Saturday, August 27, 2022

शूरा मी वंदिले - अनघा मोडक

 

 


II    स्वातंत्र्य लक्ष्मी कि जय II

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अल्पारंभा एज्यूकेशनल फाऊंडेशन, नाशिक आणि  महाराष्ट्र समाज सेवा संघ तसेच  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, "शूरा मी वंदिले !" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सुप्रसिद्ध आकाशवाणी निवेदिका, अनघा मोडक हिने , स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील शूरवीर सैनिकांच्या कथा, गाथा आपल्या अमोघ वाणीद्वारे  शालेय मुलांसमोर उलगडल्या !!

रचना विद्यालय नासिक, पुरुषोत्तम हायस्कूल नाशिकरोड, ज्यू..रुंग्टा हायस्कूल सिन्नर येथिल . ना. सारडा विद्यालय या चार  शाळांमध्ये हा कार्यक्रम सादर झाला आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या अप्रतिम कार्यक्रमांद्वारे, उमलत्या मनांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले !! आपल्या देशासाठी प्राण वेचलेल्या वीर सैनिकांच्या पालकांच्या बलिदानाचे यानिमित्ताने स्मरण आणि त्यांचा गौरव हे देखील या आयोजनामागचे उद्दिष्ट्य होते.  

महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राबाहेरचे असंख्य कार्यक्रम, व्याख्याने यामुळे लोकांसमोर आज अनघा मोडक हे निवेदन क्षेत्रातलं आघाडीचं नाव आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निवेदनामध्ये धनश्री लेले, सुधीर गाडगीळ आणि अनेक मान्यवर निवेदकांच्या पंक्तीमध्ये आज अनघाचे नाव आदराने घेतले जाते. वयाच्या पंचविसाव्या वर्षी अनघाला आपले दृष्टी गमवावी लागली. परंतु तिने सखोल अभ्यास, इतरांच्या मदतीने केलेले सततचे वाचन, चिकाटी आणि प्रचंड मेहनत यांच्या पाठबळावर आपल्या अधूत्वावर मात केली आहे. तिचा अभयास आणि वैचारिक श्रीमंती तिच्या रसाळ वाणीतुन प्रकट होत असते

"शूरा मी वंदिले !" या कार्यक्रमाद्वारे अनघाने शालेय  मुलांच्या दृष्टीने अनुकूल अशा वक्तृत्वामार्फत, भारतीय स्वातंत्र्य सेनानी तसेच सैनिक यांच्या कार्याबद्दल कथांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधला.    

१० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी रचना विद्यालयात झालेल्या पहिल्या व्याख्यानाआधी, अनघाचा सत्कार करण्यात आला. शहीद निनाद मांडवगणे यांचे पालक -वडील श्री अनिल मांडवगणे आई सौ. सुषमा मांडवगणे यांच्या हस्ते हा सत्कार  झाला ! त्याच्या आई-वडिलांची कार्यक्रमात असलेली उपस्थिती अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करून गेली. श्री सौ. मांडवगणे यांच्या चेह-यावर मुलाच्या कर्तृत्वाच्या छटा दिसत होत्या. आणि आई-वडील म्हणून मुलास गमाविल्याची अंधुक तरीही स्पष्ट वेदना ही...! यावेळी   " मेरे वतनके लोगों जरा आंखमे भरलो पानी...! जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी...!" हे गीत  एका विद्यार्थिनीने अतिशय अप्रतिमरित्या  सादर केले आणि व्याख्यानाआगोदर साजेसा  माहोल निर्माण झाला.   व्याख्यानात सैनिक या शब्दाची फार सुंदर व्याख्या अनघाने सादर  केली. ' "सैद्धांतिक-कर्तव्य-निष्ठा" या शब्द-भावार्थासह जीवन जगणारा तो सैनिक ' असे मत अनघाने मांडले आणि अनेक उदाहरणांचे दाखले देत तिने ही व्याख्या उपस्थितांना समजाविली. अनघाने मुलांना प्रश्न विचारला , " मेरा रंग दे बसंती चोला", यातील बसंती या शब्दाचा अर्थ  काय असावा ? त्याचा अर्थ वसंत का होतो हे सांगताना वसंत म्हणजे केशरी रंग आणि  केसरिया बाणा म्हणजे राष्ट्रभक्ती कशी ते तिने महाराणा प्रताप, तसेच २३ व्या वर्षी मातृभूमीच्या चरणी बलिदान देणा-या शहीद भगतसिंगांच्या कथा सांगितल्या. 

 


याच दिवशी दुपारचे व्याख्यान पुरुषोत्तम हायस्कूल नाशिकरोड, येथे होते. एनसीसी-कॅडेटस् नी सैनिकी थाटात केलेल्या स्वागताने वातावरण निर्मिती फार सुंदर झाली. धामणकर सभागृहातील भव्य रंगमंचावर दोन्ही बाजूने असणारी भारतमातेचे प्रतिमा नजतेल आणि मनात भरत होती. कारगिल युद्धात प्रत्यक्ष कामगिरी बजाविलेले श्री. नामदेव जायभावे, निवृत्त मेजर-सुभेदार यांच्या हस्ते अनघाचा सत्कार करण्यात आला. नामदेव हे नाव ऐकताच अनघाने संत नामदेव आणि ज्ञानदेवांचा उल्लेख केला. याच संदर्भात तिच्या व्हाटस्अप-स्टेटस वर असलेले वाक्य मनाला स्पर्शून जाते .ते वाक्य म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातील ओळ आहे, "श्रीगुरुं सारिखा असता पाठीराखा , इतरांचा लेखा कोण करी!" याही व्याख्यानासाठी काही सैन्याधिकारी पालक म्हणून उपस्थित होते, मेजर रोहनचे आई-वडील श्री सौ. सुधाकर चव्हाण , कर्नल अविनाशचे आई-वडील श्री सौ बाळासाहेब मोगल आणि मेजर श्रीकांत मेजर प्रशांतचे वडील श्री पंढरीनाथ शिंदे यांनाही वंदना देण्यात आली.    

 


१२ ऑगस्ट २०२२ रोजी तिसरे व्याख्यान जु. .  रुंग्टा हायस्कूल येथे संपन्न झाले. भव्य  सभागृह, मुला-मुलींच्या हातात फडकणारा भारताचा तिरंगा ध्वज यांनी वातावरणात ऊर्जा भरली होती. मंचावर सैन्याधिकारी पालक म्हणून उपस्थित होते.  भारतीय सैन्यात कार्यरत असणा-या शुभमचे आई-वडील श्री सौ.दीपक कुलकर्णी.त्यांच्या हस्ते अनघाचा सत्कार झाला.  व्याख्यानात नंदुरबार येथे शहीद झालेला अवघ्या  चौदा वर्षाच्या  शिरीष कुमारची आठवण करीत अनघाने विद्यार्थीवर्गाशी संवाद सुरु केला. महाराणा प्रतापांचा चेतक घोडा आणि सौदागर या शब्दाची पूर्वपीठीका सांगत, झांशीच्या राणीची आठवण करीत अनेक सैनिकांच्या बलिदानाच्या कथा सांगत अनघाने उपथितांच्या मनामध्ये आदर आणि देशप्रेमाच्या भावना जागविलय. युद्धभूमीवर बंकर उडवून देतांना सैनिकांनी केलेले साहस, त्यात अनेकांना  प्राप्त झालेले शहिदपण तसेच अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख होत व्याख्यान उत्तरोतर देशप्रेमाने भारावून गेले. जयहिंद...! जय भारत ...! व्यर्थ हो बलिदान चा प्रेरणा-संदेश घेवून कार्यक्रम संपन्न झाला.

 


मग शेवटच्या टप्प्याकडे कार्यक्रम पुढे सरकला. . ना. सारडा विद्यालयातील विद्यार्थ्याशी संवाद साधण्यासाठी अनघा सिन्नरला आली.विद्यालयाचा भव्य परिसर एनसीसी कॅडेटस् चा उस्त्फुर्त सहभाग. श्री वाघ सरांनी विद्यार्थ्यासह तबला-वादनावर म्हंटलेले गाणे खूपच  भावपूर्ण असे झाले. तिचा सत्कार स्क़्वाड्रन लीडर चिन्मयचे आई-वडील श्री सौ कोरडे यांच्या हस्ते झाला. दोघेही भारावलेले होते. चिन्मयच्या एनडीए तील शिक्षणाच्या आणि तेथील काटेकोर शिस्तीच्या आठवणीनी त्यांनी सांगितल्या राष्ट्र आणि राष्ट्रकार्य या विषयावर बोलतांना अमृत महोत्सव म्हणजे काय,-मृत म्हणजे काय ? याचा सहज उलगडा अनघाने केला .! 

रात्री उशिरा अनघा मुबईच्या दिशेने रवाना  झाली  परंतु  या चारही व्याख्यांत झालेला  "जय हिंद,भारत माता कि जय, वंदे मातरम्"  चा जयघोष,  आम्हा तिच्या वाणीने, सैनिकांच्या आणि स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याने  मंत्रमुग्ध झालेल्या श्रोतृवर्गाच्या मनात दुमदुमत राहिला !!  

 

- श्री अविनाश गोसावी,

   ९४२३९६४३१९

No comments:

Post a Comment