संत जनाबाईला दळण—कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग, परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकून तिची वाकळ घेऊन जातो, ह्या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्री. दि. इनामदार ह्यांनी लिहिलेली एक "वाकळ" नावाची सुंदर कविता वाचनात आली. ती आपणांसाठी सादर.
पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ
कुण्या घरचे दळण, आला दळून विठ्ठल
पीठ चाखले एकाने, म्हणे आहे ही साखर
पीठ हुंगले दुज्याने, म्हणे सुगंधी कापुर
कुणी शेला झटकला, पीठ उडुन जाईना
बुचकळला पाण्यात, पीठ धुऊन जाईना
झाली सचिंत पंढरी, वाढे राऊळी वर्दळ
ठिगळाच्या पांघरुणा, शेला म्हणती सकळ
फक्त जनीस दिसते, होती तिची ती वाकळ
विठ्ठलप्रेमे भरून आले , जनी रडे घळघळ ...
-------------------------------------------------------
श्री विठ्ठलार्पणमस्तु! 🙏🏼
No comments:
Post a Comment