा वास एकत्र होऊन आमच्या नव्या माठातलं पाणी “किल्ल्याच्या वासा”चं बनलं होतं. चार-पाच दिवसांत ती मातीची चव गेली, किल्लाही जमीनदोस्त झाला आणि आमचा हा गहन पाणीप्रश्‍न संपला.

आताचा हा प्रश्‍न सुटला असला, तरी वेगळा कुठला तरी प्रश्‍न अधूनमधून डोकं वर काढतच असतो आणि कृष्णा-कावेरी व इतर सर्व नद्यांच्या पाणी-प्रश्‍नाइतकाच दर वेळी मला तो सतावतही असतो.

“बारा गावचं पाणी प्यायलेला” ही उपाधी महानच आहे. पाण्याच्या चवीत जरा बदल झाला, तरी आमचा जीव कासावीस होतो, तहान भागत नाही, तर बारा चवीच्या पाण्याची सवय करायची?

प्रत्येक गावाच्या पाण्याच्या चवीत फरक असतोच; पण आपापल्या गावीसुद्धा नेहमीच्याच नळातून येणार्‍या पाण्याची चव बदलत राहते. पावसाळ्यात क्लोरिनचा डोस खूप वाढवून पाणी कडवट बनतं. गढूळ पाण्यात तुरटी फिरवली जाते आणि त्या पाण्याच्या घोटानं तोंडच तुरट होतं. पाणी उकळून प्यायलं, तर अतिशय मचूळ लागतं. उन्हाळ्यात वेगळ्याच चवदार प्रश्‍नांना तोंड द्यावं लागतं. फ्रीजमध्ये स्टीलच्या भांड्यात गार केलेलं पाणी अगदीच बेचव लागतं. माठांमध्ये वाळा, मोगरा, खस असे सुवासिक पदार्थ डुबकी मारतात आणि ते सुगंधित पाणी माझ्या घशाखाली उतरत नाही.

“दृष्टिआड सृष्टी” या नियमानुसार बंद नळातून येणार्‍या पाण्यावर आमची भिस्त असते. बाहेर कुठे ट्रेकिंग-ट्रीपला गेल्यावर विहिरी, तळी, नदी नाल्यातलं पाणी प्यायला आमचा जीव घाबरतो. त्यातल्या त्यात “मेडिक्लोर” सारख्या बाटल्या मनाला जरा दिलासा देतात. खरं तर आता तो जमानाही गेलाय. पाण्याच्या सीलबंद बाटल्या जवळ बाळगायच्या. सील फोडून रिकाम्या करायच्या आणि ट्रीपच्या ठिकाणी आपली खूण म्हणून आवर्जून तिथेच टाकून यायच्या, अशी सध्याची फॅशन आहे. मात्र आजही काही “ओल्ड फॅशन्ड” लोक “डिस्पोजेबल” बाटल्या न वापरता, मोठ्या “वॉटरबॅग्ज” वापरतात. अगदीच फिरकीचा तांब्या नेत नाहीत!  घरचं पाणी नेतात आणि घरी परतेपर्यंत तेच पितात.

माझी मैत्रीण पुण्याहून महाबळेश्‍वरला जाताना ट्रीपभर पुरेल एवढं पाणी दरवेळी नेते. या बाबतीत तिच्यावरही मात करणार्‍या एका जेष्ठ नागरिकांविषयी मला माहिती मिळाली. ते कामानिमित्त चार-पाच दिवस मॉस्कोला गेले, तर पुण्याचं घरचं पाणी वॉटरबॅगमधून घेऊन गेले.

आम्हाला पाण्याचं कुठलंही दुर्भिक्ष नसताना, घरी-दारी, प्रवासात कुठला तरी पाणी-प्रश्‍न डोकं वर काढतोच आणि तहानेनं जीव व्याकूळ करतो. जे रोजच्या रोज पाणीटंचाईला तोंड देताहेत, त्यांच्या पाणी-प्रश्‍नाचं काय, याचा विचार आम्ही आमचे अवघड (?) प्रश्‍न सोडवताना अधूनमधून तरी करायलाच हवा.

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग ४०: चैनीचा हिमालय ट्रेक

 इतिहासाचा अभ्यास करताना कोलंबस-सिंदबाद यांच्या धाडसी सफरी वाचून अगदीच जग जिंकल्याचा नाही तरी पूर्ण जग फिरून बघण्याचा कल्पनाविलास करत  करतच मी मोठी झाले. खरं तर इंग्लंड, स्पेन, पोर्तुगीज साम्राज्यांच्या कोलंबस, ड्रेक, मॅगेलीनसारख्या खलाशांनी सगळ जग शोधून ठेवल्यामुळे माझ्यासारख्यांसाठी काहीही शोधायचं बाकी राहिलं नाही. “पृथ्वी गोल आहेे” सारखे गहन शोधही आधीच लागून गेल्यामुळे तशा जिज्ञासेपोटी फिरण्याचीही संधी माझ्यासारख्यांना राहिली नाही. त्यामुळे बिनाउद्देशाने फिरणं एवढंच हातात राहिलं. यालाच “पर्यटन” असं गोंडस नाव मिळालं. माझ्यासारख्या पर्यटनवाद्यांची संख्या दिवसेंदिवस इतकी वाढली, की लोक सतत फक्त फिरायला जायचंच काम करतात की काय, अशी शंका यावी. पृथ्वीचे कानेकोपरे धुंडाळून झाल्यानं, जग खूपच जवळ आल्यानं चंद्रावरच्या सफरीसुद्धा सुरू झाल्या.

आम्ही चंद्र-सूर्यापर्यंत काही पोहोचू शकत नसल्याने “भारत माझा देश आहे” याची आठवण ठेवत आम्ही किमान भारतभर तरी पर्यटन करीत फिरतच असतो. अर्थात वेळ, पैसा, सोय यानुसार भारतात कुठे फिरायचं हे ठरत असतं. जुन्या इंग्लंड, स्पेन, पोर्तुगीज साम्राज्यांच्या तोडीस तोड आजकालच्या पर्यटन संस्थांची साम्राज्यं! त्या पूर्वीच्या साम्राज्यांना राज्याची, प्रजेची बाकीची कामं तरी असायची. सागरी सफरींना फक्त अर्थपुरवठा करण्याची  त्यांची जबाबदारी असायची. आमच्या पर्यटन संस्थांची साम्राज्यंच मुळी फक्त “फिरण्या”वर उभारलेली असतात, त्यामुळे त्यांच्या खलाशांच्या (पर्यटकांच्या) सगळ्या व्यवस्थेची जबाबदारी ते घेतात. इथे पर्यटकांनी फक्त अर्थपुरवठ्याची जबाबदारी घ्यायची असते. एकदा पैसा दिला, की सगळ्या सोयी होतात आणि सगळ्या धाडसी सफरी अगदी पंचतारांकित होऊन जातात. सिंदबादने धाडसी सफरी केल्या म्हणून त्याला अतोनात पैसा मिळाला. आमच्याकडे पैसा असतो आणि तो आम्ही अतोनात (?) खर्च करू शकतो, म्हणून आम्ही धाडसी सफरी करतो. इतिहासातल्या विविध सफरींमधून वेगवेगळे देश त्या त्या साम्राज्यांच्या अधिपत्त्याखाली गेले. आमच्या पर्यटन संस्थांनी हिमालयासारख्या पर्वतराजापासून अंटार्क्टिकासारख्या हिमखंडांनाच अंकित केलंय.

हिमालयात ट्रेकिंग ही आजकालची फॅशनच आहे. खरं सांगायचं तर मीही या फॅशन -फॅडमध्ये मागे नाहीच. आजपर्यंत मराठी कणखरतेने शिवरायांचे सगळे गडकिल्ले, उन्हा-पावसाची तमा न बाळगता पायी हिंडून फिरून पालथे घातलेल्या मला या हिमालयातल्या वातानुकूलित सहलींचा मोह पडलेला आहे. मुंबई-पुण्यापासून ए.सी. रेल्वेने प्रवास करून दिल्ली, पुढे ए.सी.(च) बसनं मनाली, नैनिताल अशी थंड हवेची ठिकाणं आणि तिथून पुढे हिमालयातल्या त्या वेगवेगळ्या शिखरांकडे कूच! राहायची-खायची सगळी चोख व्यवस्था, फक्त स्वत:चं सामान आणि कॅमेरा घेऊन जायचं. सामानसुद्धा स्वत: वाहायची गरज नाही. त्यासाठी “पोर्टर” मिळतोच. (मी तर कित्येकांना “स्वत:लाही” खेचरावरून  वाहून नेताना बघितलंय) जेवणखाण्यात सुद्धा किती मज्जा ! दररोज वेगवेगळे पदार्थ मिळतात. (“घरी तरी रोज पोळी-भाजीच खावी लागते”, असं माझ्या मुलीचं अमूल्य मत आहे.) तरीही या ट्रेकिंगदरम्यानच्या ठरवलेल्या, नेमलेल्या जेवणाचा कंटाळा आलाच, तर अधूनमधून लागणार्‍या टपर्‍यांमध्ये ऑम्लेट, मॅगी, पहाडी चाय आणि बर्फाची गरज नसलेली शीतपेये मिळतातच. बारा-चौदा हजार फूट उंचीपर्यंत सगळीकडे मॅगी मिळताना बघून, मॅगीचा आसेतू हिमाचल संचार जाणवून “मॅगी” हे भारताचे राष्ट्रीय खाद्य आहे, असं लवकरच जाहीर होईल, असं मला वाटतं. थम्सअप आणि कोकाकोलाने तर त्या मिट्ट गोड “पहाडी चाय” लाही मागे टाकून हिमालयातली सगळीच शिखरं काबीज केलीयत हे नक्की!

या सगळ्या चैनीमुळे उन्हाळी सुटीत मुलांना  हिमालयात ट्रेकिंगला पाठवणं आता सरावाचं झालंय. मीही माझ्या सईला घेऊन गेलेच ना! हे असं सगळं सोपं वाटत असलं, तरीही कित्येक मुलांना हे फाईव्ह स्टार ट्रेकसुद्धा झेपत नाहीत. कितीही सोई-सुविधा मिळाल्या, तरी रोज किमान दहा-वीस किलोमीटर तरी आपलं आपल्यालाच चालावं लागणार आहे, हे बहुतेक या अशा मुलांना उमजलेलंच नसतं. रोजच्या आयुष्यात कधी पाचशे मीटरसुद्धा चालायची सवय नसताना ते थेट हिमालयात डेरेदाखल होतात आणि मग हात-पाय गाळतात. विशी-बाविशीची मुलं तीन-चार किलोमीटरमध्येच ढेपाळतात आणि दहा वर्षांची सई मात्र आमच्या सगळ्यांच्या बरोबरीने चार-पाच तासांत तो ठरलेला टप्पा हसतखेळत पार करते. हा विरोधाभास अशा वेळी “सईची आई” म्हणून मला भूषणावह वाटतो. वेगवेगळं जेवण रोज समोर येत असतं, तरी ते तेव्हाच जे आहे तेच स्वत:च्या हातानं वाढून घेऊन जेवणं, त्यानंतर स्वत:ची ताट-वाटी गारढोण पाण्यानं स्वत: धुणं, हेही आमच्या मुलांना संकट वाटतं. आमच्या “हिमालया इको ड्राईव्ह” थीम असलेल्या ट्रेकमध्ये एका मुलानं डझनाच्या हिशेबानं डिस्पोझेबल प्लास्टिकच्या प्लेटस् आणून आणि त्या प्रवासभर भिरकावून द्यायचं ठरवून आमच्या थीमला अगदी मोडीत काढलं होतं.

हे असं काहीही आणि कितीही उथळ वागणं असलं, तरीही हिमालयातली अथांग शिखरे, उंच उंच वृक्ष, खळाळत्या-उसळत्या नद्या, बहुतेक रोजच संध्याकाळी कोसळणारा पाऊस, मध्येच अनुभवायला मिळणारा हिमवर्षाव आणि ते नियोजित हिमशिखर गाठल्यावर होणारा आनंद अतुलनीय आहे, त्याबरोबरच हिमालयाकडे पुन:पुन्हा खेचण्यासाठी पुरेसा आहे. म्हणूनच दर उन्हाळ्यात खिशाला चाट देऊन, खांद्याला सॅक अडकवून आलिशान हिमालय ट्रेकसाठी सुसज्ज होण्याचा माझा आणि सईचा उत्साह कायमस्वरूपी आहे.


ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

Saturday, November 21, 2020

बाई..... “माणूस” म्हणून: भाग ३५,३६,३७: डॉ. कल्पना कुलकर्णी

 

 भाग ३५: आठवण

 

हल्लीच्या घरांना “लॅच” नावाचं जास्त सुरक्षा देणारं जे कुलूप असतं त्याची मला खूप दहशत आहे. “आई दारात, बाळ घरात, वारा जोरात” असा घटनाक्रम घडतो आणि हे लॅच हमखास लागून जातं. किल्ली कधी कमरेला नसतेच, मग तो हलकल्लोळ! प्रत्येकाच्या ओळखीत कधी ना कधी अशा गोष्टी घडलेल्या असतातच. मी अशा गोष्टी ऐकून धडा शिकले. आमच्या लॅचची जास्तीची किल्ली अडीअडचणीच्या वेळी मिळावी म्हणून शेजारी आजींकडे ठेवून दिली. एक दिवस माझी रोजची किल्ली हरवली म्हणून या ठेवणीतल्या किल्लीची मला आठवण झाली. आजीकडे किल्ली घ्यायला गेले तर आम्हाला कुणालाच किल्ली लवकर सापडेना. हरवायला नको म्हणून ती खूप व्यवस्थित कुठेतरी ठेवलेली होती. त्या दिवसानंतर आम्ही सगळ्यांनी ते “व्यवस्थित ठिकाण” नीट लक्षात ठेवलंय.

“तरी तू जागा चुकलासी” असा अनुभव खूपदा येतो. मागे एकदा माझं एम.डी.च्या डिग्रीचं मोठ्ठं भेंडोळं सापडेना. सगळ्या फाईल्स, कपाटं, बॅगा दहा वेळा उचकून झालं. शेवटी कंटाळून युनिव्हर्सिटीतून डुप्लिकेट आणायचं ठरवलं. मध्ये काही दिवस गेले आणि सहज म्हणून व्ही.सी.आर. मधील कॅसेट बदलायला गेले तर सगळी मोठ्या आकाराची सर्टिफिकेटस् चुरगाळू नयेत म्हणून व्ही.सी.आर. खाली नीट रांगेत पसरून ठेवलेली दिसली. त्या दिवशी कॅसेट बदलायला म्हणून व्ही.सी.आर. चा खण मी उघडला नसता आणि त्या सर्टिफिकेटस्वर माझी नजर पडली नसती, तर बहुधा डुप्लिकेट सर्टिफिकेट मिळविण्याचा सगळा सोपस्कार मी केला असता. खरं तर त्या आधीही किती वेळा तरी मी तो खण उघडला होता; पण तेथे व्ही.सी.आर. व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे माझ्या डोळ्यांना आणि मेंदूला कधी जाणवलंच नव्हतं.

अशा गोष्टी घडू नयेत म्हणून महत्त्वाच्या गोष्टी कुठे आहेत याच्या नोंदी डायरीत वगैरे करून ठेवाव्यात अशी एक बहुमूल्य सूचना मला मध्यंतरी मिळाली; पण कोणती गोष्ट कधी लागेल आणि किती महत्त्वाची हे कसं ठरवायचं आणि शिवाय ती नोंदी केलेली डायरी कुठे ठेवली ते कुठे नोंदवायचं?

हे फक्त वस्तुंबाबतच होतं असं नाही. कधी कधी एखाद्या कुठल्या घटनेनं आपण आपल्या मनातल्या कुठल्या आठवणी, कुठल्या व्यक्ती, कुठल्या ओळी कधी धुंडाळायला लागतो ते कळतच नाही. जोपर्यंत ते हरवलेलं सापडत नाही, तोपर्यंत दिवस-रात्र मनात एकच चलबिचल असते. अस्वस्थता अगदी शिगेला पोहोचते. आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन सापडलं, सापडलं म्हणता निसटलेले हेलकावे वाढत जातात आणि ध्यानीमनी नसता “आज अचानक गाठ पडे...” स्थिती येते. जणू आठवणींनी शिणलेल्या मनावर हळुवार फुंकर!


ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )



भाग  ३६:सवय

 

“माणूस सवयीचा गुलाम आहे” हे वाक्य मी नेहमीच ऐकत आलीये. एखादा शब्द, एखादं वाक्य नकळत मनात धरून ठेवायचं आणि मग दिवसभर तेच विचार...ही माझी एक जुनी सवय. त्यानुसार आज मी “सवयी”लाच चिकटून बसलीये.

आपल्याला बहुतेक सर्वांनाच चहाची सवय असते. “सकाळी उठल्या उठल्या चहा हवाच”, हे वाक्य आपण कितीदा ऐकतो. या सकाळच्या चहापायी एकदा आम्ही एका नवख्या गावात उठल्या-उठल्या हातात दुधासाठी भांडं घेऊन गोठा गाठला होता; कारण तिथे तयार चहा मिळणं शक्य नव्हतं आणि चहा तर हवाच होता. त्यामुळे गोठ्यातून दूध आणण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. (मिल्क पावडर वगैरे तेव्हा खूप बोकाळलं नव्हतं.) तेव्हा तो गोठा शोधत फिरताना अगदी वाटलं होतं, अजिबात अशी चहाची सवय नसावी, पण...! बरं, तो चहा तरी सगळ्यांना एकसारखा कुठे चालतो? कुणाला अगदी भरपूर दुधाचा, मसाल्याचा आटवलेला अमृततुल्य चहा हवा तर कुणाला अगदी पाणीदार “लाईट” चहा हवा. पुन्हा बिनदुधाचा, लिंबू पिळलेला...असे प्रकार आहेतच.

आम्ही जैसेलमेरच्या वाळवंटात सूर्यास्त पाहायला गेलो होतो. तिथे चहाची तलफ आली म्हणून त्या उंटांच्या गराड्यात चहा प्यायलो तो अवर्णनीय होता. ती चव तिथल्या खारट पाण्यामुळे की सांडणीच्या दुधामुळे (तिथे तेच दूध मिळतं असा आमचा समज) ते देव जाणे! पण त्यानंतर काही महिने तरी माझी चहाची सवय मोडली होती. या चहापुराणावरून आठवलं. आमची गोल्डी (कुत्री) जेव्हा आणली तेव्हा ते छोटं पिलू होतं. ज्यांच्याकडून आणली त्या बाईंना विचारलं की तिच्या काही खास सवयी आहेत का? त्यांनी सांगितलं की दुपारी चार वाजता तिला कॉफी लागतेच बघा. तिची कॉफीची सवय मी मोडायची ठरवली. ती मोडताना मी तिला संध्याकाळच्या पाचच्या चॉकलेटची सवय लावून बसले.

रेडिओ ऐकत काम करण्याची माझी जुनी सवय. एखाद्या दिवशी रेडिओ बंद पडला तर (प्रायोजक - विद्युत महामंडळ, सबब-भारनियमन) सगळ्या कामावर पाणी! वेळापत्रक चुकलंच म्हणून समजा. दुपारी फक्त पाच मिनिटं डोळा लागण्याची अशीच एक घातक सवय. “त्या”च पाच मिनिटांच्या दरम्यान एखाद्या महत्त्वाच्या मिटिंगमध्ये वगैरे असले की डोळे उघडे ठेवताना कसे नाकीनऊ येतात म्हणून सांगू?

बोलताना काही विशिष्ट शब्दांच्या काहींना सवयी असतात. आमचे एक सर दर वाक्यात “बरं का” म्हणायचे. त्यांच्या शिकविण्याकडे दुर्लक्ष होऊन, सर “बरं का” किती वेळा म्हणतात हे मोजण्याची सवय आम्हाला कधी आणि कशी लागली हे कळलंच नाही.

अशा आपल्याला असणार्‍या सवयीशिवाय काही गोष्टी, काही माणसं आपल्या सवयीची होऊन गेलेली असतात. बागेच्या कुंपणावर पसरलेली जाईची वेल रोजच्या सवयीची. मध्यंतरी वेल छाटली. सवयीचं हिरवंगार कुंपण ओकंबोकं दिसू लागलं. त्या बिनवेलीच्या कुंपणाची सवय व्हायला मला कितीतरी दिवस लागले. वटवृक्षांच्या सोबतीचा सिंहगड रस्ता सवयीचा होता. मध्यंतरी रस्ता रुंदीकरणाच्या निमित्तानं ती सगळी झाडं तोडली गेली. हल्ली त्या रस्त्यानं जाताना बिनओळखीचीच भावना असते.

थोडक्यात सवय कशाचीही असू शकते. चांगली अथवा वाईट सवय हेही सापेक्षच असतं. “सवय” आणि “व्यसन” यातील सीमारेषाही अतिशय पुसट असतात. याचनुसार “वाचन” आणि “व्यायामा”सारख्या सवयींच्या अतिसेवनामुळे या बाबतीत सवयींची सीमा ओलांडून मी व्यसनग्रस्त ठरते. या दोन्ही सवयी आजूबाजूच्या सगळ्यांना लावण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असते. आता माझ्या जहाल प्रयत्नांची सवय झालेले आजूबाजूचे सगळेच माझ्यापासून पळ काढत असतात. निदान “व्यायामा”ला तरी ते “सवयी”तून “व्यसना”त ढकलू इच्छित नाहीत.


ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग  ३७: क्रॉस कनेक्शन

 

माझं आणि मैत्रिणीचं फोनवरचं संभाषण अगदी रंगात आलेलं होतं. मध्येच जाडा-भरडा आवाज ऐकू आला. “कापसाच्या किती पेंड्या पोहोचल्या?” मी दचकलेच. आम्ही नक्कीच कापसाबद्दल बोलत नव्हतो. आमचं संभाषण बाजूला पडलं आणि त्यानंतर कापसाच्या बाजारभावापासून पेंड्या उतरवून घ्यायच्या व्यवस्थेपर्यंतच सगळं संभाषण आम्ही यथासांग ऐकलं. टेलिफोनच्या क्रॉस कनेक्शनमुळे! बहुतेक वेळा वैताग देणारं हे क्रॉस कनेक्शन कधीकधी खूप करमणूकप्रधान ठरू शकतं.

आपल्या स्वत:च्या मनात खूप क्रॉस कनेक्शन्स दडलेली असतात. कधीतरी अचानक ती समोर येतात आणि आपण किती असंबद्ध संबंध लावलेत हे जाणवतं.

सुधीर फडके गेले तेव्हाच्या त्या दु:खाच्या उमाळ्यात मला आमच्या सरांचे सासरे (ज्यांना मी ओळखतही नाही) आठवले. क्रॉस कनेक्शन कसं, तर आजोबांना सुधीर फडकेंचा “वीर सावरकर” सिनेमा पाहायचा होता. आजोबांना वयोमानानुसार कमी ऐकू येतं. त्यामुळे सिनेमातले संवाद त्यांना कसे समजणार याची चर्चा मी आणि सरांनी सिनेमा लागल्या लागल्या केली होती.

आम्हाला बारावीत फिजिक्समध्ये र्डेीपव (ध्वनी) चा धडा शिकवायला सुरुवात करताना आमचे सर आधी आम्हाला देवआनंद-साधनाच्या “हम दोनों”मधल्या “अभी ना जाओ छोडकर...” या गाण्याचं लायटरच्या म्युझिकसकटचं पूर्ण दृश्य सांगून हिरो कसा पाण्यात दगड टाकतो, मग कसे पाण्यात दूरवर तरंग उठत जातात, असं सविस्तर सांगायचे आणि मग त्या श्राव्य चित्राची सांगता करून म्हणायचे, र्डेीपव ुर्रींशी त्या पाण्यातल्या तरंगाप्रमाणेच असतात. हे भन्नाट क्रॉस कनेक्शन माझ्या लेखी आयुष्यभरासाठी पक्वं आहे. (आता र्डेीपव चे प्रॉब्लेम मात्र पूर्ण विसरलेत.)

माझ्या मेडिकलचा सगळा अभ्यास मी गाणी ऐकत करायचे. वाचत असलेल्या पुस्तकातल्या पानावर काही ओळी किंवा कधी कधी पूर्ण गाणं लिहायचे. अजूनही जेव्हा कधी त्या पुस्तकांमधलं काही आठवायची वेळ येते तेव्हा त्या अमूकअमूक गाणं लिहिलेल्या पानावर ही माहिती आहे, अशी “द्राविडी प्राणायाम”आठवण येते.

मध्यंतरी मी ब्रेन ट्युमर शिकवताना मुलांसमोर अमिताभच्या “मजबूर”ची आठवण काढता काढता त्याला ब्रेन ट्युमरमुळे चक्कर येऊन त्याच्या हातातला फिश टँक पडून फुटतो या फ्रेमवर थांबले. फिश टँक आणि ब्रेन ट्युमर हे क्रॉस कनेक्शन मी मुलांच्या मनावर नकळत ीींरपीलीळिीं तर नव्हते करत?

परवा चहा पिताना कधी नव्हे ती आमची अमावस्या-पौर्णिमेची चर्चा चाललेली आणि अचानक मला माझा बालमित्र प्रभव आठवला. हे कुठलं क्रॉस कनेक्शन? आठवणी धुंडाळल्या आणि, साखळी जुळली - “प्रभव-पौर्णिमा चहा” आमच्या लहानपणी मुलांनी चहा पिणं महापाप समजलं जायचं; पण आम्हा प्रत्येकाला त्याचा मोह तर व्हायचाच. एकदा आम्ही खेळत असताना माझ्या आईनं प्रभवला विचारलं. “चहा घेतोस का तू?” त्यावर विचार करून (?) तो बालजीव उत्तरला, “नेहमी नाही घेत. फक्त पौर्णिमेलाच घेतो. आज पौर्णिमा आहे.” तेव्हा शाळेत नुकत्याच शिकलेल्या तिथींच्या ज्ञानाचा इतका व्यवहार्य उपयोग. एक कप चहासाठी चंद्र वेठीला धरला गेला होता.

तर थोडक्यात “त्या” आम्हा दोघी मैत्रिणींच्या फोनमधल्या क्रॉसकनेक्शननं माझ्या मनातल्या किती तारा जुळल्या. कापसाच्या पेंढ्यांची खरखर ऐकून वैतागलेलं मन कसं रेशमाच्या लडीसारखं मऊसूत झालं.


ऑडिओ लिंक :
 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

Thursday, November 12, 2020

माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक ३, ४: जयसिंग सोलंकी , जी. रामास्वामी : श्री. बलबीर अधिकारी

 


जयसिंग सोलंकी


   तुर्भे खत कारखाना 1965 साली सुरू झाला. त्या दरम्यान वेगवेगळ्या पदांवर रूजू झालेल्या मंडळीने आता आपला सेवाकाळ संपवला आहे. या प्रदीर्घ काळात ज्यांचा विविध अंगानी विकास झाला त्यात जयसिंग सोलंकी यांचे नाव पहिल्या काही नावात येऊ शकेल.

   आम्ही एकत्र यायला चेंबूरचे यूथ कौन्सिल प्रामुख्याने कारणीभूत ठरले. या युवा संस्थेत अशोक वैद्य, सदाशिव कोळी, अनंत कुलकर्णी मी यांच्याबरोबर सोलंकी यांचा वाटाही महत्त्वाचा होता. संस्था नोंदणी करणार्या सात जणात तेही होते. शिवाय अनेक वर्षे त्यांनी संस्थेचे हिशेब सांभाळले संस्थेचे व्यवहार सुरळीत राहावेत यादृष्टीने आग्रह धरला. झालेल्या प्रत्येक प्रकल्पावर जेव्हा चर्चा होई त्यात ते अनेक ठिकाणी काटकसर सुचवीत. ठरलेल्या रकमा रीतसर वेळेवर देत आणि हिशेबही मागत. वेळप्रसंगी वाद होई. पण या सर्वांचा परिणाम चांगला होऊन संस्थेचे बाळसे वाढे विश्वासार्हता कायम राही. आज आम्ही स्थापन केलेली संस्था 43 वर्षांची झाली आहे, त्याचे श्रेय इतर कार्यशील जागृत कार्यकर्त्यांप्रमाणे सोलंकी यांचेही आहे. त्यांचे थोडे अधिक एवढ्यासाठी की, ते अगदी सुरूवातीपासून होते त्यांच्या सचोटीमुळे संस्थेला अनुभव मिळायला कार्यक्षेत्र विस्तारायला अवधी प्राप्त झाला. अन्यथा इतर अनेक नामशेष झालेल्या संस्थांसारखी आमचीही गत होऊ शकली असती.

   सोलंकींनाही वाचनाची भरपूर आवड आहे. प्रथितयश, प्रगत नवे करून दाखवणार्या साहित्यिकांची अनेक पुस्तके त्यांनी हाताळली आहेत. स्मरण चांगले असल्यामुळे ते गप्पांच्या ओघात अथवा व्यासपीठावर, वाचलेले सहज उद्धृत करून श्रोत्यांना खूष करू सोडतात. वक्तृत्वाचे लेणेही त्यांच्या अंगावर आहेच. भरपूर माहिती, स्पष्ट वाणी अंतरंगातील कळकळ यामुळे सोलंकी खासगीत वा जाहीर कुठेही बोलले तरी लोभस वाटतात. आमच्या संस्थेत जे साहित्यिक येऊन गेले त्यात .पु., व्यंकटेश माडगुळकर, .मा.मिरासदार, शंकर पाटील, शन्ना, विं.दा.करंदीकर, मंगेश पाडगांवकर नारायण सुर्वे . यांचा समावेश होता. त्या सार्यांशी गप्पा मारतांना त्यांची कळी खुले. सार्थकतेचा आभास आम्हाला प्रतीत होई. साहित्यिकांनाही खरा रसिक भेटल्यासारखे वाटे. आमचे कार्यक्रम छान होत. अशोक वैद्य सोलंकी यांच्या कामावर अशावेळी आम्ही फार खूष होत असू आणि तो आनंद आमच्या अनेक चाहत्यांनाही अनेक दिवस पुरे.

   1971 साली झालेल्या बांगला देश युद्धाच्या वेळी नागरी संरक्षण हा महत्त्वाचा विषय होता. गरजही मोठी होती. आमचा कारखाना रिफायनरी शेजारी अणुशक्ती केंद्राच्या टापूत आहे. त्यामुळे औद्योगिक नागरी सुरक्षा हा स्वतंत्र विभाग होता. नागरिकांना विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करावयाचे होते. आमच्या संस्थेने यात उतरून जबाबदारी स्वीकारली. प्रथम आमचे लोक प्रशिक्षित केले इतरांसाठी प्रशिक्षण सुरू केले. या प्रशिक्षणाची जबाबदारी आमच्याबरोबर राहून सोलंकीनी उत्कृष्टपणे पार पाडली दोन महिन्यात 10,000 ची वस्ती 34 शाळातील जवळजवळ 20 हजार विद्यार्थी या कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षित झाले. खत कारखान्याचे व्यवस्थापन कर्मचारी तसेच विविध संस्था यांनी यूथ कौन्सिलची प्रशंसा केली.

   पुढे कंपनीतील अधिकार्यांच्या संघटनेकडे सोलंकी ओढले गेले. तसेच स्थानीय लोकाधिकार समितीचे कामही ते पाहू लागले. पण मूळचा यूथ कौन्सिलचा पॅटर्न त्यांची सतत साथ करीत राहिला त्याच्या नेरूळ, वाशी, अलिबाग या शाखांनाही त्याचा लाभ होत राहिला.

   परफेक्शन (परिपूर्णता) हा त्यांचा नेहमीचा ध्यास राहिला आहे. रस्त्यावरचा प्रकल्प असो, हिशेब असोत, साहित्यचर्चा असो वा व्यावसायिक सुरक्षा व्यवस्थापन असो, सोलंकींनी आपल्या अभ्यासू वृत्तीने अनेक ठिकाणी छाप पाडली आहे. आज ते औद्योगिक सुरक्षा स्वास्थ्य या विषयाचे जाणकार मानले जातात. कारखान्यांतील धोक्याच्या, प्रसंगी परस्परांना मदत देण्यासाठी असलेल्या योजनेचे ते सभासद आहेत, तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनेही त्यांना नावाजलेले आहे.

   आज आम्ही  कधीमधी भेटतो. पूर्वीसारखे व्यवसायिक अनुभव कार्य यासंबंधी चर्चा करायला जमत नाही. तथापि कधी कधी साहचर्याऐवजी दुरून कानी येणारे नाद त्याचे अंतरंगात उठणारे पडसाद यांनीच भावजीवनाच्या सीमा ठरतात. आमच्या कानावर नाद येतात ते सोलंकी आपल्या कामात गर्क असल्याचे. ते जे करीत असतील त्यामुळे चार गरजूंचे भलेच होईल असा विश्वास वाटण्याइतके सोलंकी बसलेले पारडे नक्कीच जड आहे.

vvv


जी. रामास्वामी


   घरीच कांजी केलेले आणि चोपून इस्त्री फिरवलेले कपडे, केसांचा उलटा भांग सेंच्युरी रेयॉनमधील अनुभवाने आत्मविश्वास आलेला चेहरा असलेला रामास्वामी प्रथम मला भेटला तो तुर्भे खत कारखाना सुरू व्हायच्या आधी झालेल्या प्रचालक भरतीच्या गर्दीत. आमच्या निवडीचा निकष मुख्यत: मराठी भाषिक असा होता; परंतु सिंद्रीमध्ये प्रशिक्षित झालेले 100 उमेदवार नांगल, गोरखपूर कोटा येथील खत कारखान्यातून आलेले विविधभाषी कर्मचारी . मुळे आमचा कारखाना म्हणजे बहुभाषी बहुप्रांतियांचे संमेलनच होते. त्यात सान्निध्य, स्वभाव सेक्शनवार विभागणी यामुळे त्यातही गट, उपगट असत. एकमेकांत मिसळण्याची त्यातून काम उभे करण्याची गरज सर्वांनाच असे. कारखाना अद्याप सुरू व्हायचा होता. विविध विभागातील पंप्स, कॉम्प्रेसर्स, व्हेसल्स, लेव्हल टेंपरेचरची मीटर्स त्यांना कंट्रोल करणारे व्हॉल्व त्यांचे कंट्रोल रूममध्ये गेलेले इम्पल्स नियंत्रण, वायू द्रव वाहून नेणार्या पाईपलाईन्स त्यावर असणारे आयसोलेशन व्हॉल्व . ची जाण माहिती यांचा अभ्यास सुरूवातीस आवश्यक होता. तो करण्याचा कामचुकार प्रयत्न अनेक जण करीत. परंतु रामास्वामी सच्चा होता. कुणी नसले तरी तो आपल्या अभ्यासात गर्क असे.

   मलाही या अभ्यासाची गरज होती. कॉलेजमधून बाहेर आल्यावर शिकवण्यासाठी काही काळ घालवल्यावर तरी जड उद्योगात मी प्रथमच आलो होतो. उत्पादन क्षेत्र नवीन होते त्यातही हा कारखाना मोठा होता. अभियांत्रिकी तपशील खूपच होते. त्यांच्याशी ओळख असणे हे कामातील सफाई सुरक्षितता या दोन्ही दृष्टींनी आवश्यक होते. थोडी भीतीही वाटत होती. हैड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर डाय ऑक्साइड, कार्बन मोनो डाय ऑक्साईड, हैड्रोजन सल्फाईड या विषारी स्फोटक वायूंची संगत होती. त्यामुळे मीही अशा सवंगड्याच्या शोधात होतो की ज्याला थोडे अधिक कळते; तो बेपर्वाई करीत नाही तोरा मिरवीत नाही. रामस्वामी असाच शांत, सोज्वळ सहकार्यांना सांभाळून घेणारा होता. त्यामुळे मी त्याच्याशी दोस्ती वाढवली. त्याच्याबरोबर फिरू लागलो. नवीन शब्द संज्ञा शिकू लागलो. फ्लो शीट, इंजिनीअरिंग ड्रॉईंग वाचू लागलो. अमोनिया सयंत्र कार्यान्वित व्हायच्या अगोदर रामास्वामीने मला प्रचालक पदाला लायक बनवले ते या प्रशिक्षणातून माझी तयारी पूर्ण करूनच !

   एकाच गटात असल्यामुळे आम्ही घरीही भेटत असू. घर म्हणजे वसाहतीत कंपनीतर्फे मिळालेले ब्लॉक्स. रामास्वामीचे घर नीटनेटके असे. चादरी स्वच्छ स्वयंपाकाची भांडी लख्ख असत. पंख्यावर धूळ नसे. रोज स्वयंपाक करी. कधी मलाही सांबार-भात खाऊ घाली.

   रामास्वामी एकटा राहायचा. सारे स्वत: करायचा. पगारातून दर महिन्याला मनीऑर्डर करून घरी पैसे पाठवण्याच्या माझ्या सवयीला त्याने बळकटी आणली. स्वावलंबी काटकसर यांचे त्याचे वळण चांगले होते. वक्तशीर असलेला रामास्वामी कामावर वेळेच्या आत उपस्थित असे. या त्याच्या सार्या गोष्टी मला भावत. परदेशी राहायचे म्हटले तर "स्वयमेव मृगेंद्रता" हवी असते. ती त्याच्याकडे होती. त्यामुळे तो मला आवडे. संधी मिळाल्यावरही तो आपले काम इतरांना कधी सांगत नसे. नियमित आयुष्य जगणे संयमन करणे त्याला सवयीमुळे जमत असावे.

   काळ कंठण्यासाठी अशीच माणसे उपयोगी पडतात. त्यांच्या जीवनक्रमाकडे उघड्या डोळ्यांनी पाहिले की एकटे जगायची वेळ आली तरी अशा सवयी तुमचे मोठे काम करतात. मन विचलित होऊन बहकणे होत नाही. एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन स्वत:ची आबाळ करणे वेगळे आणि विस्कळीत, असंस्कृत जगणे वेगळे. दगड घडवावा लागतो तसा माणूसही. एकाएकी तयार माणूस हाती लागणे अशक्य आहे. त्याच्यासाठी कुणी खपले असेल तरच तो समाजाच्या दृष्टीने लायक बनतो.

   रामास्वामी सालस,सरळ सच्छील होता. त्याने नंतर कंपनी सोडली; पण आपल्या आठवणी सवयीमुळे त्याने आम्हाला कायमचे ऋणी करून ठेवले आहे.